Sunday, October 17, 2021

स्त्री स्वतंत्र्याचा पुष्पगंध दरवळू या...!

ग्रामीण महिला आणि समाज जीवनाकडे बघितल्यावर आज देखील स्त्री चूल आणि मुल हीच संकल्पना दृढ दिसते असे म्हणता येणार नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने सन २००७ मध्ये दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ‘आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यासंबंधी ठराव संमत केला. ही कल्पना सर्वप्रथम सन १९९५ च्या बीजिंग येथील जागतिक महिला परिषदेमध्ये मांडली गेली होती. दरवर्षी १६ ऑक्टोबर हा ‘जागतिक अन्न दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो व त्याचे औचित्य साधून १५ ऑक्टोबरला ग्रामीण महिला ज्या खऱ्या अर्थाने अन्नदात्या आहेत, त्यांच्या नावाने साजरा करावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय महिला संघटनांनी केले होते. त्यामुळे काही देशांमध्ये १९९७ पासून हा दिवस साजरा केला जात होता. त्यापुढे जाऊन सन २००७ साली संयुक्त राष्ट्र संघाने एका महत्त्वाच्या ठरावाद्वारे औपचारिक मान्यता दिली व २००८ पासून तो अनेक देशांनी अमलात आणण्यास सुरुवात केली.
या ठरावामध्ये ग्रामीण विकास, अन्नसुरक्षा आणि गरिबीचे निवारण यामधील ग्रामीण महिलांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे नमूद केले आहे. तसेच ग्रामीण महिलांची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण करणे; लिंगभाव, जात- धर्म- वर्गसारख्या विषमतांमुळे निर्माण झालेले अडथळे दूर करून त्यांचा संपूर्ण सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे; योजनांचे नियोजन, अंमलबजावणी व मूल्यांकन यामध्ये त्यांचा संपूर्ण सहभाग घडवणे; कायदे व धोरणे यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करणे, इत्यादी गोष्टींचा उल्लेख केला आहे.
जागतिक ग्रामीण महिला दिवस जगभरात निरनिराळ्या पद्धतीने साजरा होऊ लागला. उदा. शेतकरी महिलांना पुरस्कार देणे, ग्रामीण महिलांचे प्रश्न सातत्याने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मंचांवर मांडणे. सन २०१६ मध्ये उएऊअह (कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमन) च्या कलम १४ च्या ३४ व्या सूचनेवरून ग्रामीण स्त्रियांचे महत्त्व अधिक ठोसपणे अधोरेखित झाले. यात सर्व सदस्य देशांना पुढीलप्रमाणे आवाहन केले गेले.
१. राष्ट्रीय पातळीवरील धोरणांचा ग्रामीण महिला आणि महिला शेतकऱ्यांबद्दल स्थानिक संदर्भामध्ये विचार करावा. २) समानता साधण्यासाठी महिला शेतकऱ्यांचे अधिकार बळकट करावेत. उएऊअह च्या ३४ व्या सर्वसाधारण सूचनेमध्ये एकात्मिक धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या अन्न आणि पोषणावरील हक्क स्पष्टपणे मान्य केला असून सदस्य देशाने वरील गोष्टींवरील त्यांचा हक्क मान्य करून त्याचे संरक्षण करावे असे नमूद केले आहे.
भारतात ही प्रक्रिया खूपच संथ गतीने पुढे चालली आहे. सन २००७ मधील राष्ट्रीय किसान धोरणात महिला शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख आहे. त्यांना जमीन, जंगल, पाणी यावर अधिकार मिळण्याच्या दृष्टीने मांडणी केली आहे. शेतकऱ्यांची व्याख्या व्यापक केली आहे व ती जमिनीच्या मालकीशी न जोडता त्यांच्या कष्टाशी जोडली आहे. विशेषकरून महिला शेतकऱ्यांसाठी खास कायदा  करण्याची मांडणीदेखील यात केली आहे. तशा प्रकारचे खासगी विधेयक स्वामिनाथन यांनी राज्यसभेत मांडलेदेखील; पण एकंदरीतच ग्रामीण कष्टकरी स्त्रियांविषयीची उदासीनताच सरकारच्या कारभारातून दिसून येत आहे. खर तर ग्रामीण भागात शेती क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठा आहे. परंतु स्त्रियांना आज ही शेती जमीनीवर स्वताचा मालकी हक्क नाही. संपत्ती वर हक्क असणे हा स्त्रीचा अधिकार नाही का? चालू वर्षांत प्रकाशित झालेल्या देशाच्या आर्थिक अहवालात शेतीमधील स्त्रियांच्या सहभागाचा विशेष उल्लेख करताना ७० टक्क्यांहून अधिक महिलांचा शेतीमधील सहभाग, पण त्यातल्या १२% देखील भूधारक नाहीत ही वस्तुस्थिती त्यात मांडली आहे. खास महिला शेतकऱ्यांच्या दृष्टीने धोरणाची आखणी करण्याची गरज दर्शवली आहे. त्याचबरोबर देशाच्या एकूण बजेटपकी शेतीच्या बजेटमध्ये ३०% तरतूद करणे व महिलाकेंद्रित योजनांची आखणी करण्याची शिफारसदेखील आहे. या सर्व गोष्टी कृतीत उतरवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती खूप महत्त्वाची आहे. सध्या तरी ती महिला किसान दिवस साजरी करण्यापुरती मर्यादित राहिली आहे. 
केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून अनेक वेळा सर्व राज्य सरकारांनादेखील राज्य आणि जिल्हा पातळीवर जोशात हा दिवस साजरा करण्यासंबंधी आवाहन करण्यात येते; पण महाराष्ट्रात राज्य सरकारची फारशी काही हालचाल दिसत नाही. ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांचे प्रश्न राज्यात अधिकच बिकट होत चालले आहेत. राज्यात एकीकडे शहरीकरण झपाटय़ाने होत असले तरी शेतीवर अवलंबून असलेली संख्या मात्र कमी होताना दिसत नाही. सन २०१९-२० च्या आर्थिक अहवालानुसार शेतीचे जीडीपीमधील योगदान १४.२% इतकेच आहे आणि असे असले तरी राज्यातील ५०% लोक अजूनही शेती आणि संबंधित व्यवसायांशी जोडलेले आहेत. यापैकी ७०% हून अधिक महिला आहेत. दलित, आदिवासी, भटके, पारधी अशा सर्व समाजांतील स्त्रिया या ७०% चा भाग आहेत. यामध्ये देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या विदर्भ आणि मराठवाडय़ातील १४ जिल्ह्य़ांमधील महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे.
१९९५ ते २०१६ या काळात महाराष्ट्रात एकूण ७० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांपकी ९०% आत्महत्या या पुरुषांनी केलेल्या आहेत. या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मागे राहिलेल्या विधवा महिला त्यांच्या कुटुंबाची तसेच शेतीची जबाबदारी उचलतात. पण त्यांच्याकडे पुरेशी संसाधने तर नसतातच; पण बहुतेक वेळा त्यांना समाजाचा विरोध सहन करावा लागतो. एका बाजूला संपत्तीतून कुटुंब त्यांना बेदखल करण्याच्या प्रयत्नात असते व दुसऱ्या बाजूला सरकारची अनास्था! नावावर शेती नाही, डोक्यावर कर्जाचा बोझा आणि पदरात मुले अशा अवस्थेत त्या आपले जगणे जगत असतात. कुटुंबाच्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर शेतमजूर म्हणून काम करण्याशिवाय त्यांना पर्याय राहात नाही.
शेतीमधील संकटाचा सामना करण्यासाठी, तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीसाठी आतापर्यंत अनेक पॅकेजेस सरकारकडून जाहीर करण्यात आली. तरीही आत्महत्या होण्याच्या बंद झालेल्या नाहीत. मागील १८ वर्षांमध्ये विविध विभागांतर्फे २४ शासननिर्णय जाहीर करण्यात आले; परंतु त्यांच्या परिणामांचे मूल्यांकन अजून झालेले नाही. याउलट अशा कुटुंबांतील महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी आवश्यक तसे प्रयत्न सरकारकडून करण्यात आलेले नाहीत. त्यांच्या मुलांचे भवितव्य हा त्यांच्यासाठी सर्वात गहन प्रश्न आहे. योजना मिळवून देण्याच्या बदल्यात अधिकाऱ्यांनी लैंगिक सुखाची मागणी केल्याचे अनुभव महिला सांगतात. सरकारकडून जे रु. ६००/- महिना विधवा पेन्शन मिळणे अपेक्षित आहे, त्यासाठीचे संघर्ष सुरु असतो ग्रामीण भागात ‘‘खात्रीने पेन्शन मिळवून देऊ’’ असे म्हणणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी आटापिटा करावा लागतो, त्यापेक्षा एजंटला तीन हजार रुपये दिले की काम होते, असे अनेक स्त्रिया सांगतात, तर कर्नाटक राज्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील विधवा महिलांना विशेष पेन्शन लागू केले असून त्याची रक्कम महिना दोन हजार रु. आहे. अशीच रक्कम महाराष्ट्रात का दिली जात नाही. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात कोविड १९ मुले अनेक महिला एकल झाले. त्यांचा देखील प्रश्न गंभीर होत आहे. महिलांना रेशन मिळत नाही, रेशनकार्ड अजून त्या महिलेच्या नावावर नाही. अनेक जिल्ह्य़ातील महिलेची कहाणी तर खिन्न करणारी आहे. कुठूनच पसाअडका मिळत नाही म्हणून ती मायक्रोफायनान्सच्या विळख्यात अडकली. वसुलीसाठी ते सतत त्रास देत असतात. सरकारतर्फे दिली जाणारी मदत मिळण्यास होणारी प्रशासकीय दिरंगाई आणि या महिलांना ती न मिळणे या दोन अडचणी त्यांना आहेतच. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, हे लक्षात घेता तातडीच्या मदतीची रक्कम वाढवायला हवी, जेणेकरून आधी असणारे कर्ज फेडून नव्याने शेती सुरू करणे या महिलांना शक्य होईल. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये ५ लाख रुपये तातडीची मदत देण्यात येते आणि राज्य सरकारची राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे महाराष्ट्रात नक्की लागू करता येईल.
खरे तर या घडीला ‘महिला शेतकरी’ ही संकल्पना तत्त्वत: कितीही पुरोगामी असली तरी ती प्रत्यक्षात आणताना अनेक प्रश्न आ वासून उभे राहतात. महिला शेतकऱ्यांना जमिनीवर मालकी हक्क नसला तरी शेतकरी म्हणून दर्जा मिळेल का? त्यांना पाणी, कर्ज, कौशल्य आणि ज्ञान मिळविण्यासाठी मदत होईल का? त्यांचे शेतीमधील ज्ञान धोरणांमध्ये परावर्तित होईल का? या कळीच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने सोडवायचे असेल तर महिला शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून दर्जा देणे आणि त्यांचे हक्क त्यांना मिळवून देणे व सामाजिक सुरक्षेचे कवच वाढवणे यापासून सुरुवात करायला हवी. महिला शेतकऱ्यांना आज गरज आहे ती सामाजिक सुरक्षिततेची, शाश्वत अशी शेती पुन्हा उभी करण्यासाठी सहकार्याची, जल- जंगल- जमीन आणि इतर संसाधनांवरील अधिकाराची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक संसाधनांच्या वाटपासंबंधी निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याची गरज आहे. एकूणच सर्व परिस्थितीचा जर विचार केला तर महिलांचा संपत्ती मधील अधिकार आणि स्वातंत्र्य महत्वाचे आहे. 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे 
चलभाषा – ९०९६२१०६६९

Tuesday, September 14, 2021

तिच्या पंखाना बळ देऊया...

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन चालू बंद ची चर्चा सतत सुरु असतात. लॉकडाऊन परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये बाल विवाहचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकार अंतर्गत माहिती मध्ये समोर आले आहे. लोकांमध्ये जागृती आणि कायद्याचे अज्ञान याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र मध्ये  बाल विवाह रोखण्यात महिला व बाल विकास विभागाला यश आले आहे. पण काही ठिकाणी मोठ्या प्रमाणत बाल विवाह झाले आहेत.

नुकताच युनाटेड नेशन्स पॉप्यूलेशन फंड (युएनएफपीए) स्टेट वल्ड पॉप्यूलेशन संस्थेचा २०२० चा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात जगभरातील बाल विवाह विषयक सद्यस्थिती नोंद घेण्यात आली आहे. असे असले तरी हिंदुस्थानात ४ पैकी १ मुलीचा विवाह हा १८ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच केला जातो. तब्बल २१ टक्के मुलींचे विवाह हे १८ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी लावले जातात. महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड आंध्रप्रदेश व बिहार या ५ राज्यात सर्वेक्षण करण्यात आले. तरी बाल विवाहाची टक्केवारी २६.८ असे ही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हटला जातो परंतु बाल विवाह बाबत महाराष्ट्र मागे नाही. बाल विवाह होऊ नयेत म्हणून सरकार प्रयत्न करत असते. मात्र अद्याप त्याला पूर्णपणे रोखण्यात यश आले नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू झाली. या दरम्यान वेगवेगळ्या पद्धतीने विवाह झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, त्यातच बाल विवाह ही होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 21 व्या शतकात आजही समाजात दुर्लब घटक म्हणून महिला व मुलींना दुय्यम स्थान दिले जात आहे.  कोविड १९ च्या काळात महाराष्ट्र मध्ये विविध जिल्ह्यात बाल विवाह थांबवले गेले. त्यात प्रमुख्याने अमरावती १२, मुंबई ७, अकोला ४, बुलढाणा २३, ठाणे ६, वर्धा १६, चंद्रपूर ३, भंडारा ५, बीड १९, जालना २७, औरंगाबाद ३६, परभणी ११, सातारा ५, यवतमाळ २१,  हिंगोली १६, नागपूर ११, नंदुरबार ३, पालघर ९,  नांदेड २९, अहमदनगर २४ , लातूर २५,  धुळे १४, जळगाव ११, नाशिक १८, सोलापूर ६८, उस्मानाबाद ३३, कोल्हापूर २२, सांगली २२ व वाशिम १५ यादी जिल्हातील एकूण ५१९ बाल विवाह सन २०२० ते २१ मध्ये थांबवले गेले तर  प्रत्यक्ष बाल विवाह झालेलं काही जिल्हे पालघर ५, बुलढाणा ३८ व अन्य जिल्ह्यात बाल विवाह झाले आहे. वरील आकडेवारी ही महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र यांच्या कडून माहिती अधिकारात मिळाली आहे. हे घटना आजू बाजूला घडत असतांना समाजातील भिषण विदारक स्थिती आपल्याला बघण्यास मिळते.


 



बाल विवाह घटना शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक घडत असतात. ग्रामीण भागातील जीवन हे शेती क्षेत्राशी निगडीत आहे. आज शेती क्षेत्रा मध्ये बंदिस्त व्यवस्था असल्याने गुंतवणूक येत नाही. गुंतवणूक येत नसल्याने नागरिकांची परिस्थिती बिकट झाली. आज जमीन धारण क्षमता कमी झाले. कमाल जमीन धारण कायद्यामुळे शेत जमिनीवर मर्यादा आहे. ग्रामीण भागात आज सरासरी २ एकर जमिनी शेतकरी बांधवाकडे आहे. शेती मध्ये पैसा नाही म्हणून शहराकडे धाव घेतो. मुलगी म्हणजे परक्याचे धन या विचाराने मुलांची लग्न अगदी कवळ्या वयात लावून दिले जात आहे. आज बालविवाह बेकायदा असला तरी अनेक पालक आपल्या मुला-मुलींचे बालविवाह करू पाहात आहेत. या संदर्भातल्या कारवाईचे वृत्त आपण अनेकदा वर्तमानपत्रांमधून वाचतच असतो. पण कारवाई होत असूनही बालविवाह मात्र थांबलेले नाहीत, ही शोकांतिका आहे. अशा विवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य, खेळण्याचं वय हिरावून घेतलं जातं. बालविवाहाचे गांभीर्य लक्षात घेऊन राजा राममोहन रॉय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, बेहरामजी मलबारी, लाला गिरधारीलाल यांनी बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनमत जागे केले. त्यानंतर कायद्यांमध्ये सुधारणा होत होत बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ च्या कलम ९ व १० नुसार बालविवाह लावणाऱ्याला दोन वर्षांपर्यंत कठोर कैद व १ लाख रुपये दंड सुनिश्चित केला गेला आहे. हे असतांना देखील बाल विवाह घटना घडतात. अतिशय लहान वयात लादलेल्या गरोदरपणामुळे व प्रसूतीमुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते. तसेच गर्भपात, कमी वजनाचे अर्भक, अकाली प्रसूती, अर्भकमृत्यू व उपजत मृत्यूची शक्यता वाढते. मातामृत्यूचे प्रमाण वाढते. अपरिपक्व वयातल्या विवाहात वधू-वरांची निवड माय-बाप करतात. मुला-मुलींच्या पसंती-नापसंतीचा विचार केला जात नाही. त्यामुळे रूप, बुद्धिमत्ता, पात्रता, वय इत्यादीतील विषमतेमुळे हे विवाह विजोड ठरतात. अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता आणि परंपरा या कारणांनी बालविवाह घडून येतात. ग्रामीण भागात विवाह असला की तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील व शिक्षकांना निमंत्रण दिले जाते. या लोकांनी होणार असलेल्या विवाहाबाबत अर्थात मुला-मुलींच्या वयाबाबत माहिती घेऊन कमी वयात होणारे विवाह थांबवायला हवेत.

           बालविवाह हा कायद्याने गुन्हा ठरतो. १९२९ मध्ये हा कायदा केला गेला. त्यात सुधारणा होऊन देशात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ करण्यात आला व १ नोव्हेंबर २००७ पासून तो अमलात आला. वधू- वर सज्ञान म्हणजेच मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ असेल, तर विवाह ग्राह्य मानला जातो. याचा अर्थ वयात येणे म्हणजे मुलगी गर्भधारणेस योग्य व मुलगा प्रजोत्पादनक्षम असून ते शारीरिक व मानसिक परिपक्वता प्राप्त होतात, असा आहे. बालविवाह झाल्यास मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो, परिणामी त्यांना गर्भधारणा झाली, तर बाळाच्या पोषणासाठी शरीर सक्षम नसते. त्याचे परिणाम तिच्या आणि विशेषत: बाळाच्या आरोग्यावर होतो. बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी समाजसेवी संस्था, ग्रामपंचायत, सरकारी कार्यालये, निमशासकीय संस्था इत्यादींना बालविवाह अधिकार आहेत. बालविवाहाचे अनेक दुष्परिणाम असल्याने समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडण्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास शिक्षा होऊ होते. १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास तो गुन्हेगार ठरून तो शिक्षेस पात्र ठरतो. या कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे दखलपात्र व अजामिनपात्र आहेत. अधिक माहितीसाठी वकिलाचा सल्ला घ्यावावा.

            परंतु हा इतका कळीचा मुद्दा असूनसुद्धा बालविवाह हा विषय जणू मागच्या शतकात होता आणि जणू आता ती समस्या उरली नाही, अशीच अनेकांची समजूत असते. त्यामुळे या विषयावर उपाययोजना तर सोडाच, पण फारशी चर्चाही होत नाही. किमान राजस्थानात हे प्रमाण जास्त असल्याने झालीच चर्चा तर राजस्थानची होते. महाराष्ट्र हे पुरोगामीराज्य असल्याने जणू इथे बालविवाह नसतीलच, असाच सार्वत्रिक समज आहे. या समजामुळे महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण किती बालविवाहाच्या प्रश्नाची दाहकता किती आहे याची चर्चा कोणीच करत नाही. यामुळे महाराष्ट्रातील बालविवाहाचा प्रश्न जणू संपला आहे, असे सर्वसाधारण समजले जाते. बालविवाह थांबवून लग्नाचे वय लांबविणे यासाठी प्रयत्न करायला हवेत. १८ वर्षांची मुलगी फारतर १२ वी पर्यंत शिकते. त्यामुळे पदवीधर झाल्याशिवाय म्हणजे २१ वयाच्या पुढेच मुलींच्या विवाहाची मर्यादा न्यायला हवी. बालविवाह व शिक्षणाचा अन्योन्यसंबंध आहे. असे स्पष्टपणे आढळते की, मुलीच्या शिक्षणातील गळतीचा परिणाम हा अपरिहार्यपणे थेट बालविवाहात होताना दिसतो. मुलगी जर शिकत राहिली तर बालविवाहाची शक्यता काहीशी कमी होते, असाच निष्कर्ष अनेक पाहण्यांमधून दिसून येतो. त्यामुळे बाल विवाह थांबविण्यासाठी फक्त कायदा उपयोगी नाही तर अनेक उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यातील महत्वाचा उपाय म्हणजे मुलीच्या विवाहाचे वय वाढवणे, मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देणे, शालेय शिक्षणा पासून मुलीना व्यवसाय शिक्षणाची गोडी लावणे, बाल विवाह प्रतिबंध कायदाचा प्रचार प्रसार प्रशिक्षण शिबीर घेणे, चाईल्ड लाईन संपर्क कक्ष प्रत्येक ग्रामीण भागात नेमणे, बाल विवाह थांबवणाऱ्या व्यक्तीस सन्मान करणे इ. उपया योजना करणे गरजेचे वाटते.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९


Saturday, August 28, 2021

‘मरण माझे मरून गेले, मज केले अमर’

‘मरण माझे मरून गेले, मज केले अमर’

भारतीय समाजाच्या प्रगतीच्या वाटेत ज्या स्त्रियांनी पाश्चात्य देशातून येऊन भारतासाठी कार्य केलं त्यात डॉ. गेल ऑम्वेट एक होत्या. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक, अभ्यासक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल तथा शलाका भारत पाटणकर यांचं  नुकतंच निधन झालं. भारतीय समाज, आदिवासी जीवनपध्दती, लोकजीवन, भारतीय मौखिक परंपरा, संत साहित्य याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. डॉ. गेल यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी विशेष कार्य केलं. तथागत गौतम बुद्धांनी मांडलेल्या मानवतावादाच्या सिद्धांतासह, महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान त्यांच्या सामर्थ्यासह त्यांनी आपल्या साहित्यातून नव्यानं मांडलं.

क्रांतिवीर बाबूजी पाटणकर, क्रांतिवीरांगणा इंदुमती पाटणकर यांचा वैचारिक वारसा पुढं चालवत श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलं. डॉ. भारत पाटणकर यांच्या जीवनात क्रांतिची फुलं ओंजळीत घेऊन ती आली. जसी लवलवती शलाका (डॉ. गेल ऑमव्हेट)च प्रकाशाच्या वाटेवर क्रांतिची वाट साथसंगतीनं चालू लागली. क्रांतिबाचा सत्यशोधक वारसा निभावता निभावता त्या श्रमिकांच्या, शोषितांच्या, नरनारीवरील अत्याचारांच्या वेदनेचा हुंकार बनल्या. जो स्वत:च झाला होता ज्ञानाचं विद्यापीठ त्याच्या नावाचाही इथल्या विद्यापीठाला होणारा विटाळ संपवण्यासाठी लहानग्या लेकीचं ओझं पोटात वागवत ती त्याच्या साथीनं चालत गेली होती मराठवाड्याची वाट! तिनं क्रांतिसूर्याच्या ज्ञानाचं तेज दाखवुन दिलं. इथल्या अन्यायाविरोधात संघर्ष केला. शेतकरी बांधवाच्या प्रश्नांसाठी कै. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत देखील त्यांनी लढा दिला. शेतीतील अर्थशास्त्र समजून घेणं त्यांना आवश्यक वाटलं. ज्यावेळी शेतकरी संघटनेचं लक्ष्मीमुक्तीचं आंदोलन सुरू होतं त्यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावातील शंभरपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आपल्या कुटुंबातील महिलांच्या नावानं जमिनी केल्या. त्यावेळी शरद जोशी यांच्यासोबत डॉ. गेल ऑम्वेट पण होत्या. त्यावेळी उपस्थितांना प्रश्न पडला या आपल्यासोबत कोणत्या भाषेत बोलतील! पण मराठी मातीला स्पर्श केलेला प्रत्येक संवेदनशील व्यक्ती येथील भाषा बोलतो आणि डॉ. गेलही अस्खलित मराठीतच बोलल्या. एकूणच उपस्थित शेतकरी व स्त्री यांना त्यांचे विचार ऐकण्यास मिळाले. महाराष्ट्रातील स्त्री जीवनाबद्दल व स्त्री प्रश्नांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता.

अमेरिका ते कासेगाव हा त्यांचा प्रवास खूप अद्भुत होता. परक्या देशातून येऊन अखेरपर्यंत इथल्या मातीशी एकरूप होणं, इथल्या माणसांवर जिवापाड जीव लावणं आणि अमीट होऊन जाणं! कोणत्या मतीचे अन मातीचे असतात हे लोक? कोणत्या प्रकारची ही एकरूपता, निष्ठा? विनातक्रार सहज कसं सामोरं जातात सार्‍याच तडजोडीला हे लोक? कोणती बांधिलकी असते ही आणि कोणते अनाम ऋणानुबंध? ज्यामुळे शेवटचा श्वासही ह्याच मातीत घेतात! अफाट विश्वासानं या हिमालयांपुढे आपण पार खुजे आहोत याची लख्ख जाणीव होते अशावेळी. प्रिय गेल मॅम, आपलं नाव ‘भारत’ आणि भारताशी कायमचं जोडलं गेलंय. इथल्या इतिहासात ते कायमचं कोरलं गेलंय! जोपर्यंत इथं दुहीची दरी माणसाला पिडत राहील, नागवत राहील तोवर शोषितांच्या लढ्यातील घोषणांमध्ये आपला आवाज कायम इथं घुमत राहील. प्रियकराची ‘सखी’ झालात तुम्ही सर्वार्थानं! त्याची वेदना, लढा, पायपीट, ध्येय सारं सारं निरपेक्षपणे स्वीकारलंत तुम्ही! जसं ते सारं सारं जन्मतः तुमच्याबरोबर आलं असावं अशा तळमळीनं! चिखलमातीत, उन्हातान्हात, पाण्या-पावसात तिन्ही ऋतूत तुडवलेल्या वाटांवर तुमच्या पायांचे ठसे कित्येक पिढ्यांना कैक काळ दिशा दाखवत राहतील. तुमचं साहित्य, भाषणं, शब्द अन त्यातली आर्तता, विवेकपूर्ण मांडणी-संशोधन देत राहील सतत स्फूर्ती आम्हाला समतेची मुळं शोधण्याची आणि संघर्षाची! तुम्हीच सिद्ध केलंय तुमच्या अवाक करणार्‍या प्रवासातून की माणूस इथून-तिथून समग्र एकच आहे. भलेही असेल त्याचा रंग, नाव, गाव, भाषा, वेष भिन्न पण त्याची स्वातंत्र्य अन किमान न्याय-सुखाची अपेक्षा समानच असते. मग अगदी कुठंही जा पृथ्वीच्या पाठीवर! तुम्ही जाऊच शकत नाही कधी विस्मरणात आमच्या कारण तुम्ही आहात दीपस्तंभ उंचच उंचच आभाळाला टेकणारा! मातीचा भूगोल असेलही भिन्न पण आभाळ एकच असतं ना सर्वांचं! याच आभाळाखाली लढू आम्ही, पुढील आशेच्या किरणासाठी! तुमचे तेजस्वी विचार येथे रुजले आहेत. तुमची पुस्तकं देखील तेवढीच महत्त्वपूर्ण आहेत.
इंडियन वूमन इन स्ट्रगल, ग्रोइंग अप अनटचेबल इन इंडिया (वसंत मून यांच्या मूळ मराठी आत्मचरित्राचे भाषांतर), दलित अ‍ॅन्ड डेमोक्रॅटिक रिव्हॉल्युशन, रिव्हॉल्यूशन : इंडियाज न्यू सोशल मूव्हमेंट, साँग ऑफ तुकाराम, वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड- (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक दिघे) असे वैचारिक लिखाण येथील मातीशी प्रामाणिक राहून तुम्ही पूर्ण केलं. तुमच्या साहित्याचा उपयोग श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यासाठी झाला.

डॉ. गेल आणि भारत पाटणकर यांचं नातं मानवी मूल्यांची पराकोटीची जोपासना करणारं! यापुढे नवे लोक ज्यावेळी प्रेमाच्या अनुबंधातून एकत्र येतील, समाज, साहित्य, राजकारण वा अन्य आणखी कुठल्याही क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून काही करू धजतील त्यांच्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. पाटणकरांच्याच शब्दात गेल यांच्याबद्दल सांगायचं तर ‘‘ती जगाला देत चाललेली आहे. सिद्धांताच्या क्षेत्रात, व्यावहारिक चळवळीच्या क्षेत्रात, मैत्रीच्या क्षेत्रात! पण हे ती तिच्या नैसर्गिक वृत्तीचा भाग म्हणून सहजी करत आली आहे. शब्दांची रत्ने ती उधळीत गेली आहे. ‘ओले मूळ भेदी खडकाचे अंग’ ही तुकोबांची उक्ती जनता आणि कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोहचवीत आली आहे. ‘उंबरातील कीटका, हेचि ब्रह्मांड ऐसे लेखा’ अशा वृत्तीने चळवळीकडे संकुचित पद्धतीने पाहू नका, असे सांगत आली आहे. ‘ढाल गरवारे गुंतले हे कर, म्हणे तो झुंजार कैसा झुंजो’ असे न वागता परिस्थिती बदलणार्‍या उपायांचा अवलंब करा, असे म्हणत आली आहे. ‘एका बीजा केला नास, मग भोगले कणीसतुका, म्हणे रणी, जीव देता लाभ दुणी’ अशी नवनिर्माण प्रक्रिया मांडत आली आहे. ‘मीच मज व्यालो, पोटा आपुलिया आलो. दोहींकडे पाहे, तुका आहे तैसा आहे’ या पद्धतीनं स्वतःला बदलण्याची प्रक्रिया घडवूया, असा तुकोबांचा संदेश देत आली आहे. म्हणूनच आता ‘मरण माझे मरोन गेले, मज केले अमर’ या तुकोबांच्या अभंगातील वृत्तीने आज जीवन पूर्ण तृप्त पद्धतीने सुरू आहे. गेलसारख्या व्यक्तिंना भक्त असू शकत नाहीत, भाट असू शकत नाहीत! पण तिने जे देणे दिले आहे ते तरी समग्र पद्धतीने उजेडात आणले पाहिजे. शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीची प्रक्रिया पुढे जाण्यासाठी या कमोदिनीचा परिमळ सर्वदूर पसरण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे.’’
गेल आणि भारत यांच्या नात्यातील ‘अमेरिका ते कासेगाव’ असा प्रवास आपण सर्वांनी वाचायला हवा असाच आहे. मला वाटतं डॉ. भारत पाटणकरांनी हे अधिक विस्तृतपणे लिहायला हवंय. किंबहुना ते लिहित असतीलही. ते का लिहायला हवंय? तर असं पुरूषांनी आपल्या जोडीदाराबद्दल इतकं निखळपणे लिहिणं या पुरूषसत्ताक समाजरचनेत फारसं घडत नाही. भारत ज्या शोषणमुक्त समाजाची निर्मिती प्रक्रिया मांडत आहेत ती आणखी पुढं जाण्यासाठी त्यांनी हे अधिक विस्तृतपणे लिहायला हवंय असं माझ्यासारख्या व्यक्तिला वाटणं साहजिक आहे. यावर एखादा उत्तम चित्रपट पुढे जाऊन कुणी करू शकेल असं हे सगळं आहे. या दोघांच्या नात्याचा परिमळ, विचारांची व साहित्यांचा दरवळ पुढे घेऊन जाणं हीच  त्यांना आदरांजली असेल.
- मयुर बाळकृष्ण बागुल,
चलभाषा - 9096210669  
(लेखक उदयकाळ फाऊंडेशनचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

Wednesday, March 10, 2021

भय येथले संपत नाही...

 

जगात ज्या महामारीने मागील वर्षी सर्व ठप्प पडले होते. कोविड १९ हा रोग पूर्णपणे संपला असे म्हणता येणार नाही. आज जवळपास वर्ष होईल पुन्हा सरकारने डोके वर काढले आहे. कोविड १९ आजरावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. हे आज आपल्याला बघण्यास मिळत आहे.  विलीगिकरण करून घरी देखील आजारावर नियंत्रण मिळवता येतो. देशात लसीकरण सुरु केले आहे. लसीकरणाचा वेग वाढवणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात सध्या पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे परंतु तो एकूण टक्केवारी मध्ये बघितला तर फार कमी दिसतात. सरकारने आपले प्राधन्य ठरवत असतांना पुन्हा नागरिकांना घर बंदिस्त करण्याचे डाव खेळू नये. करोनाचे रुग्ण वाढत आहे हे जरी खरे असले तरी सरकारने लसीकरण करण्याचा वेग देखील वाढवला पाहिजे होता. शासन आणि प्रशासन हे नागरिकांना जुलमी अत्याचार सारखे वागणूक देत आहे. आज पोलिस प्रशासन नागरिकांना संरक्षण देण्याऐवजी चौका चौकात हफ्ता वसुली सारखे अडवणूक करून पावती करत असतात. पोलिस प्रशासनाचे नेमक्या जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव अधिकारी यांना नसेल का ? शासन मनाला वाटेल तो निर्णय घेऊन सामन्य जनतेची आर्थिक अडवणूक करत आहे. आज कुठे तरी गाडी रुळावर येत असतांना नागरिकांना पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण करून करोनाची दहशत निर्माण शासन पुरस्कृत करोना तयार करत आहे.   

साथरोग नियंत्रण कायद्याच उपयोग

 

आपल्याला माहिती असेल काही वर्षापूर्वी एका भयावह काळाची सुरुवात 'ब्यूबॉनिक प्लेग'च्या साथीपासून पासून होते. सप्टेंबर १८९६ मध्ये मुंबईत प्लेगचे रुग्ण सापडल्याचं निदान झालं. हाँगकाँगमधून तो इथे या बंदरात आल्याचं म्हटलं गेलं. सुरुवातीला तत्कालिन ब्रिटिश सरकारनं त्याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही, पण थोड्याच काळात प्लेगनं त्याचे हातपाय पसरायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या, म्हणजेच तत्कालिन मुंबई इलाख्याच्या, इतर भागातही तो पसरु लागला. स्वच्छता, जंतूनाशक फवारणी असं काम महानगरांच्या प्रशासनानं सुरु केलं, पण थोडक्याच काळात हे प्रयत्न पुरेसे नाहीत हे स्पष्ट झालं. थोडक्याच कालावधीत प्लेगची साथ पुण्यात पसरली आणि मृतांची संख्या, बाधितांची संख्या झपाट्यानं वाढायला लागली. जानेवारी १८९७ पर्यंत पुण्यात प्लेगचा कहर सुरु झाला होता. रोजचा मृतांचा आकडा तोपर्यंत शेकड्यापर्यंत पोहोचू लागला. सरकारला हे कळून चुकलं की नवा कायदा हवा आणि त्याची अंमलबजावणीही हवी. या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारनं नवा कायदा आणला, जो आजही अस्तित्वात आहे आणि कोरोनाशी लढण्यासाठी २०२० मध्येही वापरला जातोय, तो म्हणजे 'एपिडेमिक डिसिजेस अॅक्ट' किंवा 'साथरोग नियंत्रण कायदा १८९७. या कायद्यानं त्याची सरकारी अधिका-यांना असे अधिकार दिले जे यापूर्वी कधीही नव्हते. कोणत्याही जहाजाची वा वाहनाची तपासणी करणे, संशयित रोगी व्यक्तीला ताब्यात घेणे, विलगीकरणात पाठवणे, कोणत्याही इमारतीची, घरांची झडती घेणे, निर्जंतुकीकरण करणे, इमारती-घरं मोकळी करवणे किंवा संसर्गित इमारत पाडणे इथपर्यंत हे अधिकार होते. जे आपण आज देखील कोविड १९ या रोगामुळे एकूण समाजाला काय परिस्थितीतीला सामोरे जावे लागत आहे हे आपण सर्व अनुभव घेत असतो. आज पुन्हा नव्याने २०२१ मध्ये ह्या कायद्याचा उपयोग केला जात आहे. मागील वर्ष संपूर्ण पणे बंधिवासात नागरिकांनी जीवन रडत पडत काढले. सामान्य नागरिकांची आर्थिक घडी पूर्णपणे कोलमंडली त्यात कुठे तरी गाडी रुळावर येत असतांना पुन्हा नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरवण्याचे कार्य कोणाचा आशीर्वादाने सुरु आहे. बरं आता रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाय आणि मार्ग उपलब्ध आहेत. समान्य नागरिकांचे उदरनिर्वाह करण्याचे व्यवसाय यावर कुऱ्हाड सरकारने मारून ठेवली. ग्रामीण भागात या परिस्थितीमुळे वाईट प्रवृत्ती निर्माण होऊ लागले आहेत शासन जर असेच करत राहणार समाज व्यवस्था बिघडवण्यास जबाबदार येथील व्यवस्था कारणीभूत दिसते. आज तसे न करता फक्त नागरिकांना फक्त त्रास होईल असे निर्णय आणि वागणूक दिली जात असेल तर कुठे तर शासन व्यवस्था कोरोना नियंत्रणात आणण्यास कमी पडत आहे.

 

जनतेवर पाळत ठेवणे सरकारचे काम का ?

 

कोरोना या रोगाची साथ थांबवण्यासाठी, राज्यातील सर्व जनतेला काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. तसे करायचे तर दोन मुख्य मार्ग आहेत. नागरिकांवर लक्ष ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांना शिक्षा देणे हा पर्याय असू शकत नाही. मागील एक वर्ष कोरोना रोगाचा प्रचार प्रसार करण्यास शासन कमी पडले का? आज मानवी इतिहासामध्ये पहिल्यांदाच तंत्रज्ञानामुळे प्रत्येक वेळी सर्वांवर पाळत ठेवले जाते. काम करत असताना आपल्याला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्यापैकी एक म्हणजे आपल्यापैकी कोणालाही हे माहीत नाही की, आपल्यावर कशा प्रकारे नजर ठेवली जात आहे आणि येणाऱ्या काळात आपल्यापुढे कोणते ताट वाढून ठेवलेले आहे. लोकांवर पाळत ठेवण्याचे हे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे आणि दहा वर्षांपूर्वीच्या ज्या विज्ञान-कल्पित गोष्टी होत्या, त्या आज जुन्या बातम्या बनल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बेजबाबदार राजकारण्यांनी विज्ञानावर, सार्वजनिक प्राधिकरणांवर आणि माध्यमांवर विश्वास ठेवणे जाणीवपूर्वक कमी केले आहे. योग्य गोष्टी करण्यासाठी आपण फक्त जनतेवर विश्वास ठेवू शकत नाही, असा युक्तिवाद करत याच बेजबाबदार राजकारण्यांना यानिमित्ताने आपल्या एकाधिकारशाहीचा मार्ग प्रशस्त करण्याचा मोह होऊ शकेल. आज सगळ्यांचा यंत्रणा जनतेला फक्त त्रास देण्यासाठी काम करत आहेत का? असे कुठे परिस्थिती बघितल्या नंतर दिसते. प्रत्येक कामातून जनतेला कधी समाधान मिळाले असे फार कमी प्रमाणात अनुभवयाला येते. आज सामान्यत: वर्षानुवर्षे नष्ट झालेला विश्वास एका रात्रीत पुन्हा कमावता येत नाही. परंतु ही सामान्य वेळ नाही. संकटाच्या एखाद्या क्षणी आपली मनेसुद्धा पटकन बदलू शकतात. आपण अनेक वर्षांपासून आपल्या भावंडांशी कटु वाद घालत असतो, परंतु जेव्हा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, तेव्हा आपल्याला अचानक भावंडांबद्दलचा लपलेला विश्वास आणि प्रेमळपणा पुन्हा गवसतो आणि आपण एकमेकांना मदत करण्यासाठी धावतो. जनतेवर पाळत ठेवण्याची व्यवस्था तयार करण्याऐवजी विज्ञानावर विश्वास ठेवून सार्वजनिक अधिकारी व माध्यमां यांनी लोकांना बंधनात अडकवून न ठेवण्या ऐवजी दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्यास भर देणे गरजेचे. 

 

आदर्श समाज व्यवस्था कमी पडते ?

 

आज सार्वत्रिक विवेकाचे आदर्श तत्त्व, भौतिक जगात व्यक्ती व्यक्तींमधील नैतिक व्यवहार, नागरी मूल्य, सार्वत्रिक हित यांची चिकित्सा करत असते. समाजाची नैतिक मूल्याधिष्ठित व्यवहाराची चिकित्सा करणारी ही एक मोजपट्टी आहे, असे मानले जाते. कोणताही समाज त्या त्या सामाजिक व्यवस्थेची काही मूलभूत श्रद्धा, मूल्ये इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर विकसित करत असतो. विविध सामाजिक स्तर ही श्रद्धा, मूल्ये व्यापक पातळीवर आपल्याला सोयीची जाईल अशा पद्धतीने उभी करून, त्या दृष्टीने विवेकशील समाजभान जनमानसात स्वयंसिद्ध करण्यास मदत करतात. कधी कधी सदोष मानवी वर्तन ही श्रद्धा, मूल्ये प्रश्नांकित करतात. आज मानवी व्यवहारांतील 'न्याय्य तत्त्वांच्या' निष्ठेबद्दल संशयग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण समाज म्हणून नागरिकांना बंधिवसात ठेवून किती दिवस कोरोना ची भिती पसरवत असणार आहे. आपली भारतीय समाजव्यवस्था सांस्कृतिकदृष्ट्या एकजिनसी नाही. अनेक धार्मिक, वांशिक व भाषिक गटांचे अस्तित्व येथे आहे. त्याचबरोबर, आर्थिक क्षमतेच्या निकषावरही मोठ्या प्रमाणात विषमता सापडते. अशा बहुलवादी समाजरचना असलेल्या देशात जेव्हा मोठ्या प्रमाणात करोनाची लागण होते, तेव्हा त्या समाजाचे टीकात्मक परीक्षण 'सार्वजनिक विवेकाच्या' माध्यमातून होणे आवश्यक बनते. सार्वजनिक विवेकाचे तत्त्व सार्वत्रिक श्रद्धा, मूल्ये व नैतिक जीवनदृष्टीबरोबर, इतरांच्या नागरी हक्कांप्रती आदर भावना व्यक्त करत असते. प्रस्थापित व्यवस्थेतील अपूर्णता सांगताना फक्त दोष दिग्दर्शन न करता, नागरी आयुष्यात बंधुभाव कसा उतरेल, यावर भर देत असते. कोविड १९ च्या नावाने समान्य नागरिकांना वेगळा न्याय आणि करोडपती, आमदार, खासदर व मंत्री यांना वेगळा न्याय, कायदा सगळ्यांना समान हे फक्त कागदावर असते. गरीब दुबळ्या समाजातील नागरिकांना फक्त कायद्याची भीती दाखवून फक्त लुटमार करणारी येथील व्यवस्था सत्ताधारीच्या कुबडायवर काम करते. किमान या राज्यातील अधिकारी यांनी तरी आपल्या उच्च संसकृत शिक्षणाचा आदर करून स्वताच्या सदसद्विवेक जागेवरून ठेवून निर्णय घ्यावे, सामन्य नागरिकांच्या खिश्यावर दरोडा टाकणे थांबवले पाहिजे अन्न्यथा समाजातील बघडणारी परिस्थितीला जबाबदार आपण असाल. कदाचित म्हणूनच म्हणावे वाटते २१ व्या शतकात पुन्हा नव्याने वाटते सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९

Sunday, January 17, 2021

समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी...

 

समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी...
 
समाज, समाज म्हणजे काय असतो ? एकमेकांशी सलोखा असणाऱ्या एकत्र राहणाऱ्या लोकांचा समूह. आज भारतातील ४५% समाज युवक वर्गात मोडतो. तर त्यांच्या उद्धाराची जबाबदारी पण युवकांचीच ना. थॉमस हक्सले एकदा म्हणाला होता - "मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन." तरुण हा समाजातील अतिशय सक्षम, चंचल, शक्तिशाली, उत्साही घटक म्हनुन ओळखला जातो. आजचा तरुण उद्याचा वृद्ध असेल. ह्या तरुणाने स्वीकारलेली आव्हाने पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शन ठरतील. सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे की तारुण्याची तीन ''कार असावेत - तेजस्विता, तपस्वीता आणि तत्परता. या गुणांचे आचरण करणे आवश्यक आहे. या युवकांनी देश सुधारण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली पाहिजे. स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज, ती धुरा यशस्वीपणे सांभाळणारे संभाजीराजे हे देखील तरुणच होते. देश हा जेवढा व्यापक शब्द आहे, त्या पेक्षाही एक व्यापक प्रश्न असा आहे की, देश कोण बनवितो? नेता, सरकारी कर्मचारी, शिक्षक, मजुर, वरिष्ठ नागरिक की आणखीन कोण? खरं तर हे सगळे मिळून देश बनवत असतील, मग तरी इथे एक महत्वाचा प्रश्न असा पडतो की, देशाच्या विकासात सर्वात मोठी भागीदारी कुणाची आहे? नक्कीच या पैकी कुणाची नाही. देशाच्या विकासात सिंहाचा वाटा त्या वर्गाचा आहे ज्या वर्गाचा वर उल्लेख झालेला नाही, तो म्हणजे युवक वर्ग. कोणत्याही देशाची खरी संपत्ती व शक्तीस्थान हे त्या देशाचे युवक असतात. देशातील युवकांच्या दर्जावरुन त्या देशाचे भवितव्य कसे असेल हे ठरत असते. म्हणून आपल्याला देशाचे भवितव्य उज्वल हवे असेल तर प्रथम आपल्या युवकांना अधिक सक्षम, विधायक व सामर्थ्यवान बनवणे गरजेचे आहे.
 
युवा वर्गाविषयी विचार व त्यांना देण्यात येत असलेले महत्त्व वेगळ्या प्रकारचे आहे. समाजाचा विचार करताना वर्गानुसार, जातीनुसार गट पाडुन विश्लेषण केले जाते. वयानुसार समाजाची विभागणी करुन युवक हा वेगळा सामाजिक गट निर्माण करण्याची प्रवृत्ती नवीन आहे. त्याचप्रमाणे तरुण माणसांनाही आपण युवक म्हणुन कोणीतरी वेगळे आहोत, वेगळी सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे व समाज परिवर्तनाच्या कामात आपल्याला विशेष स्थान आहे, ही जाणीव होत आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत आसतानाच काही गोष्टींचे भान तरुण वर्गाने ठेवले पाहीजे या मध्ये प्रमुख म्हणजे नैतिकता, विचारसरणी व आदर्शवाद.  आपण जसे वागणार आहोत, जी कार्ये करणार आहोत ती इतर  कुणाला लक्षात ठेवाविशी वाटली नाहीत तरी काळ व इतिहास यांना मात्र निश्चितच नोंद घ्यावी  लागेल. इतिहास हा संदर्भासाठी असतो. जेव्हा नवीन पिढी गतकाळाची पाने उलगडुन बघेल त्यावेळेस आत्ताचा इतिहास त्यांना सामोरा येईल. माणूस अनुकरणप्रिय जरुर आहे, मात्र ब-याचवेळेस वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होते. उद्या एखाद्या चुकीच्या प्रथेचा पायंडा पडू नये याची खबरदारी घेणे हे प्रत्येक तरुण पिढीसमोरील प्रथम आव्हान आहे. त्यामुळे आज ज्या वाटेवर आपण चालतोय ती नैतिक की अनैतिक हे बघणे गरजेचे आहे.  युवक हा असा वर्ग आहे जो शारीरिक आणि मानसिक रुपाने सर्वात बलवान आहे.जो देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी सर्वात जास्त प्रयत्न करु शकतो.सुदैवाने आपल्या भारतीय लोकसंख्येच्या ३४ टक्के इतकी लोकसंख्या युवकांची म्हणजेच२४ ते ४० वर्षे वयोगटाची आहे.हा युवक वर्ग नेहमीच सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळ्या रुपाने सदैव सर्वात जास्त सक्रीय असतो आणि रहायलाही हवा. मात्र कोणत्याही देशाच्या बांधणीत म्हत्वपूर्ण भूमिका बजावणा-या या युवक वर्गाची आजची स्थिती बघितली तर ती निश्चितच चिंताजनक आहे. भारतीय युवकांची स्थिती चिंताजनक आहे असे म्हटल्यावर याचे देशावर काय परिणाम होतील हे वेगळे सांगायला नको. आजचा युवक व्यसनांच्या आहारी गेलेला, भ्रष्ट राजकारणी व चित्रपटातील अभिनेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा, गुन्हेगारी प्रवृतीकडे वळलेला दिसतो. या स्थितीला फक्त युवकच जबाबदर आहे असे म्हणून आपल्याला आपली जबाबदारी झटकून मोकळे होता येणार नाही. का कधी युवकांच्या या अवस्थेकडे लक्षपूर्वक बघितलयं? कोणी कधी त्यांच्या भाव-भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न केलाय? स्पष्टपणे म्हटलं तर नाही. मग आजची युवक पिढी इतकी बेजबाबदार, मनमानी करणारी का आहे? जेंव्हा आपण भारतीय युवकांच्या वर्तमानकालीन स्थितीबद्दल भळभळून बोलतो, त्यांच्या भविष्याच्या बाबतीत चिंता व्यक्त करतो तेंव्हा आपण भूतकाळात डोकावून बघितले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात भगतसिंग, राजगुरु, चंद्रशेखर आजाद, सुखदेव, शिरीषकुमार हे युवक त्या काळच्या युवकांचे आदर्श आणि प्रेरणास्थान होते. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. प्रसंगी प्राणाचेही बलिदान दिले. देशासाठी हसत-हसत फासावर चढणा-या या देशवेडया तरुणांना पाहून समकालिन युवकांच्या रक्तात एक वेगळा उत्साह संचारत होता. ते युवक या तरुणांना आपला आदर्श मानत मात्र त्यांनी कधी याची जाहीरात बाजी केली नाही. भूतकाळ जेवढा खराब तसा वर्तमान त्याची सावली आणि भविष्य तर आणखीनच खराब. एकायला-वाचायला या गोष्टी नक्कीच निराशाजनक वाटतील परंतु थंड डोक्याने आपण जर विचार केला, स्वत:लाच जर प्रश्न विचारला की, आजच्या युवक पिढीला मागच्या पिढी ने काय वारसादिलाय? कसले संस्कार आणि कसला समाज दिलाय? तर आजच्या युवकांच्या या अवस्थेचे उत्तर आपल्याला निश्चित मिळेल. मी भूतकाळाबद्दल बोलतोय म्हणजे निश्चितच स्वातंत्र्यपूर्व काळाबद्दल बोलत नाही. मी बोलतोय ते स्वातंत्र्योत्तर काळाबद्दल म्हनजे गेल्या ७२ वर्षांबद्दल. या काळातील पिढीने देश बांधणीचे काम केले आहे.काय बघितल आपण या ७२ वर्षात? वाढत चाललेली गुन्हेगारी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा असेही म्हणता येईल की गुन्हेगारांचे राजकीकरण, वाढत चाललेला भ्रष्टाचार, वाढता जातीयवाद आणि बेरोजगारी. जेवढ काही वाईट होवू शकत ते मागील पिढीने केल. अर्थात सगळ्याच गोष्टी वाईट केल्या असं नाही. प्रत्येक समाजात काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी असतातच मात्र भूतकाळात वाईट गोष्टींनाच जास्त खत-पाणी दिल गेल हे सत्य आहे. जर असा समाज युवकांच्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून असेल तर आजच्या युवक पिढीला दोष देवून काय उपयोगआमचे आदर्श म्हणजे आजचे वृध्द राजकीय नेते ज्यांचे मोठे-मोठे होर्डींग्ज आदर्श म्हणून आजचे युवक लावताना दिसतात. हे सगळेच नेते वाईट आहेत असेही नाही. काही अपवादात्मक राजकीय नेते सोडले तर इतर सर्वांवर कसला न कसला भ्रष्टाचाराचा आरोप आहे.
ध्येयाच्या वेदना मनाला होउ दे
वार तुझ्या प्रत्येक क्षणास होऊ दे,
अशक्य सुद्धा म्हणेन शक्य आहे,
इतका गर्व तुझ्या बुद्धीच्या मीपणास होऊ दे !
 
भारतीय युवक एक नवक्रांती करायला तयार आहे. मात्र त्याला कुणीतरी रोखू पाहतयं ते म्हणजे राजकीय क्षेत्र आणि त्यातील भ्रष्ट राजकारणी, राजकारणात देशप्रेमाची जागा घराणेशाही, जातीयवाद, सत्तेच्या हव्यासाने घेतली आहे. राजकीय क्षेत्रात फक्त वयस्कर लोकांचाच बोलबाला आहे आणि फक्त बोटावर मोजण्याइतकेच युवक आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्राचे वातावरण दिवंसेदिवस गढुळ होत चालले आहे. ख-या प्रामाणिक राजकारण्यांची जागा सत्ता आणि धनाच्या लालची लोकांनी घेतली आहे. आता भारताच्या राजकारणात सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लोकमान्य टिळक या सारखे युवक नेते नाहीत जे युवक वर्गात एक नवा उत्साह भरतील. जे नेते आज स्व:ताचे रक्षण करु शकत नाहीत ते आजच्या युवक पिढीला देशभक्ती किंवा क्रांतीचे धडे काय देणार?
२० व्या शतकात ज्या वेळी या तरुण नेतृत्वाने भारतात सर्वप्रथम संगणक आणला त्यावेळी तत्कालिन वृध्द नेत्यांनी याचे हसे केले होते, सर्वत्र बेरोजगारी वाढेल अशी बोंब उठवली होती. दिल्लीहून निघालेला एक रुपया खालपर्यंत पोहचेपर्यंत पंधरा पैसे राहून जातो हे वाक्य याच नेत्याने प्रामाणिकपणे बोलून युवक वर्गाला भ्रष्टाचाराच्या धोक्याची जाणीव करून दिली होती. मात्र या युवक नेतृत्वाच्या अकाली मृत्यूने देश म्हणावा तेवढा प्रगती करु शकला नाही. आजचा युवक निराशेच्या गर्तेत आहे, तो बेरोजगारीची मार खातो आहे. भारतीय नेतृत्व त्याला योग्य संधी देण्यात अपयशी ठरल आहे. इथे योग्य संधी मिळत नाही म्हणून बरचशे उच्चशिक्षित युवक विदेशात जावून काम करित आहेत. भारतातील ७५ टक्के युवक साक्षर असताना त्यांच्या हाताला काम नाही. त्यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जातो नंतर मात्र त्यांना धान्यातून खडे वेचून बाजुला करावे तसे केले जाते. युवकांनी राजकारण्यांच्या पाठीमागे लागून, त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वत:च्या मेहनीतीने स्व:ताचे करिअर बनवण्याचा, उदयोजक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर उदयोजक झालात तर हेच राजकारणी आपल्याला शोधत फिरतील. आजचे युवक भरकटलेले आहेत असे म्हणण्याचा हक्क आजच्या पिढीला बिलकुल नाही. दुस‌यांकडे बोट दाखविणा-यांनी स्वत:कडे उठणा-या चार बोटांकडेही बघितले पाहिजे. युवकांना नावे ठेवणा-या पिढीने त्यांच्या समोर कोणता आदर्श निर्माण केलाय? अनिंयत्रीत लोकसंख्या वाढीने अनेक समस्या निर्माण करणा-या पिढीने बेरोजगार, भरकटलेल्या युवकांना बघून फक्त चिंता व्यक्त करुन चालणार नाही. भ्रष्टाचाराला यंत्रणा बनवणारी पिढी युवकांना ईमानदार राहण्याचा सल्ला देत आहे. देश असा बनत नाही. आता वेळ आली आहे क्रांतीकारी पाऊल उचलण्याची. हा रोग एवढा मोठा झालाय कि आता याच्यावर बायपास सर्जरीकरावीच लागेल. परदेशात जाणा-या सॉफ्टवेअर, आय.आय.टी, इंजिनिअर, आय.आय.एम तरुणांना रोखण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. ते भारतात तेंव्हाच परत येतील जेंव्हा त्यांना इथे योग्य संधी उपलब्ध होतील. आपल्याला देशातील, खेडया-पाडयातील युवकांवर भर दयावा लागेल. या युवकांमुळेच देश घडेल. त्यांना बेरोजगारी भत्ता, आश्वासने, राजकीय प्रचार सभा, कायदयापेक्षा वरचढ होण्याची शिकवण देवून चालणार नाही. जर या युवक शक्तीचा योग्य वापर केला नाही तर तिचा चूकीचा वापर होवू शकतो. हिच युवक शक्ती देशासाठी विध्वंसक व घातक ठरु शकते.
भारतीय युवकांचा उत्साह, त्यांची सर्जनशिलता, अष्टपैलुत्व आश्चर्यकरक आहे. त्यांना अधिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. त्यांच्या समोर आपण काहीतरी आदर्श निर्माण केला पाहिजे. आपल्याला पुर्ण संधी मिळूनही आपण देशाला चांगले बनवू शकलो नाहीत. आता देशाला चालवण्याची संधी युवकांना दया. देशाची बांधणी युवकच करतात आणि करतीलही गरज आहे ती त्यांना पोषक वातावरण व योग्य प्रोत्साहनाची. जेव्हा या तरुणांना ध्येयाने पछाडले जाईल, संकटांना सामोरे जाण्यासाठी निधडी छाती निर्माण होईल, आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अंगी येईल  त्यावेळेस उज्ज्वल भारतवर्षाची निर्मिति होऊ शकेल. ही जबाबदारी पेलणे हे जबरदस्त आव्हान नियतीने तरुणां समोर ठेवले आहे. या आव्हानाला सामोरे जाताना दुसरे पुढे ठाकणारे आव्हान म्हणजे समाजकारण व राजकारणात युवा शक्तीचा सहवास. ढोबळमानाने युवा समाजाचा विकास हाच उद्याच्या समाजाचा विकास आहे. फ़ायद्याच्या राजकारणापासुन स्वतःला दुर  ठेवणे व समाजाच्या फ़ायद्यासाठी काम करणे हेच हितावह ठरेल. पाश्च्यात्त्य युवक चळवळीपांसून एकांगी व असमज धडा घेणारे मुठभर विद्यार्थी, मूर्ख तरुण, तथाकथीत संतप्त तरुण साहित्यिक व राजकीय पक्षांच्या अधीन असलेल्या गटांच्या मोहजालातुन सुटणे व या घटकांना सरळ करणे कालप्राप्त ठरेल.
 
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९
ई – मेल – bagul.mayur@gmail.com