Wednesday, July 27, 2022

जलक्षेत्रातील कार्व्हर - विलासराव साळुंखे

 जलक्षेत्रातील कार्व्हर - विलासराव साळुंखे

 

विलासराव साळुंखे हे भूमिहीन मजुरला देखील पाण्याचे समान वाटप व्हावे. या मागणीसाठी ३० वर्षे लढा देणारे तसेच 'पाणी पंचायत या संकल्पनेने सामूहिक व्यवस्थापनाद्वारे पाण्याची साठवण व वितरण करून शेतकःयांचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणणारे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३७ रोजी सांगली जिल्ह्यातील धूळगाव येथे झाला. त्यांनी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यांचा १९७३ सालीचा पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील पाणलोट क्षेत्रविकास व त्याआधारे शेतीसिंचन हा प्रयोग विलक्षण गाजला व तो नायगाव पॅटर्न या नावाने ओळखला जातो. आजच्या तरुण पिढीला विलासराव साळुंखेची ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासामधील पाणी, जमीन व पर्यावरण या संदर्भातील आर्थिक सिद्धांत, तत्त्वप्रणाली व त्यांनी केलेले प्रयोग यांची तोंडओळख नाही. ते दोनशे वर्षे पुढे विचार करणारे द्रष्टे कर्मयोगी होते. एक होता कार्व्हरया प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांनी विलासरावांवर भगीरथाचे वारसहे पुस्तक लिहिले आहे, यात बरेच काही आले. विलासराव असे म्हणत, की या शेती शास्त्रज्ञ डॉ. कार्व्हर प्रमाणेच जिद्द, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय जीवनमूल्यांचा अभिमान असणाऱ्या हजारो तरुणांची ग्रामीण भूमी आतुरतेने वाट पाहत आहे.

 

विलासरावांना परदेशातील तंत्रज्ञानाच्या शोधात जपान, अमेरिका, युरोपीय देश, इंग्लंड, कॅनडा अशा अनेक देशांमध्ये भ्रमण करण्याचा योग आला. तिथे चाललेले अतिरेकी आधुनिकीकरण व चंगळखोर भोगवादी संस्कृती त्यांच्या आध्यात्मिक मनाला अस्वस्थ करीत असे. पाणी या विषयासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांचे निष्कर्ष त्यांच्या स्वानुभवावर आधारित व प्रयोगाने सिद्ध झालेले असायचे. त्यांच्या वक्तव्यातील प्रांजळपणा व आंतरिक तळमळ समोरच्यांना भावून टाकायची. महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचे नियोजन-पाण्याचे न्यायवाटप, धोरण, दिशा, कार्यवाहीया त्यांच्या पुस्तकात दिलेली माहिती, आकडेवारी, सांख्यिकी तक्ते पाहून लक्षात येते की त्यांची मांडणी किती शास्त्रशुद्ध व सुसूत्रबद्ध होती. इस्राईलला भेट देऊन आल्यानंतर विलासराव म्हणाले, की फक्त ठिबक सिंचनाची व उपदेशाची जलनीती न सांगता तिथल्या समान वाटप शिस्तीचे नियोजन, पाण्याचे कायदे, स्वतंत्र पाणी आयोग याचे अनुकरण करावे लागेल. कार्पोरेट क्षेत्राची पार्श्‍वभूमी असल्यामुळे विलासरावांना कार्यकर्ते, शेतकरी यांच्या प्रशिक्षणाचे महत्त्व माहिती होते. पाणी पंचायतीच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो कार्यकर्ते प्रशिक्षण घेऊन तयार झालेत. यामध्ये लोक संघटन, जमीन व पाण्याचे गावपातळीवरील नियोजन, सामूहिक पाणीवाटप, सेंद्रिय शेती, पर्यावरण वगैरे विषयांचा अंतर्भाव होता. त्या ठिकाणी शिबिरार्थीच्या निवासाची, जेवणाची ही व्यवस्था केली गेली. विलासरावांनी पाणी पंचायतहे चळवळीचे मुखपत्र द्विमासिक सुरू केले. त्यात जलप्रकल्प, चळवळीतील अनुभव, ग्रामीण विकास, दुष्काळ उपाययोजना वगैरे विषय असायचे. विलासरावांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला व त्यांच्या कार्याला गवसणी घालून शब्दबद्ध करणे अत्यंत अवघड काम आहे. कोणीही प्रतिभावंत लेखक त्यांना पूर्ण न्याय देऊ शकणार नाही. दुष्काळाच्या झळा आपण वारंवार सहन करीत आहोत. त्याचा सामना करण्यासाठी विलासरावांचे विचार, तसेच निसर्गाचे संवर्धन करणारी अनुकूल सर्वसमावेशक पर्यायी विकास नीती नजीकच्या काळात अवलंबावीच लागेल.

 

मूलभूत विचार पाणी वाटपाचा

 

महाराष्ट्रातील पाणीप्रश्न या विषयाच्या वाचनास सुरुवात केली होती. पाणी प्रश्न समजून घेत असतांना पाणी विषयावर आज वर झालेल्या घटनांचा अभ्यास केला. त्याचं मध्ये मला सर्वसमावेशक महाराष्ट्रातील पाण्याच्या वाटपाबद्दलचा फार मूलभूत विचार विलासरावांनी मांडला; काही काळ समाजातील समाजवादी, साम्यवादी विचार म्हणून उसाच्या धनदांडग्या शेतकरी, पुढारी वर्गाने त्यांची हेटाळणी केली. परंतु विलासरावांचा द्रष्टेपणा आजच्या पाणीटंचाईच्या काळात जाणवल्यानंतर आज मात्र या पुढाऱ्यांची भंबेरी उडालेली दिसते. मुख्यत्वे शास्त्रशुद्ध मांडणी आणि उपलब्ध माहितीचे विज्ञाननिष्ठ विश्लेषण यांमुळे महाराष्ट्रातील काय, किंबहुना देशाचा पाणीप्रश्न हा मानवनिर्मित आहे आणि निसर्गनिर्मित नाही; हा सामान्यांना वरकरणी चुकीचा वाटणारा आणि दिवसेंदिवस पावसाच्या वेभरवशीपणाला शिव्याशाप देणाऱ्या शेतकरी, पुढारी वर्गाच्या मतांमुळे चूक वाटणारा खरा सिद्धांत त्यांनी विचारपूर्वक मांडला. देऊन ग्रामीण भागात एकूण लागणाऱ्या पाण्याच्या फार तर फार २% पाणी पिण्यासाठी पुरेसे आहे आणि सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था केली तर पिण्याचे पाणी थोड्या सामाजिक शिस्तीने अगदी नक्की 'बाय प्रॉडक्टम्हणून उपलब्ध होईल. ही वस्तुस्थिती विलासरावांमुळेच महाराष्ट्राला अवगत झाली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पण दुर्दैव म्हणजे हे कळूनही अंमलबजावणी अद्यापही होत नाही.

बहात्तरच्या दुष्काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रात लागू असलेल्या व पुढे इतर राज्यांत ज्याचे उदाहरण दिले जाते, अशा रोजगार हमी योजनेबाबत विलासरावांनी फार मूलभूत सूचना केल्या. रस्त्यासारखी दुष्काळी कामे काढून पैसे वाया घालवण्यापेक्षा पाझर तलाव, तळी यांची कामे करून 'पुढील पावसाचे पाणी साठवण्यासाठी सज्ज राहा' हा महाराष्ट्राला दिलेला बहुमोल सल्ला आजही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे व त्या काळातील या धोरणामधील आमूलाग्र बदलास कारणीभूत झालेले व तटस्थपणे महाराष्ट्रातील दुष्काळांचा अभ्यास केलेले इलेक्ट्रिकल इंजिनियर, अ‍ॅक्युरेट गेजिंग या स्वतःच्या यशस्वी मेकॅनिकल क्षेत्रातील उद्योजक प्रणेते विलासराव होत. या सर्व तत्त्वज्ञानाचे बालामृत आत्मसात करीत असतानाच पाण्याचे गावपातळीवर नियोजन आणि वाटप यांचा एकत्रित विचार होणे अत्यंत गरजेचे आहे, हे मत किती मूलतः विचार केलेले आहे, हे जाणवले. कधीकधी तर पुढे जाऊन मांडलेले भूमिहीनांचेही पाण्याचे अधिकार इत्यादी विषय फारच तात्त्विक वाटल्याने सवडीने विलासरावांशी त्यावर चर्चा केली, तर त्यांनी दक्षिण अफ्रिकेतील पाणी कायदा काय सांगतो, जलनीती म्हणून आपण आज किती मागास विचार करतो आहोत; तसेच एक ना एक दिवस पाणी हा घटनेतील मूलभूत हक्कांमध्ये जाणारा विषय आहे, हे त्यांचे प्रतिपादन ऐकून त्या बालवयात या कल्पना रम्य, गूढ वाटणे याव्यतिरिक्त अन्य काही होणे अशक्य होते, पण ग्लोबल वॉटर पार्टनरशिपच्या बैठकीत वसुधा पांगारेद्वारा हाच विचार सध्या जगभर मांडला जात आहे; आणि हा विचार कैक वर्षांपूर्वी मांडणारे आपले गुरुजी किती दूरचा विचार करीत होते, हे सांगितल्यानंतर खरोखरीच हा माणूस काळाच्या फारच पुढचा विचार करीत असल्याने सर्वसामान्यांना पचला नाही, अशा निष्कर्षाप्रत येऊन पोहोचणे अपरिहार्य आहे. सामाजिक काम करायची तर त्यासाठी लोकांशी नाळ जुडणे महत्वाचे आहे. त्यासाठी गावागावांतून आरोग्य व युवक संघटन या विषयांकरिता हिंडताना प्रकर्षाने जाणवले की पाण्याची समस्या हीच सर्व ग्रामीण दारिद्याच्या मुळाशी आहे आणि विलासरावच या कोरडवाहू तसेच मर्यादित सिंचनक्षमतेच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना मार्ग दाखवू शकतात, याची खात्री झाली. यामधूनच प्रत्येक गावात सर्वप्रथम पाण्याच्या समस्येचे निराकरण व मगच पुढील कार्यक्रम, हे समीकरण बनले. याच कालावधीत शेतकऱ्यांचे पुढारी शरद जोशी तसेच अन्य शेती अर्थविषयक तज्ज्ञ व दांडेकरांसारखे प्रकांड पांडित्य असलेले अर्थतज्ज्ञ यांच्याशी विविध प्रसंगी चर्चा करण्याची संधी उपलब्ध झाली. शरद जोशींच्या स्वभावाप्रमाणे अर्थातच त्यांनी माणशी अर्धा एकर पाणी वगैरे समाजवादी कल्पनांनी शेतकऱ्याला काहीही मिळणार नाही. याउलट त्याला गरिबी वाटून कशी घ्यावी, याचे तत्त्वज्ञान आपण शिकवल्यासारखे होईल इत्यादी हेटाळणीवजा युक्तिवाद केले; तर दांडेकरांनी थोडे विचकत पण असाच काहीसा सूर लावला. एकूणातच अर्थशास्त्र कशाशी खातात; आणि त्यातून ग्रामीण अर्थरचना वगैरे प्रश्नावर ह्या मंडळींसमोर आपली काय टाप, या भावनेतून गप्प राहणेच योग्य आहे असे ठरवले. पण विलासरावांनी यावरही विचार नक्कीच केला असणार तरी यावर त्यांच्याशीच चर्चा होणे आवश्यक आहे, असे कुठेतरी वाटतच राहिले.

 

कोरडवाहू शेतकऱ्यास संजीवनी

 

एका गावातील प्रयोगाने काही लोकांनी महाराष्ट्रातील- नव्हे देशातील- सहा लाख खेड्यांना उत्तर शोधल्याचे दावे केले. पण विलासराव मात्र मांडलेले सूत्र ठराविक एका सॅम्पल साईजच्या खेड्यांवरती अंमलबजावणी झाल्याखेरीज सार्वत्रिकीकरण करत नसत. हे त्यांच्या १०० हून अधिक विविध उपसा जलसिंचन योजनांच्या अभ्यासपूर्वक केलेल्या प्रयोगांतून लक्षात आले. काही तत्त्वे ही फार तर सर्व प्रयोगांमध्ये उपयोगी ठरतात, म्हणून तोच प्रयोग सार्वत्रिक कार्याचा मोह कधीही त्यांना झाला नाही आणि म्हणूनच त्यांची पाणी वाटपाची कल्पना कोणत्याही एका क्षेत्रापुरती मर्यादित न राहता खरोखरीच महाराष्ट्रातल्या कोरडवाहू शेतकऱ्याला संजीवनी ठरली. पाण्याची गावपातळीवर अशा प्रकारची चर्चा करणारा हा द्रष्टा पाणी पंचायत' या संकल्पनेचा प्रणेता म्हणून देशात नव्हे तर अवध्या विश्वात ओळखला जाऊ लागला. आणि पाण्याच्या रेशनिंगच्या सिद्धांताने पु.ल.देशपांडे यांसारख्या लेखकालाही त्यांनी डिवचल्यावाचून सोडले नाही. याचाच परिपाक म्हणून पुलंनी महाराष्ट्र टाइम्समध्ये माणशी अर्धा एकर पाणी: एक विलक्षण कल्पना' हा लेख लिहिला. स्वयंसेवी क्षेत्रातील कामावरती जेवढा दृढ विश्वास विलासरावांचा होता, त्याचबरोबर राजकीय इच्छाशक्तीशिवाय धोरणात्मक बदल घडणे केवळ अशक्य आहे, या भावनेपोटी विलासरावांनी १९८४  साली स्वतः आमदारकीची निवडणूक लढवली, पण ते पराभूत झाले. विलासरावांना निवडून जाऊन सत्तेचे राजकारण न करता विषयांवर आधारित दबावगट निर्माण करायचे होते, हे त्यांना कळलेच नाही. किंबहुना पाणीपंचायतच्या संकल्पनेलाच थोड़ासा सेटबॅक मिळाला, अशाही निर्णयाप्रत येणे गैर ठरणार नाही. परवा परवा म्हणजे सहा महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये अरुण शौरी हे प्रशासकीय सुधारणा या विषयाचे मंत्री असताना त्यांनी 'Ideas that have worked' या व्याख्यानमालेत शेवटचे पुष्प विलासरावांना गुंफण्यास सांगून पाणी पंचायतीच्या संकल्पनेचा एकप्रकारे गौरवच केला.

 

नावीन्य कार्यशैली

 

विलासराव साळुंखे यांनी ग्रामीण विकास संस्था परिषदेच्या खिरोदा येथील जळगाव जिल्ह्यातील मधुकरराव चौधरीं समवेतच्या बैठकीपासून बाळासाहेब विखे यांनी आयोजित केलेल्या प्रवरानगरच्या पाणी परिषदेपर्यंत प्रत्येक वेळी नवीन माहिती समाजापुढे  सादर करत आणि दर काही महिन्यांनी विलासराव नवीन प्रयोगाचे सूतोवाच करायचे. आपल्याच कामाचे तुणतुणे वाजवत बसणे हे तर दूरच; पण लोकांनी कोणी कोणी त्यांची स्तुती केली आहे  हे सांगणेही त्यांनी कधी आपणहून केले नाही. प्लॅनिंग कमिशनपासून ते प्रेसिडेंटपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, तर सरपंचापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत राज्यामध्ये त्यांना मिळालेली शाबासकी, ही खरे तर फार मोठी आणि मोलाची आहे. पाणी पंचायत हीच संकल्पना खऱ्या अर्थाने पाणी वापरा बाबत प्रत्येक ग्रामीण भागात हा विचार पोहचला. जलक्षेत्रात काम करत असतांना सर्व ठिकाणी एकाच पद्धतीचे काम होऊ शकणार नाही हे त्यांच्या कामातून दिसून येत होते. त्यामुळेच काय जेष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी विलासरावांवर भगीरथाचे वारस ही उपाधी दिली त्यावर पुस्तक प्रकाशित झाले. भगीरथाने गंगा जमिनीवर आणली आणि सर्व परिसर सुजलाम सुफलाम झाला. कदाचित हाच वारसा विलासराव यांनी परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावलेलं आपण सर्वांनी बघितले. त्यामुळे त्यांनी हे काही काम आयुष्यात केले त्यामध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण करण्याचे प्रयत्न केले. त्यांची हीच कार्यशैली खऱ्या अर्थाने आजच्या नवीन कार्यकर्ताना बळ काम करण्यास मिळावे. सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना खऱ्या अर्थाने कायद्यात्म्क व धोरणात्मक बदल करायचा असेल तर प्रवाहा बाहेर राहून ते करणे शक्य नसते यांची जाणीव त्यांना असावी यासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न कर्ला असावा पण राजकीय क्षेत्रात सामजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना जनता कुठे स्थान देते हा प्रश्न खऱ्या अर्थाने विचार करावा वाटतो.

 

आज पाणी प्रश्न बिकट होत असतांना जलक्षेत्रात तथाकथित जलतज्ञाचं जाहीर प्रकटीकरण होतांना दिसते. पाणी पश्न बाजूला राहून उत्सव साजरे होऊ लागले. मुलभूत संकल्पना रसतळाला लावून उत्साहीकरणातून पाणी प्रश्न सुटणार असे आता वाटू लागले. समजतील जलतज्ञ आणि जलअभ्यासक यामध्ये खूप फरक आहे. आज मात्र जलअभ्यासक हे जलतज्ञ म्हणून काम करु लागले. खर तर विलासराव साळुंखे यांनी दिलेला प्राथमिक विचारावर पुन्हा नव्याने मांडणी करून समाजात लोकांपर्यत पोहचणे गरजेचे आहे.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

राष्ट्रीय व राज्य समन्वयक – सहज जलबोध अभियान

चलभाषा – ९०९६२१०६६९

 

No comments:

Post a Comment