Thursday, November 15, 2018

दुःखाच्या वाटेवर कोण तारी.


सध्या देशात शेतकरी शेती संबंधित खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या दिसत आहे. हवामान बदलामुळे वातावरणातील बदल होतांना दिसतो आणि त्याचं बरोबरीने व्यवस्थेने पायात टाकलेल्या बेड्यामुळे ह्या दुःखाच्या वाटेवर आम्हांला कोण तरणार हा प्रश्न अल्पभूधारक शेतकरीच्या सतत मनात सध्या चालू असतो. शेती संबंधित प्रत्येक क्षेत्रात विदारक परिस्थती निर्माण झाली आहे. सिंचनाचा अभाव, निसर्गाच्या अवकृपेमुळे तोंडी आलेला घास देखील निघून जातो, शेती मालाला बाजार भाव मिळत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेती विरोधी कायदे संपवले जात नाही. ह्या कायद्यानमुळे शेतकऱ्यांचे स्वतंत्र हिरावून घेतले गेले आहे. आज शेती म्हणजे जुगाराचा खेळ झाला प्रत्येकजण फक्त भावनिक गोष्टी पुढे करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असतो मुख्य मुद्द्यावर कोणी जास्त चर्चा करत नाही. शेतीकरणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील जनता शहराकडे धाव घेतांना दिसते आणि शहरीकरण वाढू लागले. पूर्वी शेती हा मुख्य उद्योग व्यवसाय वाटत असे आता शेतकऱ्याचे पोरग शेती करायची नाही असे म्हणू लागले कारण शेतीचे लहान लहान तुकडे पडायला लागल्यामुळे गुंठ्या मध्ये शेती करणे कसे परवडेल हा विचार शेतकरी पुत्र करू लागला. मोठ्या बागायतदार पुढारी यांना कुठला त्रास होत नाही कारण मुळात ते शेतकरी जरी असले तरी शेतात राबणारा खरा शेतकरी वेगळा असतो. कसेल त्याला फायदा हे स्वीकारले पाहिजे, शेती जमीन असली तरी कसणारा दुसरा कोणी व्यक्ती असेल तर मग कसणाऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे कमी नाही. ह्या मध्ये प्रामाणिक शेतकरी असतील प्रमाण फार नगण्य दिसते त्यामुळे सर्वच सारखे असे मुळीच नाही पण शेतकरी जगला पाहिजे, शेतीमाला भाव योग्य मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न होतांना दिसत नाही कारण मार्केट मधील दलाली संपवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने भाव मिळू लागेल. शेतीमाला वरील भाव ठरवण्याचा अधिकार हा शेतकऱ्याला व्यवस्थेने दिलाचा नाही आणि आपण मोठ्याने म्हणतो शेती हा मोठा उद्योग आहे जर उद्योग असेल तर उद्योग क्षेत्रात तयार होणाऱ्या मलाची किंमत सरकार ठरवते की मालक हा साधा प्रश्न पडतो. त्याचंप्रमाणे खते बियाणे ह्या मध्ये शेतकऱ्याला नेहमीच अज्ञान ठेवले जाते.

                आपल्या देशाची संस्कृती प्राचीन आहे जमिनीतून धान्य पिकवणे हे तंत्रज्ञान भारतीयांनीच विकसीत केले. शेतीचा शोध मातृसत्ताक संस्कृतीमधील गणमाता नेत्रुती यांनी लावला. घरच्या घरी बियाणे करण्याची आपली एक पद्धत होती पूर्वी ग्रामीण भागातील पोट भरण्याचे साधन शेती होते त्यावर आधारित इतर व्यवसाय ग्रामीण भागातील अर्थकारण चालवत असे पण जसा जसा काळ बदलत गेला सेंदीय शेतीचा जागा रासायनिक शेतीने घेतली बेसुमार रासायनिक खताचा वापर आणि आयते बीबियाणे यामुळे शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळण्याची हमी नसल्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार कमी कमी होत गेला. ग्रामीण भागातील जिल्हा बँक म्हणजे शेतकऱ्याची नुसती पिळवणूक करतात ते तर राजकीय पुढाऱ्यांची सोन्याची कोंबडी आहे. खर तर महाराष्ट्राला सरकार क्षेत्राचा मोठा वारसा आहे आणि सरकार क्षेत्रामुळे बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या देखील पण सध्या परीस्थीतीत बदलत चालली आहे नीतीमत्ता, तत्व मुल्ये सर्व गुंडाळून ठेवली जातात आणि सत्ता मिळवणे हाच पूर्ण उद्देश ठेवून साम, दाम दंड भेद ही तत्व वापरून सत्ता मिळवणे आणि त्यातून स्वताचे आर्थिक कल्याण करण्याची योजना स्वता पुरता तयार करून घेतली जाते. पूर्वी ग्रामीण भागातील नेत्यांचे फोटो घरात लावली जात असे कारण प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असे की आपला नेता हा आपल्यासाठी देवाच्या जागेवर आहे तो नक्की कल्याण करत असे. आज कुठल्या मंत्री पुढाऱ्यांचे फोटो घरात लावतील, होईल कोणाची इच्छा? का हा बदल झाला ह्यावर प्रकाश टाकणारे बरेच मंडळी दिसतील पण प्रत्यक्ष कृती मध्ये तसे दिसत नाही. आज गावात ज्याच्या कडे शेती आहे तो गावात दिसतो आणि इतर मंडळी रोजगार शोधण्यासाठी शहरात येत आहे. पूर्वी शेती व्यवसायवर चालणार रोजगार आज कमी झाला आणि खाजगी बँकाचे जाळे वाढले त्यांनी तर फार शोषण चालवले आहे कारण ग्रामीण भागात महिलांचे बचत गट तयार करून त्यांना कर्ज दिले जाऊ लागले आणि आठवड्याला हफ्ता वसुली करू लागले. ग्रामीण भागात रोजगार राहिला नाही म्हणून लोक कर्ज काढून जगू लागले आहे. जे कमवले जात आहे त्यातून दर आठवड्याचा ह्फ्ताचा भरण्याचे डोक्यावर ओझे घेत जगतांना दिसते.   

                परिवर्तन हा संसाराचा नियम आहे बदल स्विकारत पुढे जायचे असते. जे जे जुने कालबाह्य त्याचा त्याग करून नवीन मुल्यांचा स्वीकार करून मानवी जीवन गतिशील बनवावे हा व्यवहारिक नियम आपण शेती क्षेत्राला विसरलो बदलत्या काळानुसार आपण वेळीच पाऊले टाकली नाही शेती प्रश्न फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित राहिला शहरी वर्गाला त्याची झळ देखील बसू दिली नाही त्यामुळे भारत आणि इंडिया हा संघर्ष सतत बघण्यास मिळतो. इंडिया मध्ये राहणाऱ्याला भारतातील चित्र कळत नाही परंतु भारतच त्यांची भूक बघवत आला आहे हे कदाचित इंडिया मध्ये राहणार वर्ग विसरत जातांना दिसतो. समाजातील वर्ग संघर्ष हा नवीन नाही पण हे सर्व घडत असतांना आपण मात्र सर्व शांतपणे सहन करत असतो. शेती शेतकरी जर जगला तर इंडिया मध्ये राहणारे लोक जगतील नाहीत तर इंडिया मध्ये राहणाऱ्या लोकांची गरज शेतीमाल आयात करून भागवली जातांना दिसते. भारत आणि इंडिया हे एवढ्यासाठी म्हणावे लागते कारण बदल परीवर्तन हे शहरी भागात सतत होतांना दिसते ग्रामीण भागाला नेहमीच दुय्यम स्थान बदल परिवर्तन करतांना कदाचित जाणीवपूर्वक केले जाते का? शहरात वाढणारे नागरीकरण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यांचा सामना सर्वाना करावा लागत आहे. त्यामुळे शहरात राहणाऱ्या प्रत्येकाने शेती शेतकरी ग्रामीण भागात कसा टिकेल हा विचार केला पाहिजे. कदाचित त्यासाठी आपल्याला ग्रामीण भागातील शेतीवर आधारित रोजगार निर्मित करावे लागतील सर्व उद्योग शहरात सुरु करून शहरावर ओझे वाढवले जात आहे हा विचार कोणी करत नाही का? कुठलाही उद्योग सुरु करण्यासाठी पाणी हे गरजेचे असते परंतु कुठले ही सरकार असू दे त्यांनी सिंचन क्षेत्राकडे लक्ष दिलेच नाही त्यामुळेच आज पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ भारतात राहणाऱ्याला होते तेच मात्र इंडियात जीवन जगणाऱ्याला काय पाहिजे काय नाही ह्याचा विचार करून सुविधा पुरवल्या जातात पण भारतात मध्ये त्त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

                आज शेती शेतकऱ्यांची परिस्थिती हि विदारक होत आहे ह्यावर वेळीच उपाय योजना केल्यानाहीतर परिस्थिती कठीण होईल. यासाठी प्रथम कुठलेही सरकार असु दे त्यांनी शेती विरोधी कायदे संपवले पाहिज, शेती मालावरील किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला दिला पाहिजे, शेतीवर आधरित रोजगार ग्रामीण भागात वाढवले पाहिजे, सिंचन क्षेत्रातील कामाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन दिरंगाई करता पूर्ण केली पाहिजे, शहरात राहणाऱ्या व्यक्तीने ग्रामीण भागातील अडचणी समजून सरकारला त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील झाले पाहिजे. जो कसेल तोच शेतकरी धोरण राबविले पाहिजे त्यासाठी त्याला आधार कार्ड सारखे स्मार्ट कार्ड तयार केले पाहिजे परंतु हे करत असतांना त्यांची अंमलबजावणी करणारी व्यवस्था सक्षम तयार केली तरच हे होऊ शकतेअसे अनेक गोष्टी करण्यासारख्या आहे त्या वेळीच झाल्या पाहिजे अन्यथा शेतकरी हा मरण्याच्या वाटेवर जीवन जगत आहे त्याला अपेक्षा आहे कोणी तरी तारणार निर्माण होईल ह्याची तो वाट बघत आहे.

मयूर बा. बागुल,
पुणे

भ्रमणध्वनी - ९०९६२१०६६९ 

No comments:

Post a Comment