Saturday, August 28, 2021

‘मरण माझे मरून गेले, मज केले अमर’

‘मरण माझे मरून गेले, मज केले अमर’

भारतीय समाजाच्या प्रगतीच्या वाटेत ज्या स्त्रियांनी पाश्चात्य देशातून येऊन भारतासाठी कार्य केलं त्यात डॉ. गेल ऑम्वेट एक होत्या. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक, अभ्यासक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल तथा शलाका भारत पाटणकर यांचं  नुकतंच निधन झालं. भारतीय समाज, आदिवासी जीवनपध्दती, लोकजीवन, भारतीय मौखिक परंपरा, संत साहित्य याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. डॉ. गेल यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी विशेष कार्य केलं. तथागत गौतम बुद्धांनी मांडलेल्या मानवतावादाच्या सिद्धांतासह, महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान त्यांच्या सामर्थ्यासह त्यांनी आपल्या साहित्यातून नव्यानं मांडलं.

क्रांतिवीर बाबूजी पाटणकर, क्रांतिवीरांगणा इंदुमती पाटणकर यांचा वैचारिक वारसा पुढं चालवत श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलं. डॉ. भारत पाटणकर यांच्या जीवनात क्रांतिची फुलं ओंजळीत घेऊन ती आली. जसी लवलवती शलाका (डॉ. गेल ऑमव्हेट)च प्रकाशाच्या वाटेवर क्रांतिची वाट साथसंगतीनं चालू लागली. क्रांतिबाचा सत्यशोधक वारसा निभावता निभावता त्या श्रमिकांच्या, शोषितांच्या, नरनारीवरील अत्याचारांच्या वेदनेचा हुंकार बनल्या. जो स्वत:च झाला होता ज्ञानाचं विद्यापीठ त्याच्या नावाचाही इथल्या विद्यापीठाला होणारा विटाळ संपवण्यासाठी लहानग्या लेकीचं ओझं पोटात वागवत ती त्याच्या साथीनं चालत गेली होती मराठवाड्याची वाट! तिनं क्रांतिसूर्याच्या ज्ञानाचं तेज दाखवुन दिलं. इथल्या अन्यायाविरोधात संघर्ष केला. शेतकरी बांधवाच्या प्रश्नांसाठी कै. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत देखील त्यांनी लढा दिला. शेतीतील अर्थशास्त्र समजून घेणं त्यांना आवश्यक वाटलं. ज्यावेळी शेतकरी संघटनेचं लक्ष्मीमुक्तीचं आंदोलन सुरू होतं त्यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावातील शंभरपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आपल्या कुटुंबातील महिलांच्या नावानं जमिनी केल्या. त्यावेळी शरद जोशी यांच्यासोबत डॉ. गेल ऑम्वेट पण होत्या. त्यावेळी उपस्थितांना प्रश्न पडला या आपल्यासोबत कोणत्या भाषेत बोलतील! पण मराठी मातीला स्पर्श केलेला प्रत्येक संवेदनशील व्यक्ती येथील भाषा बोलतो आणि डॉ. गेलही अस्खलित मराठीतच बोलल्या. एकूणच उपस्थित शेतकरी व स्त्री यांना त्यांचे विचार ऐकण्यास मिळाले. महाराष्ट्रातील स्त्री जीवनाबद्दल व स्त्री प्रश्नांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता.

अमेरिका ते कासेगाव हा त्यांचा प्रवास खूप अद्भुत होता. परक्या देशातून येऊन अखेरपर्यंत इथल्या मातीशी एकरूप होणं, इथल्या माणसांवर जिवापाड जीव लावणं आणि अमीट होऊन जाणं! कोणत्या मतीचे अन मातीचे असतात हे लोक? कोणत्या प्रकारची ही एकरूपता, निष्ठा? विनातक्रार सहज कसं सामोरं जातात सार्‍याच तडजोडीला हे लोक? कोणती बांधिलकी असते ही आणि कोणते अनाम ऋणानुबंध? ज्यामुळे शेवटचा श्वासही ह्याच मातीत घेतात! अफाट विश्वासानं या हिमालयांपुढे आपण पार खुजे आहोत याची लख्ख जाणीव होते अशावेळी. प्रिय गेल मॅम, आपलं नाव ‘भारत’ आणि भारताशी कायमचं जोडलं गेलंय. इथल्या इतिहासात ते कायमचं कोरलं गेलंय! जोपर्यंत इथं दुहीची दरी माणसाला पिडत राहील, नागवत राहील तोवर शोषितांच्या लढ्यातील घोषणांमध्ये आपला आवाज कायम इथं घुमत राहील. प्रियकराची ‘सखी’ झालात तुम्ही सर्वार्थानं! त्याची वेदना, लढा, पायपीट, ध्येय सारं सारं निरपेक्षपणे स्वीकारलंत तुम्ही! जसं ते सारं सारं जन्मतः तुमच्याबरोबर आलं असावं अशा तळमळीनं! चिखलमातीत, उन्हातान्हात, पाण्या-पावसात तिन्ही ऋतूत तुडवलेल्या वाटांवर तुमच्या पायांचे ठसे कित्येक पिढ्यांना कैक काळ दिशा दाखवत राहतील. तुमचं साहित्य, भाषणं, शब्द अन त्यातली आर्तता, विवेकपूर्ण मांडणी-संशोधन देत राहील सतत स्फूर्ती आम्हाला समतेची मुळं शोधण्याची आणि संघर्षाची! तुम्हीच सिद्ध केलंय तुमच्या अवाक करणार्‍या प्रवासातून की माणूस इथून-तिथून समग्र एकच आहे. भलेही असेल त्याचा रंग, नाव, गाव, भाषा, वेष भिन्न पण त्याची स्वातंत्र्य अन किमान न्याय-सुखाची अपेक्षा समानच असते. मग अगदी कुठंही जा पृथ्वीच्या पाठीवर! तुम्ही जाऊच शकत नाही कधी विस्मरणात आमच्या कारण तुम्ही आहात दीपस्तंभ उंचच उंचच आभाळाला टेकणारा! मातीचा भूगोल असेलही भिन्न पण आभाळ एकच असतं ना सर्वांचं! याच आभाळाखाली लढू आम्ही, पुढील आशेच्या किरणासाठी! तुमचे तेजस्वी विचार येथे रुजले आहेत. तुमची पुस्तकं देखील तेवढीच महत्त्वपूर्ण आहेत.
इंडियन वूमन इन स्ट्रगल, ग्रोइंग अप अनटचेबल इन इंडिया (वसंत मून यांच्या मूळ मराठी आत्मचरित्राचे भाषांतर), दलित अ‍ॅन्ड डेमोक्रॅटिक रिव्हॉल्युशन, रिव्हॉल्यूशन : इंडियाज न्यू सोशल मूव्हमेंट, साँग ऑफ तुकाराम, वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड- (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक दिघे) असे वैचारिक लिखाण येथील मातीशी प्रामाणिक राहून तुम्ही पूर्ण केलं. तुमच्या साहित्याचा उपयोग श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यासाठी झाला.

डॉ. गेल आणि भारत पाटणकर यांचं नातं मानवी मूल्यांची पराकोटीची जोपासना करणारं! यापुढे नवे लोक ज्यावेळी प्रेमाच्या अनुबंधातून एकत्र येतील, समाज, साहित्य, राजकारण वा अन्य आणखी कुठल्याही क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून काही करू धजतील त्यांच्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. पाटणकरांच्याच शब्दात गेल यांच्याबद्दल सांगायचं तर ‘‘ती जगाला देत चाललेली आहे. सिद्धांताच्या क्षेत्रात, व्यावहारिक चळवळीच्या क्षेत्रात, मैत्रीच्या क्षेत्रात! पण हे ती तिच्या नैसर्गिक वृत्तीचा भाग म्हणून सहजी करत आली आहे. शब्दांची रत्ने ती उधळीत गेली आहे. ‘ओले मूळ भेदी खडकाचे अंग’ ही तुकोबांची उक्ती जनता आणि कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोहचवीत आली आहे. ‘उंबरातील कीटका, हेचि ब्रह्मांड ऐसे लेखा’ अशा वृत्तीने चळवळीकडे संकुचित पद्धतीने पाहू नका, असे सांगत आली आहे. ‘ढाल गरवारे गुंतले हे कर, म्हणे तो झुंजार कैसा झुंजो’ असे न वागता परिस्थिती बदलणार्‍या उपायांचा अवलंब करा, असे म्हणत आली आहे. ‘एका बीजा केला नास, मग भोगले कणीसतुका, म्हणे रणी, जीव देता लाभ दुणी’ अशी नवनिर्माण प्रक्रिया मांडत आली आहे. ‘मीच मज व्यालो, पोटा आपुलिया आलो. दोहींकडे पाहे, तुका आहे तैसा आहे’ या पद्धतीनं स्वतःला बदलण्याची प्रक्रिया घडवूया, असा तुकोबांचा संदेश देत आली आहे. म्हणूनच आता ‘मरण माझे मरोन गेले, मज केले अमर’ या तुकोबांच्या अभंगातील वृत्तीने आज जीवन पूर्ण तृप्त पद्धतीने सुरू आहे. गेलसारख्या व्यक्तिंना भक्त असू शकत नाहीत, भाट असू शकत नाहीत! पण तिने जे देणे दिले आहे ते तरी समग्र पद्धतीने उजेडात आणले पाहिजे. शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीची प्रक्रिया पुढे जाण्यासाठी या कमोदिनीचा परिमळ सर्वदूर पसरण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे.’’
गेल आणि भारत यांच्या नात्यातील ‘अमेरिका ते कासेगाव’ असा प्रवास आपण सर्वांनी वाचायला हवा असाच आहे. मला वाटतं डॉ. भारत पाटणकरांनी हे अधिक विस्तृतपणे लिहायला हवंय. किंबहुना ते लिहित असतीलही. ते का लिहायला हवंय? तर असं पुरूषांनी आपल्या जोडीदाराबद्दल इतकं निखळपणे लिहिणं या पुरूषसत्ताक समाजरचनेत फारसं घडत नाही. भारत ज्या शोषणमुक्त समाजाची निर्मिती प्रक्रिया मांडत आहेत ती आणखी पुढं जाण्यासाठी त्यांनी हे अधिक विस्तृतपणे लिहायला हवंय असं माझ्यासारख्या व्यक्तिला वाटणं साहजिक आहे. यावर एखादा उत्तम चित्रपट पुढे जाऊन कुणी करू शकेल असं हे सगळं आहे. या दोघांच्या नात्याचा परिमळ, विचारांची व साहित्यांचा दरवळ पुढे घेऊन जाणं हीच  त्यांना आदरांजली असेल.
- मयुर बाळकृष्ण बागुल,
चलभाषा - 9096210669  
(लेखक उदयकाळ फाऊंडेशनचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

No comments:

Post a Comment