Wednesday, November 11, 2020

भूजल पाण्याचा विचार कोण करतोय....!

 

 

भविष्यात जर तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल, असे जगभरातले शास्त्रज्ञ, संशोधक आणि विचारवंत यांचे म्हणणे आहे. आणि ते शंभर टक्के खरेही आहे. कारण पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही, असे असताना मात्र दिवसेंदिवस पाण्याची टंचाई वाढू लागली आहे. हळूहळू पाण्याची समस्या भीषण स्वरूप धारण करू लागली आहे. यावर वेळीच योग्य ती उपाययोजना केली गेली नाही तर समस्त जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येणार यात शंका नाही. पाणीटंचाईचे दुष्परिणाम या ना त्या कारणाने आता जगभर जाणवू लागले आहेत. एकीकडे जल प्रदूषणाचा अतिरेक, पृथ्वीचे वाढणारे तापमान, निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र, पर्जन्याचे कमी होत जाणारे प्रमाण, वारंवार निर्माण होणारा दुष्काळ, तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, पाण्याचा मर्यादित साठा, भरमसाठ होणारा अपव्यय या आणि अशा अनेक कारणांमुळे केवळ मानवजातच नव्हेतर पृथ्वीवरील एकूण जीवसृष्टीच धोक्याच्या सीमेवर येऊन उभी राहिली आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन समस्त मानव जातीने पाण्याबाबत जागृत होऊन स्वच्छ व पिण्यास योग्य अशा पाण्याच्या संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे!

पाणी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना केली गेली नाही तर भविष्यात निर्माण होणाऱ्या संकटाची चाहूल ओळखूनच लोकांमध्ये पाण्याबाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून, सन 1992 साली रिओ दी जॅनेरो येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. खरेतर पृथ्वीवर एकूण 70 टक्के भाग हा जलमय आहे. परंतु एवढा मोठा प्रचंड पाणी साठा या पृथ्वीवर उपलब्ध असतानाही यापैकी अगदी थोड्याच प्रमाणात जीवसृष्टीला पिण्यास योग्य असणारे गोडे पाणी पृथ्वीवर उपलब्ध आहे. त्यातही जवळपास 75 टक्के गोडे पाणी ध्रुवीय प्रदेशात गोठलेल्या अवस्थेत तर जवळपास 22 टक्के पाणी पृथ्वीच्या भूगर्भात आहे. यापैकी अगदीच थोडे पाणी वापरण्याकरिता उपलब्ध आहे. उरलेले पाणी नदी, तलाव व जलाशय यामध्ये आहे. याउलट पृथ्वीवर लोकसंख्या, उद्योगधंदे यांची संख्या मात्र दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. त्या अनुषंगाने प्रतिदिन एका छोट्या कुटुंबाला सरासरी 30 ते 50 लिटर स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची गरज भासते. एकूण पृथ्वीचा विचार करता जगामध्ये दरवर्षी जवळपास दीड हजारपेक्षा अधिक क्युबिक किलोलिटर्स सांडपाणी तयार होते. आणि त्याही पेक्षा वाईट म्हणजे हे पाणी गोड्या पाण्याचा अपव्यय होऊन निर्माण झालेले असते. म्हणूनच आपल्याला पाणी संवर्धनासाठी सतर्क राहणे आवश्यक असून, नदी, ओढा, तलाव, विहीर अशा जलस्त्रोतांना प्रदूषणमुक्त व स्वच्छ, सुरक्षित ठेवणे आपले कर्तव्य आहे. त्याच बरोबर पावसाच्या पाण्याचेही जलसंवर्धन होणे गरजेचे आहे. अगदी छोट्या छोट्या बाबींची दक्षता जर आपण घेतली तर ही गोष्ट अशक्य नाही. उदा. पाण्याच्या ठिकाणी गोरेढोरे धुणे तसेच धुनीभांडी करणे टाळायला हवे. त्याचबरोबर सांडपाण्याचा योग्य निचरा करणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कचरा निर्माल्ये टाकून नद्या प्रदूषित करू नयेत. कारण पाण्याच्या जागृतीबाबत केवळ शासन पातळीवरच प्रयत्न करून चालणार नाही तर सामान्य माणसाचाही यासाठी महत्त्वाचा सहभाग आवश्यक आहे. या लोकसहभागातून जलसमृद्धी साधता आली तरच पाणी वाचेल पर्यायाने जीवन वाचेल !

 

पाण्याला जीवन असे म्हटले जाते. म्हणजे पाणी जीवनासाठी आवश्यक असते, हा त्याचा एक अर्थ झाला. पिण्यासाठी आपल्याला पाणी लागते. शरीरशुद्धीसाठी, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजेच अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाणी लागते. औद्योगिक क्षेत्रात पाण्याची आवश्यकता असते. ऊर्जानिर्मितीसाठी, मग ती जलऊर्जा असो किंवा औष्णिक वा अणुऊर्जा, त्यासाठी पाणी हेच माध्यम असते. शेती क्षेत्रात तर पाण्याची गरज फार मोठी असते. पाण्याची आवश्यकता अशी सर्वच क्षेत्रांत जाणवत असताना त्या पाण्याविषयी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. तरीदेखील पाण्याविषयी शास्त्रीय माहिती समाजात अभावानेच आढळते. कोलंबसने जहाजावर अनेक दिवस सतत प्रवास करीत असताना म्हटले होते की, ‘‘सगळीकडे पाणीच पाणी आहे, पण पिण्यासाठी मात्र एकही थेंब नाही!’’  पाच महासागरांमध्ये व अनेक सागरांमध्ये जे खारे पाणी आहे त्याने पृथ्वीवरील एकूण ७२ टक्के भूभाग व्यापलेला आहे. एकूण पाण्याच्या साठय़ांपकी ९६.५% खारे पाणी असून, फक्त १.५ ते १.७५ टक्के पाणी गोडे आहे. उरलेले पाणी आíक्टक व अंटाíक्टक महासागरातील बर्फामध्ये बंदिस्त असून निसर्गात जलचक्र सतत सुरू असते.
जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतशी पाण्याची गरजदेखील वाढत आहे व त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या या जलचक्रावर परिणाम होत आहे. जगातील सांडपाण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र भूजलाची पातळी खाली जात आहे. वाढत्या शहरीकरणामुळे व त्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतुकीच्या सुविधा  पुरविण्यासाठी जे रस्ते बांधले जात आहेत, त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण विलक्षण वेगाने कमी होत आहे. परिणामी जो पाऊस पडतो त्याचे पाणी वाहून जाते व त्याचा उपयोग आपल्याला करता येत नाही. पदार्थाच्या अविनाशित्वाचा नियम जरी पाण्यालाही लागू असला तरी उपलब्ध असलेले गोडे पाणी कमी होत चालले आहे व पाण्याच्या चक्रात अडथळे येऊन ते आता लडखडत चालत आहे. हा प्रकार असाच चालत राहिला तर पुढचे महायुद्ध पाण्यावरून लढले जाईल, यात शंकाच नाही. आपल्या देशात राज्याराज्यांमध्ये पाण्यावरून भांडणे होत आहेतच व त्यांची तीव्रतादेखील वाढत चालली आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी जर आपल्या देशात कोणी भाकीत केले असते की, येथे पाण्याच्या बाटल्या विकल्या जातील, तर त्याला विनाचौकशी येरवडय़ाला धाडले असते. पण आता परिस्थिती मात्र झपाटय़ाने बदलली आहे. तांब्याच्या भांडय़ात ठेवलेले पाणी जिवाणुमुक्त राहते हे विसरून आपण आता अधिकाधिक महाग व ऊर्जेवर अवलंबून असलेल्या  पाणी शुद्धीकरण पद्धती वापरू लागलो आहोत. पाणी शुद्धीकरणाची उपकरणे आता काळाची गरज झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचे नियोजन हा आपल्यासाठी खरं तर अगदी जिव्हाळ्याचा विषय असायला हवा. पाणी ही माणसाच्या जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. म्हणूनच या जीवनाचीही समस्या सोडवायची असेल, तर ठोस धोरण आखलं गेलं पाहिजे; अन्यथा सरकारं येतील आणि जातील, पण पाण्याचा प्रश्न मात्र तसाच राहील. किंबहुना तो काळाबरोबर आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर अधिकच बिकट होत जाईल. त्यामुळे केवळ राजकीय आश्वासनं देऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्याकरता उपलब्ध पाणीसाठय़ांची माहिती घेण्याबरोबर पुढील २५ वर्षांमधली पाण्याची पिण्यासाठीची, निवासी, औद्योगिक आणि शेतीसाठीची गरज किती व ती भागवण्यासाठी या पाणीसाठय़ांचा वापर कसा करावा याविषयीचा सखोल अभ्यास गरजेचा आहे. भूजल ही नैसर्गिक साधनसंपत्ती असून भूगर्भातील त्याची उपलब्धता मर्यादित आहे. सद्य:स्थितीत ग्रामस्तरावर भूजल व्यवस्थापनापेक्षा विकासावरच जास्त भर देण्यात येत असल्यामुळे भूजलाचा होणारा अपरिमित उपसा, जास्त पाणी लागणारी पिके घेणे, पाणी विक्री व त्यामुळे अतिउपशाकडे राहणारा कल या बाबी भूजलाची पातळी घटण्यास जबाबदार आहेत.  कृषी-अर्थ व्यवस्थेचा भूजल हा कणा आहे. परंतु राज्यातील भूजल उपलब्धतेचा आढावा घेतला असता, अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्राची संख्या वाढत असल्याचे दिसून आले. माझ्या जमिनीखालील पाण्यावर माझीच मालकी या विचाराने पर्यावरणविषयक बाबींचा फारसा विचार न करता भूजलाचा उपसा करण्याची मानसिकता त्याला जबाबदार आहे. नद्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील सिंचन विहिरींच्या अतिउपशामुळे नद्यांची अधिक काळ वाहण्याची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. त्याचा पर्यावरण व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावरही विपरीत परिणाम झाला आहे. दर वर्षी पावसाद्वारे निर्माण होणाऱ्या भूजल उपलब्धतेचा विचार न करता निव्वळ अधिक-अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या स्पर्धेमुळे अतिखोल विंधण विहिरी मोठय़ा प्रमाणात घेतल्या जात असून त्याचा भूजल पातळीवर विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत चांगला पाऊस होऊनही भूजल भरणा म्हणजेच पुनर्भरण पुरेसे होत नसल्याने पाणी टंचाईसारख्या संकटाला आपल्याला सातत्याने सामोरे जावे लागत आहे.आपल्या भविष्याकरता जर आपण हे धोरण म्हणून गंभीरपणे पाळलं नाही, तर आपल्या पुढल्या पिढय़ांना पाण्यावाचून तडफडून मृत्यू पत्करावा लागेल. याचं भान आत्मकेंद्री स्वार्थीपणाला मूठमाती देऊन ठेवले पाहिजे, तरच आपण पाण्याचा हा प्रश्न सोडवू शकू.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९ 

No comments:

Post a Comment