Friday, December 18, 2020

देवराई निसर्गसंवर्धनाचा सांस्कृतिक वारसा

 

“देवराई निसर्गसंवर्धनाचा सांस्कृतिक वारसा”

            पर्यावरणच्या संरक्षणासाठी काम करणारे डॉ. उमेश मुंडल्‍ये यांचे देवराई हे पुस्तकं मागील काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. पुस्तकात मी देवराई विषयी वाचन करत असतांना हे पुस्तकं पर्यावरण क्षेत्रात तसेच एकूण भौगोलिक परिस्थिती बद्दल ज्यांना आस्था आहे त्यांच्या पर्यत पोहचवणे उचित वाटले. आज नवीन पिढीला देवराई म्हणजे काय असते हे शहरात राहून तरी माहिती होत नाही. देवराई हे पुस्तकं वाचल्यापासून लक्षात येते की आपल्या पूर्वजांकडे किती ज्ञान होते ते कधी गांभीर्याने आपण घेत नाही. पुस्तकात अनेक गोष्टी समजण्यास मदत होते. आंब्याच्या झाडाचे जंगल म्हणजे आमराई तसेच देवासाठी राखून ठेवलेली जंगले म्हणजे देवराई किती छान व सुंदर संकल्पना आहे. ही देवाचं जंगलं त्याची झाडाझुडपं पुर्वी म्हणे अशा अनेक देवराया महाराष्ट्रात होत्या. अशा देवराईत देवाचं वास्तव्य असल्यामुळे अशा जंगलातील पानपान वर्षोंवर्षे सुरक्षित राहत असे.

मागील काही वर्षांपूर्वी जागतिक बँकेने दिलेल्या निधीतून महाराष्ट्रातील देवरायांची काय परिस्थिती आहे याविषयी पाहणी, अभ्यास करण्याचा प्रकल्प बी.एन.एच.एस. मध्ये करण्याचे ठरले. डॉ. उमेश मुंडल्ये यांची निवड त्‍या प्रकल्पासाठी झाली होती. त्‍यापूर्वी प्रसिद्ध संशोधक माधव गाडगीळ व वर्तक यांनी तीस वर्षे देवरायांवर संशोधन करून पुणे -सातारा -सांगली या विभागातील चारशे देवरायांचा अभ्यास केला होता. त्यांनतर देवराई या विषयावर डॉ. उमेश मुंडल्ये यांनीच सखोल अभ्यास केला आहे. डॉ. मुंडल्ये यांनी सुरुवातीला सावंतवाडी मधील देवरायांना भेटी दिल्या त्यावेळी रेव्हेन्यू खात्यात त्यांनी चौकशी केली असता तेथे तब्बल साडेचारशे देवराया असल्याचे त्यांना कळले. यांनी १९९७ ते २००१ या चार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात ३७८३ देवराया असल्याचे दाखवून दिले. त्‍यासाठी त्यांना सरकारच्या रेव्हेन्यू खात्यातील नोंदींचा उपयोग झाला. त्यापैकी सुमारे १४५० देवरायांना त्यांनी स्वतः भेट दिली आहे. त्‍या भेटींदरम्यान त्यांनी संशोधनासाठी एक माहिती तक्ता तयार करून त्यात देवराईचे क्षेत्र, तेथे कोणती झाडे आहेत, तेथून गाव किती अंतरावर आहे, किती अंतरावर एस.टी येते. इत्‍यादी मुद्दे नोंदवले. 
 

डॉ. उमेश मुंडल्‍ये यांनी लिहिलेल्या पुस्तकात व अभ्यासादरम्यान अद्भुत म्हणता येतील अशा अनेक गोष्टी दिसल्या. देवराईतील जंगलांमध्ये स्थानिक गावकरी झाडे तोडत नाहीत. काही ठिकाणी देवराईत चप्पल घालून जायला मनाई असते. (अशा घनदाट जंगलात विनाचपलेचे वावरणे बिकट असल्याने कुणी तेथे फारसे जात नाही व ते जंगल आपोआप संरक्षित राहते असा विचार कुणीतरी जुन्या जाणत्याने केला असावा असे डॉ. मुंडल्ये यांना वाटते. काही ठिकाणी विळा/कोयता नेला तर चालते, पण कुर्‍हाड मात्र नेण्यास सर्व ठिकाणी बंदी असते. (त्‍यामागे अशा ठिकाणाहून कोयत्याने तोडण्यासारख्या वाळक्या लहान फांद्या सरपणासाठी आणता याव्यात, पण कुर्‍हाडीने मोठी झाडे तोडली जाऊ नयेत असा विचार असू शकतो.) प्रत्येक देवराईमध्ये एक किंवा अनेक देव असतात. काही ठिकाणी त्यांची रीतसर देवळे असतात तर काही ठिकाणी झाडाखालीच त्यांची स्थापना असते. चंद्रपूर -गोंदिया अशा आदिवासींच्या भागातील देवरायांमध्ये हत्तिदेव, घोडेदेव, वाघदेव असे प्राण्यांवर आधारित देव आहेत. काही ठिकाणी बांबूच्या वनात असलेल्या दैवताला कळकाई, वडाच्या झाडाखाली असलेल्या देवाला वडजाई अशी देवींची नावे असतात. कोकणात ब्रह्मदेवाच्या नावाने असलेल्या दोन देवराया आहेत. कोणताच देव नसल्यास बहुतेक ठिकाणी शंकराचे देऊळ देवराईत आढळते. अशा देवळां मध्ये गावातली मंडळी महिन्यातून एका दिवशी जमतात. देवराई मध्ये पाण्याचे उत्तम नैसर्गिक साठे असल्याचे दिसून आले आहे. कोकणातील कुडावळे या गावाजवळील देवराईतून तर नदीचा उगम होतो. भिमाशंकर परिसरातील डोण गावातील देवराई गावापेक्षा उंचावर आहे. गावातील विहिरी जानेवारी-फेब्रुवारी मध्येच सुकतात. मात्र उंचावर असलेल्या देवराईतील विहिरीला बारमाही पाणी असते. अनेक देवरायांमध्ये डॉ. मुंडल्ये यांनी दहा मीटर (सुमारे तेहतीस फूट) एवढा मोठा घेर असलेले वृक्ष पाहिले आहेत. एवढेच नाही तर दोन मीटर (सुमारे सहा फूट) घेर असलेल्या वेली त्यांनी बघितल्या आहेत. दातपाडी नावाचे झुडुपवजा झाड त्यांनी देवराईमध्ये वीस-पंचवीस फूट एवढे मोठे झालेले पाहिले आहे. त्‍यांनी देवरायांच्या अभ्यासादरम्यान ३६६८ देवरायांची नोंद केली. १०६८ वनस्पतींची ओळख पटवली. (गंमत म्हणून आपण झाडांच्या नावांची यादी करायची म्हटली तरी ती पंचवीसच्या वर जाणार नाही, हे बघता या संशोधनामुळे थक्क व्हायला होते.) या सर्व संशोधनासाठी त्यांनी खूप भटकंती (खरेतर पायपीट) केली आहे. किर्र जंगलात एकट्याने फिरताना त्यांना कधीही भीती वाटली नाही. त्‍याला अपवाद म्हणून फक्त एका देवराईमध्ये त्यांना आत शिरताना मनामध्ये अनामिक भितीची भावना जागृत झाल्याचे त्यांनी पुस्तकात नमूद केलेले दिसते. 

पुस्तकात वाचतांना लक्षात येते की अनेक देवरायांची स्थिती गंभीर होत आहे. पर्यावरण उपाय योजनेच्या नावाखाली फक्त निधी जाहीर केला जातो परंतु देवराई संवर्धन व देवराई बद्दल अधिक माहिती व प्रसारण करण्यासाठी आपल्यकडे किती लक्ष दिले जाते हा प्रश्न आहे. आज खाजगी जमिनीवरील अनेक देवराया, तेथील जमिनमालकांनी कोळसा करण्यासाठी अक्षरशः तेथील वृक्ष तोडून जाळले आणि अगणित वर्षांपासूनची असलेली वृक्षसंपदा नष्ट झाली. डॉ. उमेश मुंडल्ये यांनी आपल्या या वारशाचा अभ्यास केला. त्‍यामुळे त्यांना नवीन जीवनदृष्टी मिळाली व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करत असतांना आर्थिक फायदाही कसा करून घेता येईल याविषयी मार्गदर्शन करणारे हे पुस्तकं नवीन पिढीला निसर्ग संवर्धन करण्यासाठी ज्ञानाच खजिना म्हणून उपलब्ध करून दिले आहे. जुने ते सारे वाईट, मागास असे समजण्याच्या सध्याच्या मॉडर्नजमान्यात, जुन्यापैकी जे उपयुक्त आहे त्याचा अभ्यास करणे व त्यासंबधी विचार मांडणे हे गरजेचे आहे. डॉ. उमेश मुंडल्ये हे चाळीशीतील धडाडीचे संशोधक हे काम करत आहेत. त्यांच्या पुस्तकाचा उपयोग नवीन पिढीला निश्चितच दिशादर्शक ठरणारा आहे.

देवराई निसर्गसंवर्धनाचा सांस्कृतिक वारसा हे पुस्तकं लेखक डॉ. उमेश मुंडल्ये यांनी लिहिले असून ते साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशक संस्था) यांच्या संस्थेकडून प्रकाशित झाले. पुस्तकं मुल्य १७५/- असून एकूण १२८ पानांचे पुस्तकं आहे.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९

 

No comments:

Post a Comment