Monday, November 16, 2020

हवामान बदल! विनाशाकडे वाटचाल.

 

 

जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला वर्षातील ३६५ दिवसांपैकी आपण १ दिवस साजरा करत असतो आणि ३६४ दिवस अत्यंत महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करत असतो. असे का होते कारण वास्तविक परिस्थिती आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही परंतु सोशल मिडीयावर टाईमपास करण्यासाठी वेळ निघतो असा आपला समाज आहे. हवामान बदलांचा विचार करायचा झाल्यास ज्याप्रमाणे प्रत्येक देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती वेगळी त्याचप्रमाणे भौगोलिक परिस्थितीही वेगळी आहे. इथून - तिथून मानवजात सगळीकडे एक आहे आणि म्हणून काही संकटे ही देशापुरती, काही त्या देशातील प्रांतापुरती, परंतु जगावरील संकट असे ज्याचे स्वरूप मांडता येईल, अशा जागतिक हवामानात जो वेगाने बदल होत आहे ती जगापुढची आजची सगळ्यात मोठी चिंता आहे. हे जग जेवढे मोठे आहे तेवढेच या जगाचे प्रश्न मोठे आहेत. जगातील सगळ्या देशांची लोकसंख्या एकत्र केली तर अधिकृत जनगणनेनुसार जाहीर झालेली लोकसंख्या 700 कोटी सांगितली जाते. ही लोकसंख्या सांगणारे आणि ती प्रसिध्द करणारे एवढ्या वेळात जगात 1 कोटी लोक नव्याने जन्माला आलेले असतील. जगातील लहान देश अगणित आहेत. चर्चा होते ती प्रामुख्याने अमेरिका, चीन, रशिया, युरोपातील राष्ट्रे, काही प्रमाणात भारत आणि जपान यांची. या जगात दीड लाख लोकसंख्येचाही देश आहे. 

            पुण्यात मैत्री या सामाजिक संस्थेने हवामान बदल यासंदर्भात पत्रकार, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे सादरीकरण झाले. मला या कार्यक्रमा मध्ये सहभाग होण्याची संधी मिळाली आणि मी विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या एकूण दैनंदिन जीवनात व्यक्तीला वेळ मिळणे देखील कठीण झाला आहे. त्यात समाजातील अनेक समस्या यासर्वाना सामोरे जातांना या समस्यांच्या माझ्या आयुष्यात काय दुष्परिणाम होत आहे हे समजून घेण्यासाठी कोणी तयार नाही. हवामान बदल हे खूप मोठे जागतिक संकट आहे आणि त्याचे दुष्परिणामानां आपण सर्वजण बळी पडत आहोत. जागतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी सांगितले की आण्वस्त्र आणि हवामान बदल, यामुळे पृथ्वीची अंतिम घटिका जवळ आली आहे. जगात अनेक शास्त्रज्ञ यांनी हवामान बदला मुळे पृथ्वीवर काय दुष्परिणाम होणार आहे हे सांगितले आहे. यासर्व परिस्थिती सध्या व्यक्ती मी....मी...माझं सेल्फी संस्कृती, अतिरेकी व्यक्तिवाद यामध्ये समाज मोठ्या प्रमाणात गुंतलेला दिसतो. आपल्या भवताली दिसत असेल मोठ्या प्रमाणत उष्णता शहरात देखील पडायला सुरुवात झाली आहे. २०१० साला पासून प्रत्येक वर्षी उष्णता मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विकासाच्या नावाखाली गेल्या काही दशकांमध्ये जी वृक्षतोड झाली, पर्यावरणाची हानी झाली, सिमेंटची जंगले उभी राहिली, वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून जागतिक हवामानात बदल होत असून, कार्बन उत्सर्जनामुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. येणाऱ्या काळात जागतिक हवामान बदलांच्या धोक्यापासून पृथ्वीला वाचविण्यासाठी आत्मघातकी अतिरेकी हल्ल्याच्या धक्क्यातून सावरत असलेली फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे जागतिक नेत्यांची एक परिषद नुकतीच आयोजित करण्यात आली होती. विकसित देशांनी आपल्याकडील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याचे मान्य केले असले तरी, भारतासारख्या विकसनशील देशाने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जास्त प्रमाणात कमी करावे, असा आग्रह धरला. साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत बोलतांना विकसित देशांना खडे बोल सुनावले आणि हवामान बदलांच्या धोक्यापासून पृथ्वीला वाचविण्याची जबाबदारी केवळ विकसनशील देशांची नसून, विकसित देशांची पण आहे, असे मोदींनी या परिषदेत बोलतांना सांगितले होते.

 

जगात असे सांगितले गेले की २०४० पर्यत उत्तर धृवावरील बर्फाचा अंत होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक जैवविविधतेचा अहवाल प्रकाशित झाला होता त्यात असे म्हटले की जीवसृष्टीतील १० लक्ष प्रजाती लुप्त होण्याच्या अवस्थेत आहे. १९७० पासून ५२ टक्के जैवविविधता नष्ट झाले.

जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सियसच्या खाली ठेवण्याच्या उद्दिष्टापासून जग पूर्णपणे भरकटलं आहे. आणि आता जागतिक तापमानवाढीची वाटचाल 3 डिग्री सेल्सियसकडे होत असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सियसच्या खाली ठेवण्याचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपल्याला ऊर्जेच्या वापराबाबत वेगवान, दूरगामी आणि अभूतपूर्व बदल करावे लागतील, असं म्हटलं जात आहे. या गोष्टीची खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. पण तितक्याच प्रमाणात आपल्याला संधी असल्याचं देखील म्हटलं जात आहे. तीन वर्षांचं संशोधन आणि दक्षिण कोरियात वैज्ञानिक आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC)नं एक विशेष अहवाल सादर केला आहे. जर आपण जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सियसने वाढू दिली तर त्याचे काय परिणाम आपल्याला भोगावे लागतील आणि जर ही मर्यादा आपण पाळली तर आपल्याला काय फायदा होईल, हे या अहवालात सांगितलं आहे. या अहवालात 33 पानांचा सारांश दिला आहे. त्यात असं निरीक्षण आहे की जागतिक नेत्यांना तापमानवाढीपेक्षा जास्त काळजी अर्थव्यवसथेची आणि राहणीमानाची आहे. असं असलं तरी या अहवालातले काही ठळक मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. 2C हे उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा 1.5C हे उद्दिष्ट ठरवणं, हे खूप अर्थानं फायद्याचं आहे. हवामान बदलाच्या परिणामासंबंधी महत्त्वपूर्ण बदल घडतील असं प्रा. जिम स्किया यांनी म्हटलं आहे. ते IPCC चे सह-अध्यक्ष आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर 1.5Cचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपण ऊर्जेचा वापर कसा करतो, आपण जमीन कशी वापरतो आणि आपली वाहतूक व्यवस्था कशी असावी, याबाबत आपल्याला अमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील. "या अहवालात नोंद घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. हा अहवाल असा आहे की वैज्ञानिकांना, 'ACT NOW, IDIOTS (मूर्खांनो, आता तरी काही करा), असं लिहावंसं वाटत असेलही. पण त्यांना ही गोष्टी तथ्य आणि आकडेवारीसह मांडावी लागणार आहे," असं कैसा कोसोनेन यांनी म्हटलं आहे. कैसा या ग्रीनपीस संघटनेशी संबंधित आहेत आणि त्यांनी या वाटाघाटींचं निरीक्षण केलं आहे. तथ्य आणि आकडेवारीचा वापर करून वैज्ञानिकांनी जगाला धोकादायक तापाची लागण झाली आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला असं वाटत होतं की जर आपण 2Cचं उद्दिष्ट यशस्वीरीत्या गाठू शकलो तर हवामान बदलाचे परिणाम हे आटोक्यात राहतील. पण या अहवालानं आपले डोळे उघडले आहेत. या अहवालात स्पष्टपणे सांगितलं आहे की जर तापमान 1.5C नं वाढलं तर यामुळे पृथ्वीचं आरोग्य धोक्यात जाईल आणि 1.5 ची मर्यादा आपण फक्त 12 वर्षांत ओलांडणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे. म्हणजेच 2030 नंतर पृथ्वीच्या तापमानात 1.5C वाढ होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. "आपण याखाली येऊ शकतो. पण त्यासाठी आपल्याला अत्यावश्यक बदल तातडीनं घडवावे लागतील. यासाठी खूप मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. पुढील वीस वर्षांसाठी पूर्ण जागतिक सकल उत्पन्न तसेच वस्तू आणि सेवांवर मिळणाऱ्या उत्पन्नातील 2.5 टक्के रक्कम दरवर्षी आपल्याला गुंतवावी लागेल तर हे उद्दिष्ट गाठता येईल." "असं झालं तर आपल्याला अशी उपकरणं आणि यंत्रे लागतील जी वातावरणातल्या कार्बनला कैद करू शकतील. मग ही कार्बन आपण खोल जमिनीत साठवून ठेवू. असं घडलं तरच हे आटोक्यात येईल. "मुख्य प्रश्न आहे तो या पृथ्वीवर लोकसंख्येचा वाढत चाललेला भार. जगातील शास्त्रज्ञांनी अजून याचा हिशेब मांडलेला नाही की, ही पृथ्वी किती लोकसंख्येचे ओझे सहन करू शकेल ? एक दिवस असा न येवो की, या पृथ्वीला माणसांचा भार सहन होणार नाही. जगाची निर्मिती नेमकी कधी झाली ? त्याची समावळी नेमकी कशी, कोणालाही सांगता येत नाही. पण जेव्हा केव्हा झाली त्यावेळची पृथ्वी, त्या पृथ्वीवरचं प्रचंड जंगल, कोसळणारा पाऊस आणि तापमानातील समतोल हे गेल्या पाच हजार वर्षात अतिशय संथ वेगाने निश्चितपणे बदलत चालले आहे. मनुष्यनिर्मिती झाल्यापासून समूहाने राहणारा माणूस, त्यातून निर्माण झालेली गावे, शहरे, प्रांत आणि देश या सगळ्या कल्पना या हजार दोन हजार वर्षातील आहेत. या पृथ्वीवरचा भार वाढायला लागला, याचे मुख्य कारण, लोकसंख्येची वाढ गेल्या हजार - दोन वर्षात अतिशय झपाट्याने होत गेली आहे. जशी लोकसंख्या वाढली तसे लोकांचे प्रश्न वाढले. जंगलतोड ही त्यातून अपरिहार्य ठरलेली गोष्ट आहे आणि जेव्हा जंगले तोडून वस्त्या होवू लागल्या त्यावेळी या पृथ्वीसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले. झपाट्याने कमी होणारे पावसाचे प्रमाण याचा जंगलतुटीशी अत्यंत अनन्यसाधारण संबंध आहे आणि पावसाच्या अनियमिततेमुळे वाढणाऱ्या उष्णतेचा हवामानाशी संबंध आहे. जमिनीतील ओल जेव्हा कमी होत जाते तेव्हा उष्णतामान वाढायला सुरूवात होते.  आपल्याकडे वनमोहत्सव नावाची एक पध्दत होती. पण झाडे लावत जायचे. एवढाच कार्यक्रम झाला. ती जगली की नाही, हे कोणी पाहिले नाही. एक पिंपळ किंवा एक वड दिवसाला एक हजार टन प्राणवायू सोडत असतो, उद्या साऱ्या जगात जेव्हा मोठ्या प्रमाणात जंगलतोड होईल तेव्हा या जगातील माणसांना, विद्यार्थ्यांना पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याप्रमाणे पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर लावून जगावे लागेल. हे काल्पनिक भय नाही. येत्या काही दिवसांतील ती वस्तुस्थिती ठरेल. कारण वातावरणात जे कार्बनचे उत्सर्जन वाढलेले आहे त्यातून ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्याची प्रक्रिया होत आहे. या सगळ्याचे एकत्रित परिणाम म्हणजे जागतिक तापमानात वाढ होत जाते आणि सगळ्यात चिंतेची बाब ही की, या देशातील जबाबदार लोकांना याबद्दल फार काही वाटत नाही, असे वाटते. शहरात उभी राहणारी सिमेंटची जंगले ही अपरिहार्य आहेत. कारण शहरातील वाढत्या लोकसंख्येचा लोंढा जगातील कोणत्याही शहरात रोजगार आहे म्हणून आहे. एक मुंबईचे उदाहरण घ्या. इथे रोजगार नसता तर कोणी फिरकले नसते. गाव सोडून शहरात गर्दी करावी, असे कोणालाही वाटत नाही. तेव्हा जागतिक परिभाषेत जे नागरीकरण 'मेट्रोसिटी ' मध्ये रूपांतरित झाली आहेत त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत. ओस पडत चाललेली खेडी हा आपल्या देशातील आणखी एक वेगळा प्रश्न आहे. महाराष्ट्र आणि देशापुरते बोलायचे तर जमिनीतील वाढत चाललेला पाण्याचा उपसा हेही वाढत्या तापमानाला कारणीभूत ठरत आहे. असे अनेक प्रश्न एकमेकांत गुंतलेले आहेत. काही दिवसांचा इवेंट केला जातो प्रसिद्धी मिळवली जाते आणि एकूण कामाचे मूल्यमापन तपासणी कधी बघितली जात नाही. ज्यावेळी अपयश दिसते तेव्हा मात्र खापर हे पाऊस वेळेवर झाला नाही, कमी पडला असे काही कारण रंगवून सांगितले जाते परंतु आपण कार्य करत असतांना तांत्रिक बाबीवर कमी पडतो हे मान्य करणे अवघड जाते. वाढत्या शहरीकरणात जमीन जाणे अटळ आहे. परंतु नष्ट झालेल्या वनसंपदेच्या दुप्पट-तिप्पट वृक्षलागवड करता येणे अजिबात अवघड नाही. हे बंधन उद्योग व सरकारवर आणलेच पाहिजे. वाळू असो वा खनिज काढणे, हे थांबवता येणार नाही. परंतु त्याचा उपसा कधी व किती करायचा, यावर नियंत्रण तर आणता येऊ शकते. उत्तम डिझाइन व कल्पक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणी व विजेची बचत करता येते. पर्यावरणस्नेही व हरित बांधकामास सवलत देऊन प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. देशभरात नमुनेदार हरित शहरांचा पथदर्शी प्रकल्प चालू केल्यास हा संदेश सर्वत्र जाईल. ऊर्जाग्राही तंत्रज्ञान झपाटय़ाने कालबाह्य़ होणार असून कल्पक डिझाइन हा कळीचा मुद्दा असणार आहे. कर्ब वायूंचे उत्सर्जन कमी झाल्यास आर्थिक प्रगतीचा वेग मंदावेल, हा युक्तिवाद धादांत खोटा आहे. उलट नव्या तंत्रज्ञानामुळे उद्योग व रोजगार वाढणार आहेत. १९६५ सालीच हवामानबदलाच्या धोक्यापासून जगाला सर्वप्रथम सावध करणारे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. जेम्स लव्हलॉक हे यंदा वयाची शताब्दी साजरी करीत आहेत. या शतकाच्या साक्षीदाराने कधीच सांगून ठेवलं आहे, ‘‘पर्यावरणाचे स्वरूप जागतिक असून त्याचे आव्हान मात्र सामाजिक व राजकीय आहे. भौगोलिक बदल घडून येण्यास हजारो र्वष लागतात. हवामानबदल मात्र आपण दरवर्षी अनुभवत आहोत. पृथ्वी नामक अवकाशनौकेला भगदाड पडले असल्याची खात्री सर्वाना झाल्यामुळे वरचेवर सर्वत्र पळापळ चालू झाली आहे. आपला समाज काळानुरूप सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळे संपूर्ण पृथ्वी धोक्यात आली आहे.’’ महेश एलकुंचवार असोत वा डॉ. लव्हलॉक, नासा असो वा आयपीसीसी, या सर्वानाच युगान्तन होता युगान्तरव्हावे अशीच आस आहे. तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे हा रात्रंदिन युद्धाचा प्रसंगअसून त्यासाठी आतून स्वतला (जीवनशैली) आणि बाहेर राजकारण बदलणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गोष्टीची सुरवात मात्र स्वतः पासून करणे गरजेचे आहे.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९

 

 




No comments:

Post a Comment