Friday, December 18, 2020

माणुसकीच्या शोधात आहे...!

 

माणुसकीच्या शोधात आहे...!

 सध्याच्या परिस्थितीमध्ये जात, धर्म याचा दुरुपयोग करून समाजाचे विघटन केले जात आहे. माणसाची मन दुरावत आहेत. आपण २१ व्या शतकात प्रवेश केला आणि गेल्या दशकापासून ते आत्तापर्यंत आम्ही आमचा देदीप्यमान विकास केलेला आहे. पण हा विकास होत असताना खरंच या माणसाला माणूसपण राहिलंय का? हा प्रश्‍न मनामध्ये मात्र थैमान घालू लागला आहे. अमानुष कृत्याचं दर्शन आपल्याला वृत्तपत्र व वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा डोळ्यांसमोर येतं तेव्हा मन अस्वस्थ होऊन जाते. बलात्कारासारखं निंदनीय कृत्य, स्त्रीयांवरील वाढत चाललेले अत्याचार, बिहार मध्ये अनाथ मुलांवर झालेला प्रसंग हा माणुसकीच्या नावाला काळीमा फासणार्‍या या सर्व गोष्टी कधी थांबणार आहेत? म्हणूनच आजची स्त्री अबला की सबला हा प्रश्‍नदेखील निरुत्तरीत आहे. प्रत्येक माणूस विचारी असतो. माणसाला मेंदू असतो अन् त्या मेंदूत अक्कल ही असतेच. पण त्या अकलेचं आज खोबरं झालेलं आहे. माणूस किती जगतो याला महत्त्व नाही तर त्यापेक्षा तो कसा जगतो याला फार महत्त्व आहे. आयुष्यातील खडतर प्रवासाने यश संपादन होत असते. सर्वप्रथम विद्यार्थी घडत असताना शिक्षकांनी त्यांच्यासमोर आदर्श ठेवला पाहिजे. त्याचबरोबर आई-वडिलांनी चांगले संस्कार पेरणे गरजेचे आहे. पालकांनी बेजबाबदार न राहता त्यांच्यामध्ये चांगले विचार बिंबवणे खूप गरजेचे आहे. माणसाची सर्वांत महत्त्वाची गरज नुसते शिक्षण नाही, त्याचे चारित्र्य आहे. नुसतेच पुस्तकी ज्ञान न घेता चारित्र्य संवर्धन होणेही गरजेचे आहे. त्याने स्वत:चे रक्षण होत असते. दैनंदिन जीवन जगत असतांना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता, त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावु तेवढा लागतो, जेवढा ताणू तेवढा ताणतो, जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. कधी ती लगेच पहायला मिळते तर कधी कधी ती शोधावी लागते. कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून तर कधी बोलण्यातून त्याची ओळख होत असते. प्रत्येक शब्द कितीही छोटा वा मोठा असो त्या शब्दाच्या गर्भितार्थावरून त्या शब्दाची जाडी-रूंदी आणि त्याची विस्तृतता कळते. त्यापैकी असाच एक जो आपल्या सर्वांना परिचित असलेला पण त्याची फारशी खोल ओळख नसणारा शब्द म्हणजे  माणुसकी. ओळख नसणारा शब्द यासाठी की आजचा माणूस माणसाची ओळख विसरत चालला आहेमाणुसकी हा केवळ शब्दच नव्हे तर पर्यायाने आपल्या रोजच्या जगण्यातून खुद्द माणूसकीच गहाळ होत चालली आहे असे चित्र आहे. ऎकायला आणि बोलायला अगदीच सहज आणि सोपा वाटणारा हा शब्द, पण त्याचा नेमका अर्थ काय.?  माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. खरच पाहायला मिळते का या सध्याच्या धावपळीच्या जगात ही माणुसकी. पण या माणुसकीला जर ओळखायचे असेल तर असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आले असतील आणि जरी अद्याप आले नसतील तरी कधी ना कधी ते नक्कीच येतील. जीवनात आलेल्या त्या प्रसंगाना अगदी एकांतात बसून बारकाईने त्यावर नजर टाका म्हणजे माणुसकीतला माणूस किंवा माणसातली माणुसकी शिल्लक राहिली आहे का हे कळेल. या जगात कोणीही तुमचा मित्र किंवा शत्रु म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टीकोण, आपली नाती आणि त्यापेक्षा त्या नात्यांमधील प्रेम यावर ठरते कोण आपला मित्र कोण आपला शत्रू आहे ते. मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या विचार आणि कर्तुत्वावर अवलंबुन असते. तुमच्या विचारातूनच तुमचं व्यक्तिमत्व झळकत असतं, त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी इतरांचे लक्ष असते, तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात, म्हणून सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व घडवा.

शरीर जे एक वाहन म्हणून तो त्याचा वापर करतो आहे, आणि त्या वाहनाला लागणारे इंधन हे एकाच आहे, परंतु आपले विचार ग्रासले, माणुसकी हरवली आणि आपण त्या इंधालाच सर्व काही मानून बसलो. याचा अर्थ असाही नाही कि आपण बसून राहवे, आपण काहीच करू नये. आपण कष्ट करावेत, ते इंधन मिळावे परंतु या परिस्थिती आपण आपल्या बुद्धीला कुठले इंधन दिले पाहिजे ज्यामुळे विचारांची सीमा वाढेल हे समजणे गरजेचे आहे. समाज माध्यम आज ज्या पद्धतीने चित्र मांडत असतात हे बघितल्यावर नेमकं कळत की आपण विकासाच्या नाही तरी आपल्या प्रगती मधील अडथळे तयार करतो आहे. समजतील एकंदरीत परिस्थिती बघितली तर सकारात्मक पेक्षा नकारात्मक घटना जास्त चर्चेत आणले जाते. माणसातील माणूस आजच्या धावपळीच्या जगात हरवत आहे. साधारणपणे १५ ते २० वर्षापूर्वी ग्रामीण भाग हा बहरलेला होता पण आज ग्रामीण भागातील उदासीनता, मोठ्या प्रमाणात असलेले बेरोजगार, उद्योग व्यवसायाची कमतरता कदाचित या करणामुळे देखील माणसाच्या विचाराची पातळी घसरली असेल आणि माणसातला माणूस हरवला असेल. शहरात प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढली त्यामानाने तेथील सुविधा ह्या कमी पडू लागल्या लोकांन मध्ये संघर्ष व स्पर्धा वाढू लागली. एकत्र कुटुंब ही विभक्त झाली प्रत्येक व्यक्ती फक्त स्वता पुरता मर्यादित विचार करू लागला. ज्यांच्या कडे लक्ष्मी आहे ती फक्त त्यांच्या कडे जाताना दिसते गरीब जनता एक वेळ फक्त भूक पूर्ण करत जीवन जगत आहे. माणुसकी की समाजातील प्रत्येक व्यक्ती मध्ये रुजवली पाहिजे यांची सुरुवात ही खरी कुटुंबा पासून सुरु झाली पाहिजे. आज शहरात मोठ्या प्रमाणात मोठ मोठ्या सदनिका मध्ये लोक वास्तव करत आहे. प्रत्येकाला वेळ आठवड्यातून काढता येई शकतो आणि आपन जिथे राहतो तिथे जर आपण वैचारिक वर्ग अथवा ज्यामुळे सकारात्मक घटना ज्यामुळे समाजातील नवीन तयार होणाऱ्या पिढी मध्ये संस्कार व मुल्ये रुजवण्यास मदत होईल. अशक्य असे काही नसते फक्त चांगले काही करण्याची उमेद आपल्या मनात असली पाहिजे. माणसाच्या वाढत्या गर्दीत माणुसकी शोधत फिरतोय मी,रस्त्यावरील भीक मागणाऱ्या माणसात देव शोधत फिरतोय मी,कधी त्यांच्या वेदना तरकधी त्याच्या संवेदनाशी जीवनाचं कडीमोल व्याख्या विचारतोय. आयुष्य सुंदर म्हणत भरकटणारे कोण आणि सुंदर आयुष्य स्वतःच्या कर्तृत्वावर व स्वतःच्या मनगटी मिळवणारे कोण.? सांगाल का.?

मानवी जीवन जगतोय म्हणजे समाजात आम्ही कोणत्या अंगांचे शृंगार करतोय, मानवी जीवन म्हणजे केवळ आणि केवळ मी आणि माझं पण यातच गुरफटून बसलेला हा समाज कधी आजूबाजूला चालू असलेल्या या निर्घृणपन समजून त्यांवर आपली माणुसकीच्या भिंती बांधत फिरणे हा कर्तव्य समजा व मानवी जीवणाचा उद्धार पणा ही प्रत्येकाच्या हृदयात जागे व्हावे ही काळाची गरज आहे. माणुसकी म्हणजे माणसांनी माणसांशी वागण्याचे कौशल्य नव्हे तर माणसांनी माणसांशी आपुलकीतून आपलंसं मानणारा वर्ग म्हणजे माणुसकीचा रखाना. या मातीशी नाळ असणारा जागृत वर्ग म्हणजे माणुसकी या मानवी जीवनातील प्रत्येक सजीव सृष्टीसोबत रक्ताचे नाते निर्माण करणारा म्हणजे माणुसकी. या मानवी जीवनात जीवन जगत असतांना अनेकदा डोळ्यासमोर ठळकपणे दिसुन येते या शेतकाऱ्यांवरील अन्याय असो व माझ्या स्त्रीवर्गावरील अत्याचार किव्हा दलितांवरील अन्याय हे सहज हळव्या मनाला स्पर्शून सांगून जातात,बेटा या जगात माणुसकी लोकपावली आहे, अत्ता त्या शब्दाचा केवळ उदोउदो करण्या पलीकडे आपल्याकडे दुसरं काही उरलं नाही.

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

भ्रमणध्वनी – ९०९६२१०६९

 

No comments:

Post a Comment