निसर्गबेट गरज पर्यावरण संवर्धनासाठी...!
उन्हाळा
संपला पावसाळा सुरु झाला पाण्यासाठी जनतेने श्रमदान केले आणि पाणी जे अंत्यत
गरजेचे म्हणून शहरातील लोकं ग्रामीण भागात एक दिवस जाऊन श्रमदान करण्याच्या समाधान
घेतले. जलसंधारणाची कामे आता थांबतील आणि वृक्ष लागवडीचे
कार्यक्रम सुरू होतील. हे करत असताना तांत्रिक बाबी कडे किती लक्ष दिले जाते हा
कधी प्रश्न कोणाला पडत नाही.
जलसंधारण + वृक्षसंधारण
= निसर्गबेट
निसर्गबेट संकल्पना नेमकी
काय आहे..?
आपण आपल्या पूर्वजांनी जे
सांगून ठेवले आहे त्याकडे दुर्लक्ष करत असतो. प्रत्येक ग्रामीण भागात गेल्यावर
वडाचे झाड असायचे आणि त्यांच्या आवटी भोवती बसण्यासाठी जागा असायची..? त्याला पार असे म्हणत आज
मात्र बसण्याचे पाराची जागा बेंचस ने घेतली आणि सगळ्यांची डोके बटणं दाबण्यात
व्यस्त झाली. निसर्गबेट
संकल्पना राबवित असतांना तांत्रिक प्रत्येक गोष्टीचा विचार केला आहे. त्यात विशेष
महत्वाचे म्हणजे पाणी, माती, वृक्षांचे प्रकार, जागेची निवड, कालावधी ह्या सर्वाचा विचार
करून त्याला तांत्रिकतेची जोड देऊन जे उभे राहिल ते शाश्वत असेल. आपण मागील तीन
वर्षापासून बघत आहोत राज्य सरकार २ कोटी वृक्ष लागवड त्यानंतर ४ कोटी मागील वर्षी
१३ कोटी वृक्ष लागवड केली असे म्हणत आहे.
मुळात ही वृक्ष लागवड
झाली की एवढे वृक्ष फक्त उपलब्ध करून देण्यात आले हे कोणाला माहिती नाही.
सरकारला विचारणारे कोणी
नाही. बरं विचारले जरी तरी उत्तर देते कोण. एकूणच
काय तर नुसते कागदोपत्री सर्व प्रकार बघण्यास मिळतात. आपण समाज म्हणून प्रत्येक
गोष्टीशी बांधील असतो. आपली स्वताची काही जबाबदारी असते. आपण जबाबदारी पार पाडत
असतांना तांत्रिक गोष्टी कडे किती लक्ष केंद्रित करत असतो हे बघणे गरजेचे आहे. निसर्गबेट ज्यावेळी सांगत असतो तेव्हा फक्त वृक्ष रोपण
करणे असे नाही तर एकूण तांत्रिकदृष्ट्या जे निसर्ग परिसंस्थेला कुठे नुकसान
पोहचवणार नाही असे कार्य निसर्गबेट तयार करतांना केला जातो. जुलै
महिना सुरु होईल पाउसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली. पर्यावरण प्रेमीचा उत्साह
जागृत होईल आणि वृक्ष रोपण समारंभ होतील. आपण लक्षात घेतले पाहिजे जे काही कार्य करत असतो त्या
मध्ये एक परि संस्था असते जी एकमेकांवर अवलंबून असते. जर आपण ही परिसंस्था समजून
घेतली तर नेमके कार्य करत असतांना आपल्याला अडचण निर्माण होणार नाही.
गावशिवार
हि एक परिसंस्थाच, परंतु
तिचे आता दोन भाग
नैसर्गिक भाग: हा
क्षेत्राची भूपृष्ठीय व भूगर्भरचना, मृदारचना, हवामान, जंगल-कुरणे, जंगली प्राणी याच्याशी
संबंधित.
कृत्रिम भाग: मानवी
हस्तक्षेपातुन आपल्या गरजा-सुखसोयीनुसार निर्माण केलेली खेडी, शहरे, नगरे, बागा, फळबागा, उद्याने, धरणे, जलाशय, सरोवरे-कालवे, कृषी पीकपद्धती, पाळीव प्राणी, इत्यादी.
विंधनविहिरींच्या तंत्राने
भूगर्भात पाडण्यात आलेली लक्षावधी छिद्रे व त्यातून प्रकर्षाने वाढलेली भूजल
उपसागती, सिंचन
प्रयोग व पीकपद्धतीत कुव्यवस्थापन, आपल्या
गावशिवारातील भुगर्भात नेमकं पाणी किती आहे याचे अज्ञान.
आपल्याकडे जर निसर्ग
परिसंस्थे बद्दल माहिती नसेल तर पर्यावरण अभ्यासक यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन
कार्य करावे.
जुने
ते सोनं असे म्हणण्याची वेळ आली आहे. जे जुनं होते ते आपण खरं स्विकारतो आहे का ? आधुनिक
तंत्रज्ञान विकसीत झाले हे मान्य परंतु खरं तंत्रज्ञान तर आपल्या पूर्वजांनी या
निसर्गा मधून शोधून काढले होते आणि त्यांचा गुण देखील येत होता. निसर्गबेट संकल्पना ही नवीन नाही मात्र आधुनिक करणात
ज्या तांत्रिक बाबीन कडे लक्ष देणे अपेक्षित असते ते निसर्गबेट ज्या मध्ये जल
संधारण देखील होणार आहे. निसर्गबेट करायचे आहे त्यासाठी गावशिवारात ठराविक
आकाराची जागा ठरवून, पाणलोट क्षेत्रानुसार सुयोग्य जलसंरचना व स्थानिक जातींच्या (देवराई-पंचवटी–परसबाग संकल्पना एकत्र) वनीकरणातून जंगलनिर्माण याचे
मिश्रण म्हणजेच “निसर्गबेट” होय.
मूळ संकल्पना: विविध
जाती/प्रकारची झाडे-झुडपे कमी जागेत लावली म्हणजे ठराविक कालावधीनंतर (अत्यंत कमी)
झाडं वाढली की ती स्वसंरक्षणार्थ समर्थ ठरतात. अशा प्रकारे लावलेले जंगल हे जास्त
गतीने वाढणारे तसेच खात्रीनं जगणारे असते. यातून शाश्वत उत्पन्न तर नक्कीच मिळतेच परंतु त्याहीपेक्षा
जास्त महत्वाचे आहेत ते परागीभवन, किड
नियंत्रण, जमिनीची
सुपिकता, मातीची
ओल, भूजल
पातळी, परिसरातील
हवामान इत्यादी फायदे, जे
निसर्ग पुनर्स्थापनेसाठी आदर्श ठरतात. आज वृक्ष तोड ही केली जाते का ? तर रस्ते तयार होत आहे. मोठ
मोठे प्रकल्प निर्माण होत आहे. वृक्ष तोड होते म्हणून नवीन जंगल निर्माण करण्याचे ठरवले
जाते. जंगल निर्माण करायचे तर आपल्या कडील देवराई,
पंचवटी, , देवभूमी, देवबन, देवराठी, देवरान, काव्यू, मामखप, मऊह, देवरकंड, सिद्दरवनम, ओरांस इ. नावाने ओळखली
जाणारी वन संपदा आपल्याकडे होती. आपल्या ग्रामीण भागातील तसेच आदिवासी भागातील
नागरिकांच्या ज्ञान आपण समजून कधी घेतो का ?
जागतिक
तापमान वाढ आणि एकूणच हवामानातील बदला मुळे आपल्याला प्रत्येकाला वृक्ष लावणे का
गरजेचे आहे हे सांगणे गरजेचे नाही कारण ते आता प्रत्येकाला कळत असेलच. जे वृक्ष लावले जातील त्यात तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल
का ही शंका असेल कारण मागील अनेक वर्षापासून वृक्ष लागवड केली जाते. आपण लावत
असलेले वृक्षा पैकी किती वृक्ष वाढली याकडे मात्र कितीजण लक्ष देऊन असतात हा
प्रश्न आहे. शासनाचे आकडे म्हणजे किती विश्वास ठेवला पाहिजे हे
तुम्ही स्वता ठरवावं जे वृक्ष लावले जाते ते तुमच्या आणि आमच्या कराच्या पैश्यातून खर्च करून लावले जात असतात. माझी पिढी अशी आहे कि जी डोळ्यासमोर सगळे अनुभव घेत जगत
आहे. पूर्वजांनी जे राखून ठेवले होते ते संपवण्याचा विडा उचला गेला आणि हे सर्व
सगळे डोळ्यासमोर होत आहे परंतु माझी पिढी ही हतबल असते कारण धर आडात पण नाही आणि
धर पोरात देखील नाही अशी ही व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे.
देवराई हा विषय थोडा वेगळा, जुन्या समजुती, जंगलातील देवता, देव देवस्की अशा अनेक
समजुतींमुळे कुतूहल जागृत करणारा. त्यामुळे नुसते वृक्ष नाही तर त्यांच्या जोडीला
पाणी देखील महत्वाचे मग जलसंधारण अभ्यास करत असतांना निसर्गबेट संकल्पना समजून
घेतली. आज देवराई नवीन पिढीला कितीपत माहिती आहे. देवराई मधील देवता, त्यांच्या बद्दल असलेल्या
रुढी, परंपरा, त्याच्याशी निगडीत असलेल्या
श्रद्धा/अंधश्रद्धा खरंच थक्क करणाऱ्या आहेत. अगदी ढोबळ भाषेत सांगायचे झाले तर
देवराई म्हणजे देवाची राई, अर्थात
देवासाठी राखलेली जमीन, त्या
जमिनी वरील झाडे, दगड
माती … अगदी
कण अन् कण देवाचा, देवाच्या
मालकीचा. काही ठिकाणी देवराईला देवबन, देवरहाटी
असे देखील म्हणतात. देवराईच्या रुढी, परंपरा
अजूनही पिढी दर पिढी जपलेल्या आहेत. या संकल्पनेचे मूळ हे वेदिक संस्कृती पासून
असावे असे जाणकारांचे मत आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक गावात, खेड्यात देवस्थानाची, विशेषतः ग्रामदेवतेची लहान
मोठी जमीन असते. पण म्हणून या सगळ्याच जमिनींना देवराई म्हणता येणार नाही. एखाद्या
जमिनीवर देऊळ बांधून आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणणे
हास्यास्पद ठरेल. देवराईच्या अस्तित्वाला, संवर्धनाला
आणि ऱ्हासाला देखील कित्येक पिढ्या साक्षी आहेत. देवाच्या भीती मुळे कदाचित
त्यावेळी कोणी वृक्ष तोड करत नसे आज मात्र सर्व नियम आणि कायदे ढाब्यावर बसून सर्व
विनाशाकडे पाऊलवाट निर्माण झाली आणि प्रत्येकजण त्यामार्गाने जात आहे.
देवराई वाढवणे आणि तिचे
संवर्धन करणे महत्वाचे आहे. ज्यावेळी नवीन जंगल निर्माण करणे अथवा वृक्ष लागवड
करायचे असते तेव्हा मात्र निसर्गबेट संकल्पना समजून घेणे महत्वाचे ठरेल. निसर्गबेट
हे स्वदेशी आणि जे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले आहे त्यांच्या सर्व माहितीकडे
लक्ष देऊन तांत्रिकदृष्ट्या काही चूक होणार नाही. निसर्गबेट तयार करत असतांना
कुठल्या परिसंस्थेचे नुकसान होणार नाही किंवा आपल्या एका कामा मुळे इतरांना त्रास
होणार नाही यांची काळजी घेऊन तसा आरखडा तयार करून निसर्गबेट संकल्पना वास्तविक
स्वरुपात उतरवण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे.
देवराई
आज महाराष्ट्र मध्ये काही भागात बघायला मिळते पश्चिम घाट हे त्यातील एक भाग आहे.
देवराई एका व्यवस्थेचं. परंपरागत चालत आलेली ही व्यवस्था. देवाच्या नावानं राखलेलं
जंगल असं त्याचं साध्या-सोप्या शब्दांतील वर्णन. मागील काही वर्षांपासून
पर्यावरणीय नीतीशास्त्र अभ्यास सुरु झाला आहे. माणसाच्या आजच्या पर्यावरणीय (खरं
तर पारिसरीक म्हटलं पाहिजे, कारण पर्यावरण ही एक मानवी व्यवस्थापनातील गोष्ट
झाल्यासारखी झाली आहे आजकाल) समस्येवर मात करावयाची असेल तर पर्यावरणीय स्वरूपाचे
नीतीशास्त्र असले पाहिजे असा या अभ्यासाचा विचार. आल्डो लिओपोल्ड (अ सँड काऊंटी
अल्मानाक हे त्याचे या विषयावरील पुस्तक, त्यातील
लँड एथिक या शीर्षकाचा निबंध वाचनीय) हा या अभ्यासविषयाचा जनक मानला जातो.
पर्यावरणीय नीतीशास्त्र कोणत्या दृष्टिकोनातून असावे हा या वादाचा मुद्दा.
मनुष्यकेंद्री दृष्टिकोन असावा की नको; प्राणीहक्काच्या
दृष्टिकोनातून या विषयाकडे पहावे का; प्राणीकल्याण
हा दृष्टिकोनच कसा उपयुक्त; या सगळ्या विचाराच्या मुळाशी जैवकेंद्रितता असली पाहिजे; साऱ्यांचे
उद्दिष्ट्य एकच - जैववैविध्य टिकवत पर्यावरणाचे संवर्धन करावे!
आज देखील जेव्हा वृक्ष
रोपण करा किंवा झाडे लावा असे म्हटले की जे दिसेल ते झाड फक्त लावून मोकळे व्हयाचे
म्हणजे आपले पर्यावरण संवर्धन करतो असे झाले. एकूण सगळे बघितल्यावर कानफटात
छानपैकी लगावून देणारं एक नीतीशास्त्र माझ्यासमोर जितं-जागतं उभं होतं. मनातल्या
मनात मी हसण्याचं कारण तेच. देवराई! देवराई म्हणजे एक नीतीशास्त्र अशासाठी की, देवराई
राखण्यासाठीचे नियम पक्के. देवराईतून काहीही घेतलं जात नाही. गळून पडलेलं झाडाचं
पानदेखील. मग लाकूडफाटा-फळं वगैरे तर लांबच. देवराईत शिकार होत नाही. देवराईत
प्रवेश करताना चप्पला घालता येत नसत पूर्वी. आता तो नियम थोडा शिथील झाला असला तरी, अनेक
ठिकाणी काटेकोर पाळला जातो. हे दोन्ही नियम तसे सोपे. देवराई मध्ये माचीस हा
प्रकार नाही. कारण या देवरायांचं आगीपासून रक्षण करायचं असतं. आज निसर्ग अनुभव
घेण्यासाठी बाहेर फिरतांना आपण निसर्गाची काय काळजी घेतो हा कधी विचार केला जातो
का ? आज देवराई कधी बघायला गेल्यावर लक्षात येते अनेक
नियमांचा उगम देवराई मधून झाला असावा. "सूर्यप्रकाशावर जीवन आधारलेली झाडं
(सनलव्हिंग स्पेशीज) देवरायांच्या सीमेवर असतात. छाया हाच जीवनाधार असलेली झाडं
(शॅडोलव्हिंग स्पेशीज) आतल्या बाजूला." असे अनेक प्रकार बघण्यास मिळतील.
आज खरी गरज आहे ती
निसर्गबेट निर्माण होण्याची नुसते झाडे नाहीतर नेमकी कुठली झाडे कुठल्या जागी
लावली म्हणजे ते जगतील हे सर्व तांत्रिक पणे जागेचा आराखडा तयार करून निर्माण
केलेली देवराई असणार. सध्या मियावाकी या संकल्पना आदर्श मानली जाते. विदेशातील लोक
इथे येऊन अभ्यास करून जे आपले बघून विदेशात जाऊन प्रयोग करतात. निसर्गबेट केल्याने
काय फायदे होऊ शकतात ते समजून घ्यावे.
निसर्गबेट फायदे -
झाडें पार नाहीशी
झालेल्या ठिकाणच्या हवामानांत बराच फरक पडला आहे. झाडें जमिनींतील पाणी वर शोषुन
घेतात, तें पानांच्या द्वारें हवेंत पसरलें जाते. ह्यामुळें हवेंतील
वाफ वाढून ती पाऊस अधिक पडण्याला कारणीभूत. शिवाय झाडांचीं पानें उष्णता उत्पन्न
करणारे सूर्याचें किरण शोशून हवा थंड करतात.
झाडें नाहींशी
झाल्यानें झरे व विहिरी यांचें पाणी कमी झाल्याचीं उदाहरणें आहेत. झाडें
लावल्यानें मुळ्या जमिनींत खोल जातात, त्यांच्या
योगानें पाऊस पडेल तो झटदिशी वाहून न जातां जमिनींत मुरतो, याच्या
योगानें जमिनींतींल पाण्याचा साठा वाढून नद्या, नाले, झरे, विहिरी
यांचें पाणी कायम रहातें, १५ गुंठ्यामध्ये साधारण २५० - ३०० लहानमोठ्या वृक्षांची
जलधारण क्षमता हि उन्हाळ्यात स्वतःला जगविण्यास समर्थ ठरते.
पक्षी-किटकांचे
आश्रयस्थान जे परिसंस्था अन्नसाखळी मजबूत करते. पिकांवर रोग पडण्याचं प्रमाण कमी
होऊन शेतीचे उत्पन्न वाढते. जमिनीसाठी उत्कृष्ट अन्नद्रव्ययुक्त खत निर्माण व
सातत्यानं पुरवठा खात्रीतून जमिनीचा पोत/कस सुधारतो, कर्बवायू
ग्रहणानं व आॅक्सीजन अतिरिक्त पुरवठा वाढून गावशिवारात प्रदूषणमुक्त निरोगी
वातावरण निर्मिती.
फुलशेती, फळबाग, औषधी
वनस्पती, ईको टुरिझम, योगकेंद्र
ईत्यादीतून थेट उत्पन्न, आयुर्वेदाचे भांडार गावातंच उपलब्ध, औषधी
वनस्पतींचे ज्ञान व त्याचा वापर स्थानिक जीवनशैलीचा भाग बनतो.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९
No comments:
Post a Comment