एखादा साथीचा आजार किंवा त्यामुळे
होणारे हजारो मृत्यू या केवळ वैद्यकीय किंवा आरोग्य सुविधांशी निगडित समस्या
नसतात. आर्थिक, सामाजिक, राजकीय परिमाणेही
त्याला असतात. 'करोना' विषाणूच्या
प्रसाराच्या पार्श्वभूमीवर चीनचा या बाबतीत विचार केला, तर
आतापर्यंत चीनने केलेली विकासाची घोडदौड आणि त्या अनुषंगाने 'करोना'वर चीनने केलेले उपाय विचारात घ्यावे लागतील.
चीन हा उत्तम वैद्यकीय सुविधा आणि अद्ययावत रुग्णालयांसाठी ओळखला जातो. चीनमध्ये
गेल्या शतकात सर्वांत वेगाने विकास झाला आहे. चीनची अर्थव्यवस्था आज जगामध्ये
दुसऱ्या क्रमांकाची आहे. या पार्श्वभूमीवर 'करोना'मुळे चीनची झालेली हानी निश्चितच चिंताजनक होती पण, इतक्या
विकसित देशामध्ये अशी कुठली कारणे आहेत, की ज्यामुळे 'करोना'मुळे अनेक नागरिकांचे मृत्यू झाले? चीनने 'करोना' विषाणूशी संघर्ष
कसा केला, तो यशस्वी ठरला, की अपयशी,
हा साऱ्या जगासाठीच एक खुप मोठा धडा आहे.
'करोना' चा फटका मोठा बसू शकतो,
याची जाणीवच मुळात चीनला खूप उशिराने झाली असे दिसते. चीनमध्ये
डिसेंबर महिन्यात 'करोना'चा पहिला
रुग्ण सापडला. पण, राष्ट्रीय स्तरावर पूर्ण क्षमतेने त्याविरोधात
यंत्रणेने दीड महिन्यांनंतर काम सुरू केले. साथीच्या आजाराची घोषणा दीड महिना
उशिराने झाली. त्याचाच परिणाम म्हणजे 'करोना' विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या तेथे मोठी दिसते. चीनने 'करोना'शी ज्या पद्धतीने सामना केला, त्यावरून त्यांचे एका बाजूला कौतुक होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर
टीकादेखील केली जाते. वास्तविक चीनने जे उपाय योजले, तसेच
उपाय इटली, जपान, दक्षिण कोरियाने देखील
केले. मात्र, चीनने केलेल्या या उपाययोजना प्रत्येक ठिकाणी
तेथील परिस्थितीनुसार कितपत आणि कशा प्रकारे लागू करता येतील आणि असे उपाय संबंधित
देशांमध्ये कितपत यशस्वी होतील, हे पाहणे गरजेचे आहे.
चीनमध्ये २००२-०३च्या सुमारास 'सार्स'ने थैमान घातले होते. पण, त्या वेळच्या परिस्थितीमध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये फरक आहे. २००३ मध्ये
जागतिक जीडीपीमध्ये चीनचे योगदान चार टक्के होते. २०१९ मध्ये हेच प्रमाण १६
टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे या आजाराचा चीनवर जो परिणाम झाला, त्यामुळे एकूण जगालाच त्याची किंमत चुकवावी लागत आहे. जागतिक
उदारीकरणानंतर चीनमध्ये मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचे प्रमाण वाढले आहे. 'करोना'मुळे सर्वांत जास्त फटका या वर्गाला बसला आहे.
तसेच, जगातील जवळपास सर्वच मोठ्या देशांनी या साथीच्या
आजाराच्या गांभीर्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. तसेच, चीनने
केलेल्या उपाययोजनांकडेही फारसे लक्ष दिले नाही. कुठल्याही उपाययोजना न करता हा
विषाणू नष्ट व्हावा, हाच जणू काही या देशांचा मानस होता.
जागतिक पातळीवर आर्थिक व्यवहारामध्ये सक्रिय देशांनी एक बाब ध्यानात घ्यायला हवी,
की साथीचे रोग केवळ आरोग्याशी निगडित आणीबाणी असत नाही. त्याचा
संपूर्ण जगावर विविध पातळ्यांवर परिणाम होत असतो.
चीनमध्ये २००३ पेक्षा आताची आरोग्य यंत्रणा
निश्चितच अधिक चांगली आहे. पण, केवळ पायाभूत सुविधा उत्तम
असल्याने परिस्थिती आटोक्यात येत नाही. चीनची आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक ही
प्रामुख्याने मोठी रुग्णालये आणि शहरांमध्ये राहिली आहे. तेथील सरकारने पायाभूत
सुविधांवर मोठा खर्च केला आहे. पण, आरोग्य क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये
चीनला म्हणावे तितके यश आलेले नाही. हुबेई प्रांतात असलेल्या एकूण अद्ययावत
वैद्यकीय सुविधांपैकी निम्म्या सुविधा एकट्या वुहानमध्येच आहेत. पण, एकूण प्रांताच्या तुलनेत तेथील लोकसंख्या केवळ एक पंचमांश आहे. वुहानमधील
परिस्थितीचे ज्या प्रमाणात वार्तांकन झाले, तितके ग्रामीण
भागातील 'करोना'च्या प्रसारावर झालेले
नाही. चीनच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा म्हणावी तितकी सक्षम नाही.
या आजाराचा फटका कारखाने आणि दैनंदिन सरकारी
कामे याबरोबरच रोजगाराला बसण्याची भीती आहे. वुहान आणि इतर ठिकाणी चीनने 'करोना'ला आटोक्यात आणण्यासाठी ज्या पद्धतीने कठोर
उपाय योजले, त्याने 'करोना' आटोक्यात आला. पण, त्यासाठी चीनला खूप मोठी किंमत
मोजावी लागली. 'करोना' खेरीज इतर आजार
ज्यांना झाले होते, त्यांनाही मोठा फटका यामुळे बसला आहे.
चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते घराघरांवर लक्ष ठेवून सरकारी आदेशांचे
कितपत पालन केले जात आहे, की नाही यावर लक्ष ठेवून होते.
एखाद्या ठिकाणी आदेशाचे उल्लंघन झाले, तर त्याची माहिती
वरिष्ठ पातळीवर दिली जाते. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती झाली, त्या वेळेपेक्षा वेगळी सामाजिक परिस्थिती तेथे आताही नाही. कठोर शिस्तीचा
बडगा आजही तेथे आहे.
अमेरिकेबरोबर चाललेल्या
व्यापारयुद्धामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांचे चीनवरील अवलंबित्व कमी करीत
आहेत. त्यामुळे पुरवठादारांची मोठी फळी असणे किती गरजेची आहे, हे 'करोना'मुळे उद्भवलेल्या
संकटामुळे प्रकर्षाने दिसले आहे. चीनने राबविलेल्या उपाययोजनांमुळे हुबेई
प्रांतातील 'करोना'चा प्रसार बऱ्यापैकी
आटोक्यात आला. चीनसारख्याच उपाययोजना इटली आज राबवित आहे. अनेकांना अनेक आठवडे
विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. सामाजिक स्तरावर एकमेकांपासून योग्य अंतर ठेवून
राहण्याच्या उपाययोजना साथीच्या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात योग्य असतात,
असे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे इलियास मोसिआलोस सांगतात. चीनमध्ये
सुरुवातीला यापैकी काहीच केले गेले नाही. सामूहिक कार्यक्रमांवर बंदी, लोकांच्या फिरण्यावर बंदी, औषधनिर्मिती आणि वितरणावर
नियंत्रण, नागरिकांवर पक्ष कार्यकर्त्यांनी ठेवलेली नजर हे
चीनने योजलेले उपाय स्तुत्य आहेत. पण याच काळात नोकरी जाण्याच्या भीतीमुळे अनेक 'करोना'ग्रस्तांची नोंदणीच करण्यात आली नसल्याची भीती
व्यक्त होत आहे. चीनमधील 'करोना'ग्रस्तांचा
आकडा प्रत्यक्षात बराच मोठा होता परंतु त्यातून चीन सावरला आणि आज इतर देशांना आहे.
चीनमध्ये 'करोना' मुळे उद्भवलेल्या थैमानानंतर यातून योग्य तो धडा घेण्यासाठी भारताला
जवळपास तीन महिन्यांचा कालावधी मिळाला होता. आतापर्यंत आपल्या येथे झालेल्या
उपाययोजना निश्चितच चांगल्या स्वरूपाच्या आहेत. 'करोना'
चा प्रसार होऊ नये, म्हणून देशात अनेक
उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भारता अनेक जमेच्या बाजू आहे. त्यात भारतातील उष्ण
वातावरण व देशातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही युवकांची आहे. देशातील एकूण विचार
केला तर नोटबंदी मुळे उद्योग व व्यवसाय यांना लागलेली उतरतीकळा लक्षात घेता 'करोना'मुळे देशाचा आर्थिक विकास आणखी मंदावण्याची
शक्यता आहे. जगातील अनेक देशांसोबत एक शीत युद्ध आहे असे वाटते. चीन हा देश इतर
प्रगत राज्यावर आर्थिक ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न येथून पुढे करेल परंतु भारत
आणि अमेरिकेचे एकूण मैत्रीपूर्ण संबधाचा विचार करता भारताला अमेरिका सहकार्य करेल
का? जगात महासत्ता निर्माण होण्यासाठी कोरोनाच्या निमित्ताने आर्थिक खेळी खेळून
चीन महासत्ता बनू पाहते का? भारताला इतर प्रगत राष्ट्रांनी सहकार्य केल्यास आणि
भारतीय नागरिकांनी परिस्थिती समजून घेतल्यास भारत देखील आर्थिक संकटातून सावरून
पुढे येऊ शकतो. भारत कृषी प्रधान देश आहे त्यामुळे कृषी अर्थव्यवस्था कडे लक्ष
देऊन शेतकरी विरोधी कायदे रद्द करून ग्रामीण भागात आणि शहरात स्वदेशीला चालना दिली
तर निशिचत पणे देश पुढे जाऊ शकतो. बाहेरील देशातून भारतात परतलेले नागरिक यांनी
याचं देशात राहून देशाच्या विकासासाठी काम केलं तर देश देखील महासत्ता होण्यासाठी
स्पर्धत बघायला दिसेल असे वाटते. आणण सर्वांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना केला,
तर 'करोना'ला आपण
निश्चितच निष्प्रभ करू शकू. देशाला भविष्यात नेतृत्व जगाचे करण्यासाठी ही एकजूट
महत्वाची असेल.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment