Wednesday, November 11, 2020

युवाशक्ती हीच खरी महाशक्ती

 


आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात आलेल्या या गतीमुळे आपली स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणाऱ्या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणाऱ्या विचारांची निस्सीम गरज आहे. अशावेळी फियरलेस मंक म्हणजेच स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मदत करतात व नवीन चैतन्य ही देतात. तरुणाईत प्रचंड विश्वास असल्यामुळे ते नेहमी सांगत की सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते व त्यामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्‍चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, “उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका”. एखादे ध्येय निश्‍चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.

खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत?  हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत  - खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या  तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.

 

 तरुण वर्गाविषयी विचार व त्यांना देण्यात येत असलेले महत्त्व वेगळ्या प्रकारचे आहे. समाजाचा विचार करताना वर्गानुसार, जातीनुसार गट पाडुन विश्लेषण केले जाते. वयानुसार समाजाची विभागणी करुन युवक हा वेगळा सामाजिक गट निर्माण करण्याची प्रवृत्ती नवीन आहे. त्याचप्रमाणे तरुण माणसांनाही आपण युवक म्हणुन कोणीतरी वेगळे आहोत, वेगळी सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे व समाज परिवर्तनाच्या कामात आपल्याला विशेष स्थान आहे, ही जाणीव होत आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत आसतानाच काही गोष्टींचे भान तरुण वर्गाने ठेवले पाहीजे या मध्ये प्रमुख म्हणजे नैतिकता, विचारसरणी व आदर्शवाद.  आपण जसे वागणार आहोत, जी कार्ये करणार आहोत ती इतर  कुणाला लक्षात ठेवाविशी वाटली नाहीत तरी काळ व इतिहास यांना मात्र निश्चितच नोंद घ्यावी  लागेल. इतिहास हा संदर्भासाठी असतो. जेव्हा नवीन पिढी गतकाळाची पाने उलगडुन बघेल त्यावेळेस आत्ताचा इतिहास त्यांना सामोरा येईल. माणूस अनुकरणप्रिय जरुर आहे, मात्र ब-याचवेळेस वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होते. उद्या एखाद्या चुकीच्या प्रथेचा पायंडा पडू नये याची खबरदारी घेणे हे प्रत्येक तरुण पिढीसमोरील प्रथम आव्हान आहे. त्यामुळे आज ज्या वाटेवर आपण चालतोय ती नैतिक की अनैतिक हे बघणे गरजेचे आहे. 

 

 

भारतीय युवकाच्या दृष्टिने स्वामी विवेकानंद, महात्मा   गांधी व अगदिच अलिकडल्या काळातील म्हटले तर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा उल्लेख होईल. यानांच आदर्श का म्हणावे यामागील काही महत्वाची कारणे विषद करणे मला महत्वाचे वाटते. त्यांचे नुसते ज्ञानच प्रचंड आहे ,एवढेच नाही तर  त्यांची नैतिकता व सखोल विचार  करण्याची प्रवृत्ती. गौतम बुद्धानी  केलेल्या , " मी सांगतो आहे म्हणुन माझ्यावर विश्वास ठेवु नका, धर्मग्रंथात आहे म्हणुन आंधळेपणाने स्विकार करु नका तर सर्व विचार तुमच्या बुद्धिवर तपासुन पहा आणि योग्य अयोग्य काय ते ठरवा " , या उपदेशाचे तंतोतंत त्यांनीं पालन केले.  साधे जीवन जगत उच्च विचारसरणी जोपासली. त्यांची काम करण्याची पद्धत, सचोटी, जगाकडे व जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन, काहीतरी बनुन दाखवण्याची मनीषा व आपण जगाला काहीतरी देणे लागतो ही भावना  हे त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या अनेक पैलुंपकी काही आहेत. 

 

 ही आदर्श व्यक्तिमत्व घराघरात नुसती पोहोचवणच नव्हे तर ती तिथे रुजवण व निर्माण करणे युवकांपुढे  प्राथमिक आहे. हे घडवताना काही जोड आव्हाने , उदाहरणार्थ प्रबोधन, शिक्षण, बेरोजगारी सारखी युवा वर्गासमोरील मोठी समस्या, आदर्शवाद व वै चारीक जडणघडण इत्यादी विचारात घेणे आवश्यक आहे. आजची पिढी रुळ सोडुन धावते आहे ,असे स्वर  कानी पडतात. अशा या द्रुतगतीने धावण्या-या गाडीला एका चालकाची गरज आहे व तो चालक म्हणुन आपल्याला युवा प्रबोधनाकडे पाहता येईल. 19 व्या शतकातील ज्या प्रकारची युरोपची उन्नती झालेली दिसते त्यामध्ये युवा प्रबोधनामुळे झालेले चमत्कार  ठळकपणे दिसून येतात. भारतामध्येही असे प्रबोधन गेल्या काही वर्षात वेगाने झाले. पण यास परंपरागत पार्श्वभुमीची सांगड होती. त्यामुळे हे  प्रबोधन वरचेवर  राहीले व त्याची सामन्य तरुणांवर तितकिशी पकड बसली नाही. तेव्हा खेड्यापाड्यातील तरुणांना प्रबोधीत करणे हे एक महत्वाचे व आकाराने मोठे असे आव्हान म्हणता येईल. 

 

 या प्रबोधनाचे फ़लीत म्हणुन आपणास युवक चळवळीकडे बघता येईल. स्वातंत्र चळवळीनंतर, देशव्यापी स्वरुपावर फ़क्त संपच दिसतात. युवकांना राजकारणी लोक केवळ मतदार म्हणून पहातात व राजकीय फ़ायद्यासाठी त्यांचा उपयोग बरेचदा करुन घेतात. त्यांच्या समस्यांकडे  ख-या अर्थाने पाहिलेच जात नाही. युवा संघटना, मग ती कुठलीही असो, अभाविप वा इंदिरा युवक कॉग्रेस, विद्यापिठांच्या वा विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादीत रहाते. युवकांचे सामाजिक प्रबोधन,  रोजगार  उपलब्धता, व्यक्तिमत्व विकास यांकडे कानाडोळा केला जातो. ही परिस्थीती हाताबाहेर जाण्याआधीच युवकांना जागृत करणं व त्यांच्या इच्छाशक्तीला प्रबळ चालना देणे नैमित्तीक आहे.  तरुण पिढिला धेयवादी व आदर्शवादी बनविण्याची ताकद त्यांच्या  इच्छाशक्तीच्या विकासात आहे.  जेव्हा या तरुणांना ध्येयाने पछाडले जाईल, संकटांना सामोरे जाण्यासाठी निधडी छाती निर्माण होईल, आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अंगी येईल  त्यावेळेस उज्ज्वल भारतवर्षाची निर्मिति होऊ शकेल. ही जबाबदारी पेलणे हे जबरदस्त आव्हान नियतीने तरुणां समोर ठेवले आहे. या आव्हानाला सामोरे जाताना दुसरे पुढे ठाकणारे आव्हान म्हणजे समाजकारण व राजकारणात युवा शक्तीचा सहवास. ढोबळमानाने युवा समाजाचा विकास हाच उद्याच्या समाजाचा विकास आहे.

 राजकारण भ्रष्ट झाले आहे आणि त्यात सुधारणा झाली पाहिजे हे आजच्या तरुण पिढीला वाटते, पण स्वतः राजकारणात उतरून त्यात सुधारणा करणे हे आजच्या तरुणाला मान्य नाही. तो सक्रिय राजकारणात सहभागी होऊ ईच्छित नाही. परंतु जो पर्यंत नाल्यात किंवा गटारीत उतरल्याशिवाय घाण साफ होत नाही, तसेच स्वतः सक्रिय राजकारणात सहभागी होऊनच नवीन सुधारणा घडवून आणले जातात, हे या तरुणांच्या मनावर बिंबावणे महत्वाचे आहे. कारण आजचा युवक हा राजकारण एक करिअर म्हणून पाहत नाही. कारण त्याच्या मनात एक अनामिक भीती नेहमीच असते, कि पुढे जाऊन आपल्याला संधी नाही मिळाली तर आपले करिअर, आयुष्य बरबाद होईल हा विचार तरुणांना नेहमीच राजकारणात सक्रिय होण्यापासून रोखतो. त्यात पण राजकारणातील घराणेशाही, या घराणेशाहीमुळे नवीन नेतृत्वाला संधी मिळत नाही,असा तरुणांचा गैरसमज आहे. असे नाही की आजच्या पिढीला राजकारणाची आवड नाही,त्याला समाजात नवीन बदल पाहिजेत परंतु स्वतः सहभागी होऊन तो जबाबदारी घेऊ ईच्छित नाही. आजच्या युवकात देशाचे भविष्य आणि वर्तमान घडवण्याची क्षमता आहे. पण देशात अशा काही संस्था आणि संघटना आहेत, जे आजच्या तरुण पिढीला जात, धर्म आणि प्रदेशाच्या नावावर भडकवून त्यांना संकुचित मनोवृत्तीखाली आणून विध्वंसाकडे नेण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्रपुरता विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा तरुण वर्ग खूप मोठा आहे, त्यांच्या नावावर काही संस्था आणि समाज कंठक या तरुण वर्गाला भडकविण्याचे काम करत असतात. पण युवकांनी अशा प्रकारच्या लोकांपासून नेहमीच दूर असले पाहिजे, भलेही ते आपल्या जातीचे अथवा धर्माचे असो. देशातील युवकांनी विकासाच्या विविध विषयाचं विचार करणे गरजेचे आहे. आज मात्र युवक याकडे दुर्लक्षित होऊन सोशल मिडीयात पूर्ण अटकला आहे. युवक कश्यापद्धतीने यात गुंतला जाईल आणि त्यांचे दुर्लक्ष होईल हा डाव आखला जातो. अभावी जगात चुकीच्या गोष्टीचे चित्र निर्माण करून त्यावर युवकांचा विश्वास निर्माण करायचा आणि त्याला गुलाम करायचे एवढे मात्र आज होताना निश्चित दिसते.

 

          खऱ्या अर्थाने देश प्रगत व्हायचे असेल तर युवकांनी वाचन केले पाहिजे. आपल्या सोभवताली घडणाऱ्या प्रत्येक घटना आपण समजून घेऊन चुकीच्या गोष्टी विरोधात लिहिले व बोलले पाहिजे तर खऱ्या अर्थाने देशात युवक जागृत आणि समाज घडवण्याच्या प्रक्रीये मध्ये युवकांची वाट मोठा असेल यात मात्र शंका नाही.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९

 

 

 

No comments:

Post a Comment