Wednesday, November 11, 2020

क्षीण क्षणांना संजीवनी देतो तो खरा तरुण राजकारणात व्हा...!

 

 

  आजच्या आपल्या देशाच वर्णन आपण सारेच ' तरुणांचा देश ' असं मोठ्या गौरवाने करीत आहोत. एकीकडे क्रिकेटच्या २०-२० च्या खेळात वेडी  झालेली तरुणाई आणि दुसरीकडे याच तरुणाईच्या  बळावर इ.स. २०-२०  मध्ये भारत महासत्ता होण्याच स्वप्न पाहणारा आपला देश, असं आपलं चित्र आहे. पण देशाच्या एकूणच वर्तमान आणि भवितव्य ज्या क्षेत्रातून निश्चित केले जाते, ठरते त्या राजकरणात, राजकीय लोकशाही व्यवस्थेत हाच तरुण कुठे आहे ? तो काय विचार करतोय ? याबाबत फारस कोणी गांभिर्याने विचार करायला तयार नाही. ज्या तरुणांच्या हिमतीवर आपण महासत्ता होण्याच स्वप्न उराशी बाळगतो आहोत तो या देशाच्या सत्ताकरणात नक्की कुठे आहे हे लक्षात घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. आगामी दीड वर्षाचा काळ हा देशाच्यासाठी निवडणुकांचा काळ असणारा आहे. हे लक्षात घेता सगळ्याच राजकीय पक्षांकडून तरुणांना आपल्या पक्षाच्या राजकीय अजेंड्यावर टॉप ला ठेवण्यात पुढे सरसावताना पाहायला मिळेल यात शंका नाही . कारण ही उघड उघड आहे . २०१९ ला होणार्‍या निवडणुकीत राजकारण्यांचे भवितव्य निश्चित करण्यात हाच देशाचा तरुण अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. तेव्हा  सर्वच मार्गाने  या तरुणांना आपआपल्या पक्षाकडे खेचण्यासाठी प्रयत्न होतांना आपल्याला पाहायला मिळतील.  पण या सगळ्या राजकारणाच्या रणधुमाळीत तरुणांना थेट राजकरणात  संधी  देण्याबाबत, त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी, त्यांच्या नेतृत्व कौशल्यावर  विश्वास टाकण्याचे धाडस राजकीय पक्ष घेतील का? हा खरा प्रश्न आहे. आजवर चा राजकीय निवडणुकीचा इतिहास पाहता असा प्रयत्न होणे तसे दुर्मिळच म्हणावे लागेल. सर्वच राजकीय पक्षांना तरुणांची मते हवी आहेत, तरुण कार्यकर्ते हवे आहेत पण तरुण थेट राजकरणात येवू पाहत असेल तर त्याबाबत सर्वच राजकीय पक्ष बोटचेपी, सोयीची भूमिका घेतांना दिसतात हे उघड आहे. तरुणांच्या शिक्षण, रोजगार, नोकरी या प्रश्नांबाबत ठोस असा कार्यक्रम घेवून कुठलाही पक्ष पुढे येत नसल्यामुळे तरुणांना राजकारण आणि राजकारण्यांविषयी फार आकर्षण राहिलेले नाही. राजकारणाच  साध्यच चित्र पाहता प्रस्थापित राजकारण्यांच्या लेखी तरुण म्हणजे निव्वळ एक भांडवल  झाले  आहे. निवडणुकीच्या तोंडावर तरुणांच्या बेरोजगारी, अशिक्षितपणा  दारिद्र्य,  हमीभाव, कर्जमाफी  याचा फायदा घेत त्याच्यातील फक्त उपयोगिता मूल्य ओळखून 'की जय '  हम तुम्हारे साथ है ' असा नारा देणारा आणि खांद्यावर झेंडा मिरवणारा, काहीसा उपद्रव मूल्य असणारा आणि विवेकाचा आभाव असणारा एक कार्यकर्ता इतकच काय  ते तरुणांच राजकारण्यांच्या लेखी मूल्य (?) आहे. हेच आजचं वास्तव आहे . अगदी आजच्या राजकरणात तरुण कुठे आहे ? याचा जर वस्तुनिष्ठ आभ्यास केला तरी भारतीय राजकारण्यांचे सरासरी वय सुद्धा तसे ५३ -५४ आहे. देशाचे प्रतींनिधी ज्या लोकसभेत बसतात त्या लोकसभेत एकूण खासदारांची  संख्या ५५२ आणि त्यातली ४० च्या आतील म्हणजे तरुण खासदारांची संख्या निव्वळ ७९ एवढी ! त्यातही राहुल गांधी, नीलेश राणे, सचिन पायलट, हिना गावित, सुप्रिया सुळे, प्रितम मुंडे, प्रियंका गांधी, रोहिणी खडसे अशी या यादीतली नावे पहिली तर लक्षात येते की निवडणूकीत त्यांना संधी मिळाली किवा ते निवडून आलेत त्यात ते तरुण आहेत याहीपेक्षा त्यांना मिळालेला राजकीय घराणेशाहीचा वरदस्त हाच निकष  जास्त काम करून गेला आहे हे सारेच जाणतात. म्हणजे सामान्य तरुणांना नेतृत्वाला संधी देण्यासाठी खरचं आजचे राजकीय पक्ष/ नेते किती गंभीर आहेत हेच यातून स्पष्ट होते आहे .  गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणातील भ्रष्टाचार, लाचखोरी, आणि अनेक अनुचित प्रकारांचा रोजच उजागरा वर्तमान पत्र, वृतवाहिन्या, फेसबुक अशा माध्यमातून देशापुढे येतो आहे . या अत्यंत विदारक वास्तवाचा विचार जेव्हा देशातील तरुण करतो तेव्हा नक्कीच तो या राजकारणापासून चार हात लांब राहण्याचा विचार तो करतो. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांनंतर प्रस्थापित राजकारण्यांकडून या देशाच्या तरुण पिढीला परिपक्व राजकीय व्यवस्था देणे अपेक्षित असताना ज्या प्रकारच सध्याच्या  राजकीय व्यवस्थेच चित्र आहे ते आजच्या तरुणांना राजकारणात येण्यासाठी फार आशादायी आहे असं दुर्दैवाने म्हणता येणार नाही . अगदी पक्षांची निवडणुकीतील तिकीटवाटप प्रकिया बघायची झाली तरी किती सच्चा तरुण कार्यकर्त्यांना निवडणुकीची तिकीट द्यायला राजकीय पक्ष धजावतात हा संशोधांनाचा विषय ठरावा.  त्या ऐवजी उमेदवाराचे राजकीय वजन, वारसा, पद , पैसा आणि उमेदवाराची  लोकशाही मूल्यांवरील निष्ठेपेक्षा उपद्रव मूल्यांवर त्याचा असलेला हातखंडा असे निकष लावून उमेदवार निश्चित केला जात असेल तर आजच्या तरुणाने कसे राजकरणात वळावे ? कसा विश्वास ठेवावा या राजकीय व्यवस्थेवर ? आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यात मश्गुल असणारे पक्ष, राजकीय नेते आता तरुणांच्या प्रश्नांचेही भांडवल  करू पाहात आहेत आणि मग तेही कमी की काय तर हळूच जात, धर्म, आरक्षण अशा भावनिक मुद्यांवर एकमेकांची माथी भडकावून डोकी फोडण्याचा सोपा उद्योग  तरुणांच्या हाती देवून हे मात्र स्वतः च कुरघोडीच राजकारण साधण्यात धन्यता मनात असतील तर तरुणांनी कुठल्या आशेने राजकरणात यावे? असा प्रश्न तरुणांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही.

राजकीय व्यवस्थेकडून तरुणांची अशी निराशा होत असतांना समाज, मतदार,  कुटुंबांकडूनही  राजकारणात येवू पाहणार्‍या तरुणांची अवहेलनाच होत असल्याचे चित्र आहे. अगदी साधी गावातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एखाद्या सुशिक्षित तरुणाने यायचं म्हटलं तरी  लगेच "अरे राजकरणात तुझ काम नाही राजा, राजकरणात कसला जातोय ! करियर घडव , राजकारण तर पैसेवाल्यांचे बदमाशांचे अड्डे भाऊ तेथे आपले काम नाही " अशा नकारात्मक प्रतिक्रिया मिळत जातात आणि यातूनच देशाला मिळणार्‍या तरुण नेतृत्वाच्या शक्यता मावळत जावून हे तरुण नेतृत्व उमलण्याआधीच खुडून टाकले जाते. म्हणजे राजकारणात येणे म्हणजे भयंकर महापाप असा समज जर होणार असेल तर राजकारणात तरुणांनी कशासाठी यायचे हा प्रश्न तर फार दूरच राहतो. अगदी  तरुणांमध्ये सुद्धा एक वर्ग असा आहे जो राहतो, खातो तर याच देशात पण देशात काय चालले आहे ? काय घडते आहे?  या सगळ्यापासून कोसो दूर राहाणारा  हा वर्ग म्हणजे याच देशातलेच पण असून नसल्यासारखे असतात हे मग मतदानाचा दिवस ही त्यांच्यासाठी सुट्टीचा आणि एन्जॉय करण्याचा दिवस असतो. ज्या पिढीत मतदानासारख्या मूलभूत कर्तव्यबद्दल इतकी उदासिनता पाहायला मिळत असेल तिथे राजकरणात येण्याबाबत तर अंधारच म्हणावं लागले. एकूणच देशाच्या राजकीय व्यवस्थेचे अत्यंत निराशावादी वास्तवाच्या पार्श्वभूमीवर या देशातला तरुण मात्र आशावादी आहे. तो काय बदल घडवू शकतो याची चुणूक अलीकडच्या अनेक आंदोलने, मोर्चे, चळवळीतून पाहायला मिळाली आहे . आणि अगदी अलिकडची उदाहरणे घ्यायची झाली तर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात आण्णा हजारेंसोबत अत्यंत उर्जेने रस्त्यावर उतरलेली तरुणाई, त्यानंतरच्या दिल्लीतील निर्भया प्रकरणातील तरुणांचा आक्रोश असेल आणि विविध पद्धतीने देशातील एकूण व्यवस्थेच्या बाजूने बोलत आहे. आज प्रत्यक्ष राजकरणात असलेले खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या मधील प्रामाणिकपणा आपआपल्या कार्यक्षेत्रात दिसत नाही. अर्थातच, देशात सर्वत्र माजलेल्या अनागोंदी कारभारापुढे आशेची ही किरणे नक्कीच आपल्या चर्चेचा विषय होत नसतील, आपल्या नजरेत पडत नसतील पण उद्याच्या सकारात्मक बदलांचे शिल्पकार घडवणे हे ह्या देशातील नागरिकांचे काम असणार आहे. तरुणांनी राजकरणात कशासाठी यावे? तर याच सकारात्मक  बदलांना पाठबळ मिळावे आणि बदलांचे हे चित्र आधिक व्यापक व्हावे यासाठी राजकारण हे एक उत्तम व्यासपीठ ठरू शकते. आमची तरुण पिढी ही निव्वळ सोशल साईट्सवर आरडाओरडा करणारी नक्कीच नाही तर ती संघटित होवू शकते आणि राजकीय, सामाजिक परिवर्तनाची ताकद तिच्याकडे आहे  यात शंका नाही. आज  खाजगी क्षेत्राइतकच सामाजिक, राजकीय क्षेत्राकडे देखील एक करियर म्हणून पाहण्याचा दृष्टीकोण या पिढीकडे आहे. स्वतः च्या उदरनिर्वाह पलीकडे ही एक सामाजिक भान मनात बाळगत राजकारणाच्या माध्यमातून बदल घडवण्याचे सामर्थ्य तरुण बाळगून आहेत हे अत्यंत आशादायी म्हणता येईल. देशाची राजकीय  सामाजिक व्यवस्था बरबटत चालली आहे हे तर आपण सगळ्यांनीच मान्य केले आहे. पण म्हणून सगळ्यांनीच थेट राजकरणात प्रवेश करावा असे नक्कीच नाही पण किमान जो तरुण या बरबटलेल्या राजकीय, सामाजिक व्यवस्थेला बदलण्याचा, योग्य दिशेने नेण्याच्या उद्देशाने राजकारणात प्रवेश करतो आहे तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे  उभे राहण्याची जबाबदारी सर्वच समाज घटकांची आहे . गरज आहे ती त्याला समर्थपणे  साथ देण्याची. तरुणांना राजकरणात संधी मिळावी, त्यांच्याही  कर्तुत्वावर -नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्यासाठी एक निष्पक्ष, पारदर्शी आणि लोकशाही मूल्यांचा आदर बाळगणारी राजकीय व्यवस्था निर्माण  करून देण्याची नैतिक जबाबदारी सर्वच राजकीय पक्ष, नेते, मतदार, समाज, कुटुंब आणि शिक्षणव्यवस्था या सगळ्यांची आहे. आजची तरुण पिढी विज्ञान युगात वावरणारी असल्याने ती काळसुसंगत विचार करू शकते. देशाच्या  भविष्याविषयी गंभीर राहून अनेक अभिनव उपक्रम, योजना प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी तरुण उत्सुक आहेत. तरुणांच्या आत असलेल्या या उर्जेला सकारात्मक वाटेने घेवून जात देशाच्या प्रगतीसाठी वापरण्याचे  एक उत्तम व्यासपीठ म्हणजे राजकारण आहे. राजकारणाच्या माध्यमातून  थेट जनतेचे प्रश्न समजून घेण्याची संधी तरुणांना मिळते आहे आणि लोकशाहीने बहाल केलेल्या अधिकारांच्या बळावरती हे प्रश्न तरुण सोडवू शकतात. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने दूरगामी परिणाम घडवू शकतील अशी धोरणे, निर्णय घेण्याचा अधिकार राजकारणातून  तरुणांना मिळणार असेल तर नक्कीच त्यांनी राजकरणाकडे वळायला हवे.  तरुणांनी राजकरणात यावे ते याचसाठी की, राजकारण म्हणजे केवळ भ्रष्टाचार आणि पैसा नव्हे तर राजकारण म्हणजे समाजकारण, राजकारण म्हणजे सत्तेचा उपभोग घेणे नव्हे तर सत्तेचा उपयोग लोकककल्याणासाठी करणे, राजकारण म्हणजे देशाची बदनामी, नामुष्कि  नव्हे तर देशाचे भूषण, देशाची ओळख, राजकारण म्हणजे निराशेचे मळभ नव्हे तर आशेचा किरण, राजकारण म्हणजे जैसे थेचा  पाढा नव्हे तर बदलांचा नारा  हे सगळं पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी तरुणांनी राजकरणात येणे काळाची या देशाची गरज आहे .मराठीमधील झेंडा या चित्रपटाने आजच्या राजकीय व्यवस्थेकडून तरुणांचा कसा वापर केला जात आहे , काशी फरफट होते आहे याचे अत्यंत वास्तव चित्रण मांडले आहे . गोंधळलेल्या राजकीय व्यवस्थेत आजच्या तरुणाला हाच प्रश्न पडला आहे ' विठ्ठाला ! कोणता झेंडा घेवू हाती ? तर शिवाजी राजे ...मधील  दिनकर भोसलेंसारखा सामान्य माणूस जरा का राजकरणात येतोय म्हटलं की लगेच आपण ' साला येभी उनमे से निकला !  असं  म्हणत चिखलफेक करणारे आपण. ही दोनच चित्र सध्याच्या परिस्थितीबद्दल भाष्य करण्यास बोलकी आहेत आणि तरुणांनी राजकरणात कसे यावे ? आणि कशासाठी यावे ? हे सांगण्यासही पुरेशी आहेत.  जेष्ठ थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे अत्यंत सुंदर वाक्य आहे . " क्षीण क्षणांना संजीवनी देतो तो खरा तरुण " देशाच्या क्षीण आणि हीन होत चाललेल्या राजकीय , सामाजिक व्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी तरी आता तरुणांनी राजकरणात येण्याची गरज आहे इतक नक्की ! यासाठीच देशातील युवकांनी व्यवस्था बदलण्यासाठी राजकारणात येणे गरजेचे आहे.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

९०९६२१०६६९

No comments:

Post a Comment