उपेंद्रदादा धोंडे यांचा जन्म 1975 साली
"दुष्काळाने सदा कष्टी, म्हणजे बीड जिल्ह्य़ातील
आष्टी" या गावचा. त्यांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण अंबाजोगाई येथील खोलेश्वर
विद्यालय व पुढे सोलापूर येथे वालचंद कॉलेज’मध्ये झाले.
गावाकडे शेतीत राम नाही आणि घरी व्यवसायाकरिता भांडवल नसणार त्यामुळे चांगले
शिक्षण घेऊन सरकारी नोकरीच मिळवायला हवी हा दुष्काळी पट्टय़ातील युवकांचा शिरस्ताच
आणि उपेंद्रदादांनीही त्यानुसारच मार्ग धरला. 12 वी मधील
अभ्यासाकडे दूर्लक्षाने जो मार्कांचा फटका बसला त्याने खडबडून जागे होऊन अभ्यासाला
लागल्यावर मग उपेंद्रदादांनी B.Sc. - M. Sc. चांगल्या मार्कांनी पास होत 1999 ची UPSC परीक्षा उत्तीर्ण केली व "सहायक भूजल वैज्ञानिक" या पदावर
केंद्रीय भूजल विभागात 2001 च्या जानेवारीत रूजू झाले.
पहिली काही वर्षे नव्याची नवलाईच होती, गावाकडची
मंडळी अभिमानाने सांगत की,"पोरगं जम्मू -काश्मीर मध्ये
मोठा अधिकारी" आहे. त्यांना नेमके या पदाची जबाबदारी काय असते हि कल्पना
नसल्याने ते समजत की,"गाडी-बंगला-नोकरचाकर" अशी
सर्व सुखे-ऐशोआराम पायाशी असतील असे वाटे. पण परिस्थिती तशी नव्हती, हि नोकरी खडतर परिश्रम करायला लावणारी होती पण उपेंद्रदादास मात्र हे काम
मनापासून आवडलेले. वैज्ञानिक म्हणजे फिल्डवर्क निमित्ताने अखंड भ्रमंती, मग काय आख्खा जम्मू -काश्मीर पालथा घातला. बघता बघता चार वर्षे कशी गेली
कळलेही नाही. मग 2004 मध्ये पुण्यात बदली होईपर्यंत उपेंद्र
धोंडे हे नाव एक परखड, रोखठोक स्वभावाचे, मेहनती अधिकारी म्हणून विभागात प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांचे
नाॅन-महाराष्ट्रीयन सहकारी मित्र त्यांना प्रेमाने म्हणत,"मर्द मराठा सच्चा, ये शिवाजी का बच्चा".
पुण्यात आल्यावरही सुरुवातीला काही
वर्षे दोन मुले व पत्नी असा सुखाचा संसार आणि कार्यालयीन कामकाज इमानेइतबारे करने
सुरू होते. मात्र हळूहळू काम करत असताना नजरेसमोर येणाऱ्या भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची
मनमानी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले
आणि त्यांनी या भ्रष्टाचाराचा भाग होण्याचे स्पष्टपणे नाकारले. अर्थातच भ्रष्ट
व्यवस्थेत प्रामाणिक माणसाच्या मागे शुक्लकाष्ठ लागणे साहजिकच. मग कमी
महत्त्वाच्या ठिकाणी, दुर्गम भागात पाठवणे, फॅमिलीपासून दिर्घकाळ दूर ठेवणे, चांगल्या कामाचे
कौतुक तर नाहीच पण मुद्दाम वरिष्ठांसमोर कागाळी करत अपमानाच्या संधी शोधणे असे
प्रकार सुरू झाले. त्यातच "मराठवाडय़ातल्या दुष्काळस्थितीवर कायमचा उपाय
म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील सिना नदीखोर्याचा सविस्तर अभ्यास करून डॉक्टरेट
मिळवावी" हा विचार केला आणि आगीत तेल पडले. नाकर्ते वरिष्ठ चिडले आणि त्यांनी
अधिकच त्रास द्यायला सुरुवात केली. यामुळे चिडून उपेंद्रदादांनी ठरवले की, आता काहिही झाले तरी महाराष्ट्र सोडण्यापूर्वी दुष्काळग्रस्त भागासाठी
खात्रीची उपाययोजना करूनच जायचे असे ठरवून त्यांनी संपूर्ण आयुष्यच भूजल या
विषयासाठी झोकून दिले.
महाराष्ट्रात 2011-12 पासून पुढील तीन वर्षें सलग दुष्काळ पडला. त्यातच महाराष्ट्रात सिंचन
घोटाळाही सुरू होता. तो घोटाळा बाहेर येणे व दोषींवर कारवाई होणे लांबच पण एका
दुसर्या घोटाळ्याची चिन्हं दिसू लागली होती, तो म्हणजे
"जलयूक्त शिवार". त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हि योजना बेकायदा
आणि बिनतांत्रिक पद्धतीने सुरू होती. हे थांबवायचे असेल तर तक्रारी -कोर्ट कचेरी
करावी लागेल व त्यात आपल्या बाजूने कोणी उभे राहणार नाही म्हणून आधी महाराष्ट्र
जलसाक्षर करावा लागेल या विचाराने ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून लिहू लागले.
भूजल सारख्या विषयावर लिखाण मराठी वाचकांत लगेचच रूजणारे नव्हते त्यामुळे प्रतिसाद
कमीच तरिही आधुनिक पिढीच्या सोशल मिडियावरचा वावर हेरून तिथे आपले लिखाण जास्त
प्रभावी ठरू शकते अशा अंदाजाने ते अजून जास्त लिहू लागले.
अर्थातच याचा काय तो परिणाम झालाच, आधीच
नाराज वरिष्ठ आता भडकले, लिखाणावर निर्बंध आणू पाहू लागले.
कार्यालयीन कामकाजाचा डोंगर उभा केला. चार-चार अधिकाऱ्यांचे काम एकट्याला, कमी कालमर्यादा, सतत दबाव पण याला भिक घालील तो
मराठा कसला? उपेंद्रदादांनी या संकटाचे संधीत रूपांतर केले,
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा कानाकोपरा फिरून घेतला व आपले
ज्ञान अधिक समृद्ध केले. अशाच एका कार्यक्रमात यशदा (पुणे) येथे त्यांनी जलयूक्त
शिवारातील दोष दाखवणारा एक पेपर प्रकाशित केला. यामुळे चिडून जावून त्यांची बदली
दूर पटना (बिहार) येथे करण्यात आली. उपेंद्रदादांनी बदलीच्या ठिकाणी जाणे नाकारले
व कोर्टात लढायचे ठरवले, दोन वर्षे केस चालली, दादांचे 50 हजार आणि सरकारी पक्षाचे 02 लाख रूपये खर्च झाल्यावर निकाल लागला. "हि
बदली कारस्थानपूर्वकच करण्यात आलेली आहे" हे सिद्ध झाले, दोषींवर आर्थिक दंड ठोठावला गेला. या विजयामुळे आपला मार्ग योग्य आहे याची
खात्री पटून अधिक त्वेषाने लिखाण चालू ठेवले. यातून भूजल विषयक पहिले पुस्तक
"सहज जलबोध तंत्र" जन्माला आले. याचेच बक्षीस म्हणून कार्यालयात
वरिष्ठांनी उपेंद्रदादांचे कौतुक करण्याऐवजी नोटीस
दिली व स्पष्टीकरण मागितले. मात्र"आपण आपल्यावर सोपवलेले काम चोखपणे करतोय
आणि अतिरिक्त वेळेचाच सदुपयोग, तेदेखील स्वखर्चाने लिखाण
-व्याख्यानातून जलसाक्षरता प्रसारासाठी करतोय" असे उत्तर देत “महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी बांधव जलनिरक्षर असल्यानेच त्याच्यावर
अन्याय होतोय आणि त्यासाठी जलसाक्षरता म्हणून जलविज्ञान साहित्य सोप्या भाषेत देणे
गरजेचेच आहे आणि ते मी लिहिणारच" असे त्यांनी वरिष्ठांना ठणकावून सांगितले.
अर्थातच कार्यालयीन कायदे-नियमांचा गाढा अभ्यास असल्याने उपेंद्रदादांनी कारवाईची
फिकीर केली नव्हतीच. त्यामुळे त्यांना लिखाण सुरू ठेवायला अडचण आली नाही.
दरम्यान उपेंद्रदादांनी एक जीवघेणा
अपघातही पाहिला. मानेला गंभीर इजा होण्यावरच भागले पण दीर्घकालीन सुटीवर रहावे
लागले. मात्र हा कालावधी वाया जावू न देता लिखाण -वाचनावर अधिकच भर दिला. याचाच
परिणाम म्हणून उपेंद्रदादा आता वनराई, जलसंवाद अशा मासिकांचे
सातत्यपूर्ण लेखक झाले तसेच लोकमत, सकाळ, अॅग्रोवन , झुंजार नेता हि वर्तमानपत्रेदेखीव
उपेंद्रदादानी लिहिलेल्या लेखांस सातत्यपूर्ण प्रसिद्धी देत राहिले.
कार्यालयीन गैरप्रकार सुरू असताना
महाराष्ट्रात जलक्षेत्रातील बिनतांत्रिकतेच्या घूसखोरीवर रोखठोक भूमिका घेतल्याने
विरोधक आता सर्वत्रच निर्माण होऊ लागले. जलक्षेत्रात चुकीचे प्रशिक्षण देण्यात
येऊन खड्डेखोरीस प्रोत्साहन मिळत आहे आणि जलक्षेत्राचे अक्षम्य नुकसान होत आहे
यावर तातडीने भूमिका घेतली नाही तर "भर पावसाळ्यात दरवर्षी राज्यातील बहूतेक
भागात दुष्काळग्रस्त घोषित करावा लागेल" हा त्यांचा अंदाजही 2018 साली
खरा ठरला पण तरीदेखील शासन दाद देईना. सरकार जागेवरचे हलायला तयार नाहीच व
खड्डेखोरीसही चाप बसेना त्यामुळे उपेंद्रदादा अधिकच अस्वस्थ झाले व त्यांनी यावर
उपाय म्हणून "सहज जलबोध अभियान" घोषित केले. महाराष्ट्रातील सामान्य
माणसाला जलसाक्षर करण्यासाठी एक निश्चित अभ्यासक्रम तयार केला. त्याचा प्रचार
-प्रसार करण्यासाठी 07 पुस्तके लिहिली, 100 हून जास्त वेबिनार व 50 पेक्षा जास्त प्रत्यक्ष
कार्यशाळा आयोजित केल्या,1500 हून जास्त लेख लिहून अभूतपूर्व
असे जलसाहित्य मराठी माणसापूढे ठेवले. शिवाय उपेंद्रदादा हे एक संवेदनशील कवीही
आहेत, त्यांनी आजवर तिनशेहून जास्त कविता केलेल्या
आहेत. अध्यात्म संबंधी त्यांचे शिवगोरक्षयोग विचार लिखाण देखील प्रसिद्ध आहे.
हळूहळू अभियानास प्रतिसाद मिळत गेला, अनेक व्यक्ती
-संस्था जोडल्या जावू लागल्या.
उपेंद्रदादांची हि धडाडी पाहून पून्हा
भ्रष्ट वरिष्ठांनी चाल खेळत त्यांना महाराष्ट्राबाहेर बदलीवर पाठवले पण याहीवेळेस
उपेंद्रदादांनी न्यायालयात धाव घेतली आहे व तिथे लढाई सुरूच आहे. काहीजणांनी
त्यांना "राजीनामा देऊन किंवा स्वेच्छानिवृत्ती घेऊन मुक्तपणे काम
करावे" असा सल्ला दिला खरा पण उपेंद्रदादा म्हणतात,"मी शासनाशी प्रामाणिक आहे व माझा लढा हा शासनाशी नसून व्यवस्थेतील
भ्रष्टांशी आहे, सहज जलबोध तंत्र लोकाभिमुख वैज्ञानिकतेच्या
दृष्टिकोनातून राबवले गेल्यास जलक्षेत्रात क्रांती होऊ शकते".
उपेंद्रदादांनी आपल्या पुस्तकातून
आदर्श भूजल आराखडा, निसर्गबेट, पूरचारी, झिरपा कूंभ आणि खोल जलधर पूनर्भरण अशा नावीन्यपूर्ण संकल्पनाचा अथक
पाठपुरावा सुरू ठेवलाय पण भ्रष्ट, गलथान आणि सर्व प्रकारचे
स्वार्थी हितसंबंध जोपासणारे प्रशासन-सेलिब्रिटी-राजकीय नेते यामुळे महाराष्ट्र
अद्यापही जलक्षेत्रात क्रांतीच्या प्रतिक्षेत आहे. नियंत्रणशून्य पाणीवापर,
पावसाळ्यात टँकर, धरणाच्या पाण्याची पळवापळवी,
शेतकरी आत्महत्या हे दुष्टचक्र महाराष्ट्र दरवर्षी पहातोय. पण सहज
जलबोध अभियानास वाढता प्रतिसाद उत्साह वाढवत आहे. महाराष्ट्रात याआधी कोणीही
सरकारी अधिकारी म्हणून केले नसेल एवढे लिखाण उपेंद्रदादांनी लिहिले आहे. वैयक्तिक
आर्थिक अडचणी व समाजात वावरताना सातत्याने विरोधकांशी संघर्ष व तरीही
जलसाक्षरतेसारखा ''थँकलेस वसा" घेऊन अविरत प्रयत्न
सुरूच आहेत. नुकतेच एका संस्थेने दादांना ''कुलदीपक" पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी
दादा म्हणाले,''कार्यालयीन भ्रष्टाचार, मियावाकीस बढावा, वाटर कप स्पर्धेतील बिनतांत्रिकता,
जलयूक्त शिवार अंमलबजावणी, जलसाक्षरता
केंद्राची अकार्यक्षमता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकप्रतिनिधींचे या सगळ्या
बाबतीतले अज्ञान-अनास्था यावर सातत्याने कठोर-परखड टिका करून समाजाच्या भल्यासाठी
जे वाईटपण मी घेतलेय त्या संदर्भात सत्याची प्रचिती होईल, तो
खरा सुदिन, शासन मी सुरू केलेल्या सहज जलबोधाची नक्कीच दखल
घेईल, तो खरा माझा सन्मान".
उपेंद्रदादांनी पाहिलेले स्वप्न लवकरच
पूर्ण होईल कारण सहज जलबोध अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी निसर्गबेट, जल आराखडे निर्माण होत आहेत.
लोक स्वखर्चाने त्यात भाग घेत आहेत. शासनाकडूनही
याबाबत माहिती घेणे, चर्चा करणेस सुरूवात झाली आहे.
ज्या खात्यातील भ्रष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपेंद्रदादांस त्रास
दिलाय त्याच खात्यातील काही चांगले वरिष्ठ अधिकारी दादांच्या चांगल्या कामाची दखल
घेत त्यास विविध पातळ्यांवर पोचवत आहेत. "आता
थांबणे नाही" हा उपेंद्रदादांनी रूढ केलेला मंत्र त्यांचे हितचिंतक -सहकारी
देखील जपत आहेत आणि दादांना सक्रिय पाठिंबा देत आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रात
उपेंद्रदादा धोंडे हे नाव सहज जलबोधकार म्हणून परिचित आहेच पण लवकरच
उपेंद्रदादांनी सुरू केलेली हि चळवळ देशभरातही पसरेल. दि.
09 सप्टेंबर 2020 रोजी उपेंद्रदादा
धोंडे त्यांच्या खात्यामार्फत कार्यक्रमात संपूर्ण देशभरास संबोधित करणार आहेत. या
कार्यक्रमाद्वारे "महाराष्ट्रात त्यांनी रोवलेली जलसाक्षरतेची
मुहूर्तमेढ" संपूर्ण भारतात पाहिली जाईल. उपेंद्रदादांनी पेरलेले हे बीज
वटवृक्ष बनो यासाठी त्यांना शुभेच्छा.
मयुर
बाळकृष्ण बागुल,
राज्य
समन्वयक – सहज जलबोध अभियान, पुणे
चलभाषा
– ९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment