Wednesday, November 11, 2020

गाव तिथे सहज जलबोध कृती आराखडा वॅाटर बजेट गरजेचे…!


गेली अनेक वर्षापुर्वी जलव्यवस्थापन, जलनियोजन, जलसाक्षरता हे शब्द सुद्धा आपल्याकडे म्हणजे जनसामान्याकडे, प्रचारात नव्हते. त्यावेळी ह्या शब्धांचा फारतर शब्दशः अर्थाची आपण कल्पना करू शकलो असतो. परंतु २१ शतकाची सुरुवातच पाणी समस्येपासून झाली आहे. पाण्यावरून जागतिक किंवा महायुद्धे होतील असे भाकीत अनेक पंडितांनी वर्तवली आहेत .आता त्यातील सत्य, तथ्य, अगत्य कळू लागले आहे. वाढलेल्या लोकसंखेमुळे अन्नाची मागणीपेयजल, शेतीजल, औद्योगीक जल ह्या समस्या वाढल्या आहेत. आता तर मोठे जलाशय प्रकल्पांची मागणी होत आहे. त्यातूनच मोठ्या कालव्यांतील भूपृष्ठीय जलवाहतूकमत्स्योत्पादन, जलविद्युत निर्मितीनौका विहार, पर्यटन विकाससामाजिक वनीकरण व वन्य पशुसंवर्धन, आर्द्रता नियमन, जागतिक पर्यावरण इ. विषय हळू हळू पुढे येऊ लागले आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीचा विचार केल्यास ह्या सर्व समस्या किंवा मागण्या पाणी आधारितच आहेत.

जलाचे अस्तित्व असणारा आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा एक ग्रह आहे. पृथ्वीचा ७१ टक्के भाग जलाचा असून २९ टक्के भाग जमिनीचा आहे. त्यातील ९८ टक्के भाग पाणी क्षारयुक्त असून उर्वरित २ टक्के पाणी गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे. पाण्याचा वापर व त्याची गरज कोठे आहे. याचा आपण विचार करायला हवा. प्यायला तर पाणी हवेच. शेती, वनस्पती, झाडे नसतील तर आपण खाणार काय? आपल्या गावातील, परिसरातील उद्योगधंद्यांना नाही का पाणी लागत? मग आपण जलव्यवस्थापन नको का करायला? हवे ना!
जलाचे प्रमाण त्याची उपयोगीता व उपभोगीता म्हणजे प्रत्यक्ष वापर. यांचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून ते योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केलेली व्यवस्था तरतूद, उपाययोजना म्हणजे जलव्यवस्थापन होय. जलसंरक्षण संवर्धन व विकास यांची शास्त्रीयदृष्ट्या केलेली चिकित्सात्मक रचना म्हणजे जलव्यवस्थापन होय. जलाची उपलब्धता, गरजांचा अंदाज, जलवाटपाचा प्रकार, जल व्यवस्थापनात येणार्‍या अडचणींचा आढावा व त्यावर उपाय योजना या सर्व गोष्टींचा विचार व्हावयास हवा. जागतिक स्तरावर, देश स्तरावर आणि स्थानिक स्तरावर जल उपलब्धतेचे सर्वेक्षण केले जाते. जे जलस्त्रोत आहेत त्यात वर्षभर असणारे पाणी ऋतुमानानुसार जल प्रमाणात होणारा बदल व पाण्याचा दर्जा याचा विचार केला जातो. एखाद्या नदीत वर्षभर व ऋतूनुसार कोठे व किती पाणी उपलब्ध असते ? त्या नदीला पाणी कोठून येते ? नदीप्रमाणेच नैसर्गिक तळी व तलावांचा विचार होतो. नैसर्गिक तळी क्षारमुक्त असल्याने त्याचा उपयोग होतो. तसेच प्रदूषणामुळे नदी व तळ्यांचा पाण्याचा दर्जा कमी होतो. भरपूर पाण्याची उपलब्धता म्हणून गंगा, सिंधू, कावेरी, ब्रम्हपूत्रा, कृष्णा, गोदावरी, नर्मदा ही खोरी भारतातील खोरी प्रसिध्द आहेत. आता आपण उपलब्धता बघितल्यावर गरजांचा अंदाज बघावयास हवा. प्राचीन संस्कृती नदीकाठावर विकसित झाल्या. तंत्र प्रगतीने नदी नसलेल्या भागातही मानवी वस्त्या वाढल्या लोकसंख्या वाढल्यामुळे, शहरीकरणामुळे, औद्योगिककरणामुळे, पाण्याची गरज वाढली. त्यात स्थलांतरीतांमुळे भर पडते. पाणी पुरवणार्‍या व्यवस्थापनेसमोर प्रश्‍न निर्माण होतो. अडचणी निर्माण होतात. मग संघर्ष सुरू होतो. आपल्याकडील कृष्णा कावेरी पाणी तंटा सुरूच आहे. किंवा इतर स्थानिक स्वरूपातील जल वाटप संघर्ष चालूच असतात. नव्या तंत्रानुसार सागराचे क्षारयुक्त पाणी शुध्द करून वापरण्यास मध्यपूर्व राष्ट्रात सुरूवात झालीच आहे. तसेच गंगा - कावेरी नद्या जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प भारतसरकारने हाती घेतला आहे. आपण जलउपब्धता पाहिली. त्यांच्या गरजांचा अंदाज पाहून जलाचे योग्य वाटप झाले पाहिजे. उपलब्ध जलानुसार जलपुरवठ्यासाठी नदीवर धरणे व पाझर तलाव बांधणे कालवा किंवा नळाने पाणी पुरवणे, उपसा, जलसिंचन. स्प्रिंकल, ठिबक सिंचन, डबे व कावडीने पाणी पुरवणे यापैकी स्थानिकदृष्ट्या जी पध्दत योग्य असेल तिचा अवलंब करणे व पाणी पुरवण्याचे प्रमाण ही ठरविले जाते.  हे सर्व करत असताना आपणाला कोणत्या अडचणी येतील?  त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो ? याचा आपण विचार करायलाच हवा. अडचणी निर्माण करणारा मानवच असतो व त्यावर तोडगा काढणाराही मानवच आहे. सर्व प्राणी-पक्षी-पशू यांना पाण्याची गरज असते. परंतु माणसाच्या गरजा वाढल्या असतात. पूर्वी पाणी असेल तेथेच वस्ती असायची. पण आता वस्ती असते तेथे पाणी पुरवठा करावा लागतो. म्हणून जलव्यवस्थापनेत अडचण निर्माण होते. तसेच पाऊस हा लहरी असतो. त्याचे वाटपही समान नसते. तो कधी खूप पडतो म्हणून महापूर येतो तर कधी अजिबात पडत नाही म्हणून शेतकर्‍याला आकाशाकडे डोळे लावून बघत बसावे लागते. त्यामुळे जलव्यवस्थापनेत अडचण निर्माण होते. 

एकूणच जर आपण बघितले तर जल नेमकं काय असते याबबत देशातील सर्वच लोकांना अशिक्षित ठेवण्यात आले. भूगर्भ शास्त्र व जल शास्त्र ज्यांना माहिती त्यांना काम करण्यास स्वतंत्र्य नसल्यामुळे प्रमाणिक अधिकारी काही चांगले करत असतील तर त्यांची मुस्कटदाबी करून बदली करण्यात मज्जा वाटते. पाणी हा विषय सर्वच्या जीवनाशी निगडीत आहे. महाराष्ट्रातील जर आपण जल व्यवस्थेचा अभ्यास केला तर निश्चित लक्षात येते की जल व्यवस्थापन किती सुंदर प्रकारे करण्यात आले. आज मात्र चुकीचे पायदंड टाकून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. ह्या वर्षीचा भवताल हा दिवाळी अंक आपण सर्वांनी आवर्जून वाचवा त्यामध्ये जल व्यवस्था कश्या पद्धतीने तयार झाल्या आणि जल व्यवस्थापन कसे करण्यात येत होते हे सर्व आपल्याला वाचत असताना कळते. आज महाराष्ट्रातील एकूण भूगर्भातील पाणी बघितले तर त्याची पाणी पातळी खूप कमी झाली आहे. जमिनीत पाणी जिरवण्यासाठी शास्त्र तसेच पंचभूत पद्धतीने हे समजून घेणे गरजेचे झाले. महाराष्ट्रातील तरुण पिढीला योग्य जल व्यवस्थापन व गावातील जल आरखडा तयार करून गाव पाणीदार कसे होतील ही चळवळ उभी केली पाहिजे. प्रत्येक गावतील युवा तरुणांनी राजकीय नेत्यांच्या मागे फिरण्याचे सोडून स्व प्रेरणेने काम करण्यास सुरु केले तर राजकीय लोक स्वताहून लक्ष द्याला लागतील. देश हा तरुणांचा समजला जातो आणि देशाची खूप मोठी ताकद आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी सहज जलबोध समजून घेतले तर गावातील जल आराखडा तयार करण्यास सहज सोपे होईल.  

आज महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात पाण्याची कमतरता अधिक जाणवण्यास सुरुवात झाली आहे याधर्तीवर आपण सहज जल बोध आरखडा समजून घेणे गरजेचे वाटते. समाजातील धार्मिक व जातीय पेचातून बाहेर पडून आपल्या जगण्याची गरज ओळखून गावातील तसेच शहरातील जल व्यवस्थापन करण्यासाठी श्रम घेतले पाहिजे. एखाद्या प्रदेशात टेकड्या, डोंगर, पठारे, मैदाने अशा वेगवेगळ्या भूरचना तेथील वृक्षांचे आवरण आणि पावसाचे प्रमाण याचा एकत्रित परिणाम म्हणून तेथील नैसर्गिक प्रवाह तयार होतात. हे नैसर्गिक प्रवाह म्हणजे नद्या, ओढे, नाले आणि लहान-लहान प्रवाह यांचे आपण कसे संवर्धन करतो यावरच मुख्यत: त्या-त्या प्रदेशाचे भवितव्य ठरत असते. म्हणजेच पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाचे योग्य जतन केल्यास त्या-त्या भागात विपुल प्रमाणात जलसंपत्ती साठविली जाऊन जो भाग जलसमृद्ध होऊन विकासाच्या दिशेने चौफेर घोडदौड करेल. जल व्यवस्थापन करताना सर्वच पातळीवर लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. जल साक्षरता आणि त्यातून येणारे जल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे त्याच बरोबर गाव तेथे पाण्याचे बजेट केले पाहिजे. त्यासाठी लोकांनी आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

आपण नदीचे अस्तित्व जमिनीच्या हव्यासापोटी संपविण्याच्या मागे लागलो आहोत. नदीपात्रात भराव टाकून नदीपात्रात अतिक्रमण करीत आहोत व सरकार सुध्दा सतत बदलणाऐवजी या राजकीय विचार धारेमुळे अगदी बेशुध्द अवस्थेत वावरत आहे. कित्येक ठिकाणी नद्यांच्या पात्रांची रूंदी एवढी कमी झाली आहे की जर का अचानक मोठा पाऊस आला तर नदीचा प्रवाह नागरीवस्तीत घुसणार व त्याचा परिणाम मोठ्या मनुष्यहानीत होणार, याची उदाहरणे हल्ली आपण डोळ्याने पहात आहोत व अनुभवत सुध्दा आहोत पण त्या पासून काही बोध घेताना आपले सरकार अथवा आपण संवेदनाहीन प्रवृत्तीचे नागरिक दिसत नाही. नदीच्या पात्रातील मानवी हस्तक्षेप थांबणे गरजेचे आहे व जर आपण हे हस्तक्षेप हळूहळू कमी करीत गेलो तर आपण परत नदीच्या मुळरूपाची अपेक्षा करू शकतो. राजकीय मानसिकता एवढी भयानक व असंवेदनाहीन बनली आहे. नदी खोलीकरण नदीचे रूप बदलवत आहे. आपण फक्त आर्थिक स्वार्थासाठी व खुर्चीच्या राजकीय मानसिकतेच्या दडपणाखाली ही असली कृत्ये करू लागतो आहोत व त्यासाठी आपण सर्वच नागरिक दोषी आहोत. आपण सातत्याने कृतीशील बनणे गरजेचे आहे. नेमकी आपली मर्जीतील ठराविक मंडळी वर्षातून एकदा वाताकुलीन सभागृहात जमणार व माईक हातात घेवून मी किती ज्ञानी आहे व मला किती कळते याचे आवाज बदलून मोठ्या मार्मीकपणे सादरीकरण करण्यापलिकडे आपण काहीच करू शकलो नाही व त्यात धंदेवाईक सामाजिक संस्था तर दबा धरून हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी धडपडत असतात कारण त्या निमित्ताने वृत्तपत्रकात संस्थेचे नाव व सोबत एखाद्या व्यक्तीचे नाव येते व ती वृत्तपत्रकातील कात्रणे शासकीय अनुदानासाठी अथवा वैयक्तिक पुरस्कारांसाठी उपयोगी पडतात. सध्या पाणी यासाठी काम करणाऱ्या बऱ्या पैकी संस्था ह्या चुकीच्या मार्गाने अथवा चुकीच्या पद्धतीने काम करत आहे, याला उपवाद काही असतील पण प्रमाण फार कमी दिसते. भविष्यात पाण्यासाठी युद्ध करण्याची परिस्थिती निर्माण होणार असे म्हटले जाते. पाणी हे नागरिकांच्या जीवनातील महत्वाचे आहे जर पाणी नाही राहिले तर थोडे विचार करून बघा लक्षात येईल किती फजिती होते. यासाठी आज आपण सर्वांनी आपल्या आपल्या गावातील जल साक्षरता तसेच जल आराखडा तयार करून गावातील जल व्यवस्थापन व जल नियोजन केले पाहिजे. ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येऊन गावातील पाण्याचे स्त्रोत शोधून त्यासाठी तंत्रज्ञान विरहीत काम करून गाव पाणीदार करू शकतात. ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतने वॅाटर बजेट तयार करून पाण्याचा योग्य केल्यास पाण्याची अडचण निर्माण होऊ शकणार नाही. आज प्रत्येक गोष्ट सरकार व प्रशासनावर भोरोसा ठेऊन चालणार नाही. आपल्या प्रश्नांसाठी व अडचणी साठी आपणच सक्षमपणे कार्य केले तर सरकार व प्रशासनाला जागे करता येईल. 

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

भ्रमणध्वनी – ९०९६२१०६६९

इ-मेल – bagul.mayur@gmail.com

No comments:

Post a Comment