Thursday, March 3, 2022

विचारांची क्षमता व्यक्तीची प्रगल्भता...!

विचारांची क्षमता व्यक्तीची प्रगल्भता

बुद्धीला किंवा मनाला काही नियमांनुसार 'चालविणेम्हणजे विचार करणे. "पुर्वानुभवाच्या मदतिने व्यक्तिच्या मनातल्या मनात होणारी प्रक्रिया म्हनजे विचार होय". विचार प्रक्रिया;- (THINKING PROCESS) - विचार हि मानवि मनाचि प्रक्रिया आहे. डोळ्यासमोर नसलेल्या कोणत्याहि गोष्टिबद्दल चालु असलेल्या मानसिक प्रक्रियेला आपण विचार म्हणतो.

डॉ. जोसेफ मर्फी यांचे द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंडहे भाषांतरित पुस्तक वाचण्यात आले. मानवी जीवनात आपल्या अचेतन मनाच्या शक्तीचा कसाकसा उपयोग करून घेता येईल आणि मानवी जीवन समृद्ध करता येईल याबद्दलचे विवेचन त्यात आहे. माणसाचे माणूसपण त्याच्या विचारप्रक्रियेत आहे. माणूस दररोज हजारो विचार करत असतो. विचारांशिवाय तो एक क्षणही राहू शकत नाही. विवेकबुद्धीने, सारासार विचाराने, चांगल्या-वाईटाच्या नजरेने त्या विचारांकडे बघितले, तर काही विचार चांगले, सकारात्मक प्रगतीशीलतेकडे नेणारे, आनंद निर्माण करणारे आणि जीवन समृद्ध करणारे असतात. काही विचार नकारात्मक, नैराश्य निर्माण करणारे असतात. मार्कस् ऑरकेस हे रोमन तत्वचिंतक म्हणतात की, ‘माणूस जसा विचार करतो, तसे त्याचे जीवन असते’. जागृत मनाचे क्षेत्र फक्त दहा टक्के असते तर अबोध मनाचे, अचेतन मनाचे क्षेत्र नव्वद टक्के असते. जागृत मनाच्या पातळीवरचे विचार माणूस विसरून जातो. आपण दररोज उठल्यापासून नित्याची, सवयीची कामे करत असतो. ती करत असताना विचार करतो, पण ते सर्व विसरून जातो. परंतु भावनात्मक विचार जर खूप प्रभावी असतील तर त्या व्यक्तीला त्या विचारांचा त्रास होतो. ते विचार पुन्हा पुन्हा डोके वर काढून मानवी जीवन ढवळून काढत असतात. एखादी व्यक्ती बुडताना वाचली, अपघातातून वाचली, आर्थिक व्यवहारात मोठी फसवणूक झाली अशांसारखे भावनात्मक विचार माणूस सहजासहजी विसरत नाही. अबोध मनातले विचार सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रकारचे असू शकतात.

 

विचारांचं सामथ्र्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. सामान्यपणे आपलं आपल्या विचारांकडे लक्ष नसतं; किंबहुना विचारांच्या बाबतीत जेवढी सजगता असायला हवी तेवढी आपल्यामध्ये नसते. एखादी चांगली गोष्ट करताना मनात येणारा पहिला सृजनशील विचार पकडून ठेवता आला पाहिजे, तशी सवयच लावून घ्यायला हवी व तात्काळ कृतीच्या अंमलबजावणीची रूपरेषा ठरवली गेली पाहिजे. मनात येणाऱ्या पहिल्या विचारालाच नकारात्मक विचारांचे मळभ लाभले की कार्यसिद्धीला ग्रहण लागलंच म्हणून समजा. पाणी ज्याप्रमाणे उताराकडे वाहतं तसे बहुसंख्य वेळेला माणूस नकारात्मक विचार करताना दिसतो. आपल्या सभोवती, जवळपास किंवा दूरवर ज्या वस्तू पसरलेल्या असतात, किंवा ज्या घटना घडत असतात त्यांचे अवकलोकन करून त्यांच्याविषयीचे ज्ञान आपण मिळवितो. अशा ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. पण वाईला पण वाईला माझ्या खोलीत मी बसलो असता मुंबईत कार्यालये सुटण्याच्या वेळी होणाऱ्या गर्दीचा व माणसांच्या धावपळीचा विचार मी करीत असेन किंवा येत्या सुटीत कुठे प्रवास करावा, काय मजा करावी ह्याचा विचार मी करीत असेन. हे प्रत्यक्ष ज्ञान नाही, कारण आपले प्रत्यक्ष ज्ञान हे ज्या वस्तू आपल्याभोवती उपस्थित असतात त्यांच्याविषयीचे ज्ञान असते उपस्थित वस्तूंना ते बांधलेले असते. पण आपले विचार हे अनुपस्थित वस्तूंविषयी, ज्यांचे प्रत्यक्ष अवलोन होत नाही अशा वस्तूंविषयी, भूतकालीन, भावीकालीन वस्तूंविषयी किंवा काल्पनिक वस्तूंविषयीही चाललेले असतात. उदा. पऱ्यांचा जीवनक्रम कसा असतो ह्याविषयी विचार करण्यात एखादा माणूस गुंगून जाईल. अनुपस्थित वस्तूंचे प्रतिनिधित्व करणारी अशी प्रतीके आपल्या मनात असतात आणि अशा प्रतीकांच्या साहय्याने, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या विचार करतो. अनुपस्थित वस्तूंची जागा तिचे प्रतिक घेते. तेव्हा विचारप्रक्रिया ही प्रतीकात्म प्रक्रिया असते. येथे एक बाब स्पष्ट केली पाहिजे: अनेकदा समोर वा जवळच उपस्थित असलेल्या वस्तूविषयी−उदा. एखाद्या व्यक्तीविषयी−आपल्या मनात जे विचार येतात त्यांचा आशय (उदा., ह्या व्यक्तीचे बालपण खडतर होते ही व्यक्ती महत्त्वकांक्षी आहे ती उद्या अमुक एक गोष्ट करणे शक्य आहे इत्यादी) खरोखरी पाहता ज्यांचे प्रत्यक्ष अववलोकन होत नाही, अशा बाबींविषयीचा असतो. त्या व्यक्तीचे बालपण हे प्रत्यक्षात तिथे नसते. तिची महत्त्वाकांक्षाही आपल्या विचारांच्या पातळीवरच असते आणि ती व्यक्ती अमुक एक गोष्ट उद्या करील, ही बाब एका भविष्यकालीन घटनविषयीची आपली कल्पना असते.

स्व-प्रतिमाग, विधायक विचार -  स्वत:बद्दल व्यक्तीचं चांगलं मत असणं हे सृजनात्मक विचारांच्या जोपासनेसाठी, आत्मविश्वास निर्मितीसाठी व सुदृढ मानसिक स्वास्थ्यासाठी अग्रक्रमाची गोष्ट ठरत स्वची ओळख होणं ही या प्रक्रियेतील महत्त्वाचा व सुरुवातीचा टप्पा आहे. सकारात्मक विचार करण्याची सवय लागली की आपोआपच स्वत:विषयी आदर निर्माण होतो व सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होते. चांगली स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी स्वत:चं चिकित्सक अवलोकन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरच सकारात्मक विचारांचा पाया म्हणून ओळखली जाणारी सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सकारात्मक स्व-प्रतिमा असणारे व्यक्ती स्वत:बद्दल जागृत असतात. स्वत:च्या गुण-दोषांबद्दल त्यांना जाणीव असते. स्वत:बद्दल चांगली भावना योग्य निर्णय घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासाठी महत्त्वाची आहे.

स्वत:शी संवाद साधणं -स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत:ला स्वत:मध्ये असणाऱ्या गुण-दोषांसहित स्वीकारणं म्हणजेच सकारात्मक स्व-प्रतिमा निवडण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल होय. इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून स्वत:ची किमत करू नये. कारण आपणच स्वत:ला चांगले ओळखू शकतो.

नावीन्यत - जीवन जगत असताना नावीन्याचा सातत्याने पाठपुरावा केला तर सर्जनशीलतेचा विकास होण्यास हातभार लागतो. दैनंदिन कृती करताना एखादी समस्या सोडवताना यामध्ये आणखी काय नवीन करता येईल, याचा विचार केला तर अनेक मार्ग अजून सुचू शकतील. अगदी बोलतानाही अचूक, समर्पक अथवा नेहमी वापरतो त्यापेक्षा वेगळ्या शब्दांचा शोध घेतला तर भाषाही समृद्ध होईल. नावीन्य ही मनाची ओढ असली तरीही प्रत्यक्षात कृती करताना व्यक्ती नवीन मार्ग अवलंबायला तसा धजावत नाही. सकारात्मक विचारांमुळे या विचारसरणीमध्ये निश्चित बदल होऊ  शकतो. नव्या दृष्टिकोनातून विचार केला म्हणूनच आईनस्टाईन, बिल गेट्स, जेम्स वॅट, एडिसन, गौतम बुद्ध, जगदीशचंद्र बोस यांसारख्या महान व्यक्ती ज्ञानाच्या कक्षांची क्षितिजे विस्तारण्यात यशस्वी झाल्या.

स्वत:ला स्वीकारणं - बऱ्याच वेळा व्यक्ती स्वत:च्या रंग, रूप, उंची यानुसार स्वत:चं मूल्यमापन करतो. वर्ण काळा असेल, उंची कमी असेल तर स्वत:बद्दल नकारात्मक विचार निर्माण होतात. क्वचित प्रसंगी आलेल्या अपयशाने खचून न जाता अपयशाच्या कारणांचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाची अद्वितीय कलाकृती असते, त्यामुळे इतरांशी तुलना करून स्वत:ला कमी लेखण्यापेक्षा स्वत:मध्ये सातत्याने सुधार कसा होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे.

विचार करणं हे महत्वाचे आहे. नेमका आपण विचार कसा करतो त्यावर सर्व अवलंबून असते. खर तर सोभवताली असलेल्या परिस्थिती वरून माणसाच्या विचारात बदल होत असतात. विचार करण्यासाठी वातावरण महत्वाचे असते. सर्जनशील व्यक्ती सामन्यपणे आत्ममग्न, एकांडी, तुसंडी, आपल्या सामाजिक परिसराशी जुळवून घेऊ न शकणारी अशी असते, अशी एक समजूत आहे. ह्या बाबतीत पहाणी करून काढलेला निष्कर्ष असा, की प्रत्येक सर्जनशील व्यक्तीच्या बाबतीत हे खरे नसेल, तरी अशा वृत्तीच्या व्यक्तींचे सर्जनशील व्यक्तींशी असलेले प्रमाण सर्वसाधारण माणसांच्या तुलनेने, लक्षात यावे इतके यावे इतके जास्त असते.

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९ 

4 comments: