Wednesday, February 15, 2023

शेतकऱ्यांच्या प्रियकर कोण ?

 शेतकऱ्यांच्या प्रियकर कोण ?

शेतकरी

रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात.कारण भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतीवर उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते. शेतीचे चाके थांबल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होण्या शिवाय पर्याय नसतो. कारण अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ या सारखे जिवनाश्यक बाबीचा निर्माता हा शेतकरी आहे म्हणून शेतकऱ्याला 'जगाचा पोशिंदा' म्हटल्या जाते. समाजव्यवस्था अबाधित रहावी म्हणून उन, पाऊस, थंडी, वादळी वारा अशां आपदांचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारा पोशिंदा म्हणजेच शेतकरी होय. या कृषीप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांना अर्थात जगाच्या पोशिंद्याला कधी कोणी प्रेम करणार आहे का ? आपण भारतीय समाज खूप भावनिक असतो. प्रत्येकाला आपल्या जीवनात प्रेमाचा स्पर्श असतो. हा स्पर्श शेतकरी बांधवांच्या जीवनात कोणी करणार आहे का ?

शेतकरी जीवन

शेतकरी’ हा शब्द जरी कानावर पडला तरी आपल्या अंगाला काटे आल्यासारखे वाटते कारण आपण दररोज टी.व्ही. चॅनेल्सवर , वर्तमानपत्रात आणि सोशल मीडिया वर बघत असतो की, किमान दररोज एक तरी शेतकरी आत्महत्या करतो. आपण ग्रामीण भागातील आहोत म्हणून आपले आणि शेतकऱ्याचे नाते खूप जवळचे आहे आणि माझा जन्म देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झालेला आहे.

माझ्या मते, “शेतकरी” या शब्दाची फोड केली तर त्याचा अर्थ असा होईल शेत + करी म्हणजेच जो शेतात रात्रंदिवस काबाड कष्ट करतो म्हणजे सतत काम करत असतो. आणि आपल्या साठी दोन वेळेचं अन्न पिकवतो तो शेतकरी.. माझा शेतकरी राजा खूप काबाड-कष्ट करत असला तरी त्याला सुख मिळत नाही. त्याच्या वाटेला नेहमी दुःखाचे डोंगर उभे राहतात. तरी देखील तो इतरांबद्दल वाईट विचार करत नाही. पण आपण जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीचा विचार केला तर ते आपल्याला विरुद्ध पाहावयास मिळेल. पैसा ज्याच्याकडे असतो तो पैशांचा गैरवापर करतो परंतु शेतकरी एवढा काबाडकष्ट करतो तरी देखील तो पै-पै जमवून ठेवतो. थोडक्यात शेतकऱ्याचे चित्र डोळ्यासमोर आणा, आपल्याला त्याचा काळा खुट्ट चेहरा, त्याचे मळलेले कपडे, त्याचे डोक्याचे वाढलेले केसं, त्याचा फाटलेला बनियान, गळ्यात मळलेला रुमाल असं व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर लगेच उभं राहील.आज २१ व्या शतकामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वाढले आहे. परंतु अशिक्षित असल्यामुळे त्याच्याविषयी शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना नसते. जर एखाद्या वेळेस चांगल पीक आलं तर, मग त्याला मार्केटला भाव नसतो. कर्ज काढून शेती करणारा शेतकरी जेव्हा पीक बाजारात नेतो तेव्हा मात्र भाव नसल्यामुळं त्याला अनेक अडचणींना तोंड दयावं लागतं. असं सर्व जीवन जगत असतांना आपल्याला वाटत शेतकरी सुखी व्यक्ती आहे. आज समाजात शेतकऱ्यावर प्रेम करणारं कोणी राहिलं नाही. शेतकरी फक्त भावनिक विषय झाला आहे. कोणी यावे आणि ढोल वाजवावा असं झाल आहे. शेतकरी म्हणून प्रेम करणार. त्यांच्या समस्या जाणून घेणार आज घडीला कोणी दिसत नाही.

शेतकरी आणि समाज

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जीवघेणी दुरवस्था प्रत्येकालाच माहीत आहे. लागोपाठ तोटय़ात राहणारी शेती ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत आहे. सरकारचे व समाजाचे लक्ष या हृदयद्रावक घटनांकडे जाते. आत्महत्यांची दखल घेतली जाणे आवश्यक आहेच. परंतु कमी उत्पन्नामुळे जी उपासमार, कुपोषण व मुलांची शिक्षणातून गळती तसेच इतर दुष्परिणाम शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना भोगावे लागतात, त्याकडे मात्र सरकारचे पुरेसे लक्ष जात नाही. हा दुष्परिणाम महाराष्ट्रातील शेतकरी निमूटपणे आणि असहायपणे सहन करत जगतो. संपूर्ण महाराष्ट्रात, आणि विशेषत: फार मोठय़ा कोरडवाहू व कमी सिंचन असलेल्या भागात शेती उत्पन्नामधील वारंवार होणारे चढउतार, योग्य कृषीधोरणाचा अभाव तसेच ते असलेल्या उपाययोजना राबविण्याची सरकारची असमर्थता हे सारेच शेतकऱ्याच्या गरिबीला कारणीभूत ठरतात. सांख्यिकी माहितीतून शेतकऱ्याच्या गरिबीचे जे स्वरूप दिसते त्यामधूनदेखील आपणास हे पाहायला मिळते.

सन २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जवळपास ५५ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. या ग्रामीण लोकसंख्येच्या उदरनिर्वाहाची चार साधने आहेत- शेती, अकृषी उद्योग/व्यवसाय, मजुरी-रोजंदारी आणि नियमित वेतनाधारी नोकऱ्या. सन २०१२ मधील पाहणीनुसार ४४ टक्के कुटुंबांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र शेती करणाऱ्यांचे प्रमाण जातीनुसार भिन्न आहे. राज्यातील कृषीक्षेत्राच्या दुरवस्थेमुळे २०१२ मध्ये कमीतकमी २० टक्के शेतकरी कुटुंबे ही गरीब आहेत. ही कुटुंबे शेतकरी असली तरी दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात भरडली जात आहेत. विशेष म्हणजे, हे प्रमाण राज्याच्या (सरासरी १७ टक्के कुटुंबे दारिद्रय़रेषेखाली, या) प्रमाणापेक्षा जास्त आहे. यावरून शेतीच्या वाईट स्थितीची जाणीव होते. गरीब शेतकरी हे मुख्यत: अल्पभूधारक (पाच एकरांपेक्षा कमी जमीन) आहेत. महाराष्ट्रात एकूण शेतकऱ्यांपैकी ९५ टक्के शेतकरी गरीब आहेत. उरलेले फक्त पाच टक्के भूधारकच गरिबीमधून सुटले आहेत. या आकडेवारीतून हे दिसते की एकंदर दहा एकरांपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न त्यांच्या उदरनिर्वाहाच्या मूलभूत गरजा भागविण्या इतपतही पुरेसे नाही. याचा अर्थ हा की साधारणत: जमीनधारणा १० एकर किंवा सहा एकर सिंचित यापेक्षा जास्त असेल तर गरिबीतून जेमतेम मुक्तता होऊ शकते. ९५ टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता धोरण असूनही, गरिबी दूर करण्यासाठी उत्पन्नात वाढ करणे हे जबरदस्त आव्हान महाराष्ट्र शासनापुढे आजही कायम आहे. अशी एकूण शेतकरी आणि समाजाची परिस्थिती आहे. समस्या अनेक आहे पण ते सोडवण्यासाठी तेवढी दूरदृष्टी समाजतील कोणाकडे नाही. त्यामुळे शेतकरी नेहमी उपेक्षित आहे. त्यांच्यावर कोणी प्रेम करावे असं कोणी नाही त्याला मात्र गुलाम कराव आणि त्यांच्याकडून लुटावे हे शासकीय धोरण शेतकरी विरोधी नरभक्षी कायदे राबवून अनन्य केला जातो.

          समाज म्हणून आम्ही फक्त म्हणत राहयचं किती दयनीय परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या दुखावर आम्ही पँकेज देऊन फुंकर घालतो. नव्याचे नऊ दिवस आम्ही रडायचं आणि पुढे मात्र आहे ती परिस्थिती आहे.

शेतकरी आणि प्रेम

          शेतकरी आणि प्रेम म्हटल्यावर शेतकऱ्यांच प्रेम हे माणसं पेक्षा त्यांचा गोठ्यातील प्राणी व पक्षी वर अधिक असत. प्रेम म्हटल्यावर ते फक्त स्त्री आणि पुरुष असं नसतं तर प्रेम हे आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीवर असत. त्यामुळे शेतकरी बांधवाचा जीवनात अठरा विश्व दारिद्य जाणूनबुजून निर्माण करण्यात येते. त्यामुळे शेतकरी बांधवाच्या जीवनात सुख आणि प्रेम कधी निर्माण होणार हा प्रश्न “प्रेम दिवस” साजरा करतांना पडतो. शेतकरी बांधवांना शासनाने द्याचं असेल तर शेती उद्योगाचं स्वातंत्र्य दिले पाहिजे. शेतकरी श्रीमंत व्हावा असं वाटत असेल तर गुलामीच्या बेडीतून सोडून त्याला त्याचं स्वातंत्र्य दिले पाहिजे. शेतकरी आणि प्रेम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांच्यावर प्रेम करणारं कोण सध्या दिसत का? असा विचार करावा लागतो. शेतकरी कडे फक्त भावनिक होऊन प्रेम करणारे नको तर अर्थशास्त्रीय शेती फायद्यात कशी येईल हे प्रेमाने समजून सांगणारे पाहिजे. शेतकरी प्रेमाचा भुकेला नाही पण त्यांच्या भावनिकतेच्या फायद्या घेऊन पँकेज देऊन फुंकर घालणारे पिल्लावळ दूर करणारे पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकरी जीवनात प्रेमानं जगू शकेल. त्यामुळे म्हणावे लागते शेतकऱ्यांचा प्रियकर कोण ?

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९ 

No comments:

Post a Comment