Monday, February 27, 2023

शेतकरी स्वातंत्र्य आणि पीक विमा

केंद्र शासनाने २०१६ साली पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. शेतकऱ्यांना कमीत कमी विमा हप्ता (दीड ते दोन टक्के); उरलेला हप्ता केंद्र व राज्य शासनाद्वारे समप्रमाणात विभागून भरण्याची हमी; जास्तीत जास्त विमा सुरक्षा; तीन वर्षांत सहभागी शेतकऱ्यांचे व संरक्षित क्षेत्राचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवत ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आणि योजनेसाठी भरीव अर्थसंकल्पीय तरतूद, यांमुळे या योजनेकडून मोठय़ा अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. योजनेला पाच वर्षे पूर्ण झाली असल्याने या अपेक्षांची किती प्रमाणात पूर्तता झाली याचा लेखाजोखा मांडून पुढील दिशा ठरविणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत पीक विमा उतरविण्यात महाराष्ट्र सुरुवातीपासूनच अग्रसेर राहिला आहे. मात्र राज्यातील, विशेषत: मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीबाबत असंतोष असून बीड, परभणी, लातूर यांसारख्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी विम्यासाठी वारंवार आंदोलने केली आहेत. राष्ट्रीय पातळीवरदेखील बिहार, प. बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड ही राज्ये या योजनेतून बाहेर पडली असून त्यांनी पर्यायी योजना सुरू केल्या आहेत. या बाबींवरून या योजनेत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट दिसते.
शेतकरी आणि पीक विमा 
प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत मोठी उद्दिष्टे मांडली. सदर पिक विमा योजनेमध्ये नुकसान भरपाई अदा करण्यासाठी प्रामुख्याने पुढील प्रकारच्या नुकसानीची जोखीम विमा कंपनीवर टाकण्यात आलेली आहे
१.अपुऱ्या पावसामुळे पेरणीच वाया गेल्यास
२.पावसातील खंड, दुष्काळ, गारपीट, वादळ, पूर, अतिवृष्टी, कीड व रोगाचे पिकावरील आक्रमण, नैसर्गिक वणवा या सारख्या संकटामुळे झालेले उभ्या पिकाचे नुकसान
३.पिक कापणी नंतर पंधरवड्यात झालेले अवकाळी पाऊस व अन्य आपत्तीमुळे होणारे नुकसान
४. स्थानिक घटकामुळे भूस्खल्लन, अवकाळी पाऊस व अन्य कारणाने झालेले शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रकरणी झालेले नुकसान या चारही प्रकारात विमा कंपनीवर जोखीम टाकण्यात आलेली आहे.
खासगी कंपन्या लाभार्थी?
पंतप्रधान पीक विमा योजनेचे स्वरूप सार्वजनिक आहे. त्यात खूप मोठय़ा प्रमाणात केंद्र व राज्य शासनांचा निधी गुंतलेला असून या योजनेचे अंतिम उत्तरदायित्व पीक विमा कंपन्यांकडे (त्यातही खासगी विमा कंपन्यांचे प्रमाण लक्षणीय आहे) देण्यात आले आहे. पीक विमा कंपनी ही या योजनेच्या अंमलबजावणीतील कळीचा घटक आहे. योजनेचा प्रचार-प्रसार करणे, विमा भरून घेणे, शेतकऱ्यांच्या अडचणींचे निवारण करणे आणि वेळेवर व रास्त नुकसानभरपाई देणे या विमा कंपन्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या आहेत. परंतु न्याय्य दावा असूनही विमा मिळाला नाही तर कोणाला जबाबदार ठरवायचे, हा प्रश्न इथे पेचाचा ठरतो. शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील तर जिल्ह्यातील कृषी विभाग अथवा विविध स्तरांवरील (उपविभागीय, जिल्हा व विभागीय) तक्रार निवारण समित्या ‘विमा कंपन्यांकडेच सर्व तपशील आहेत व नुकसानभरपाईचे दायित्व त्यांच्याकडेच आहे’, असे सांगून शेतकऱ्यांना विमा कंपन्यांशी संपर्क साधण्यास सांगतात. मात्र शेतकऱ्यांच्या गाऱ्हाण्यांबाबत विमा कंपन्यांचा प्रतिसाद अतिशय निराशाजनक राहिला आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांनाच नव्हे तर जिल्हा प्रशासन व राज्य शासनासही दाद देत नाहीत असा अनुभव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप २०२० पासून तीन वर्षांसाठी नियुक्त केलेल्या बजाज अलायन्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीबाबत जिल्हा प्रशासनाचा अनुभव बोलका आहे. तांत्रिक अडचणी व अटी सांगून विमा देण्यास टाळाटाळ करणे, कृषी क्षेत्रातील अनुभव नसलेला कर्मचारीवर्ग नेमणे, तालुकास्तरीय कार्यालयात प्रतिनिधी वा सुविधा उपलब्ध करून न देणे याबाबत वारंवार सूचना देऊनही सहकार्य न करणे आणि राज्य शासनाच्या नियम व अटींचे पालन न करणे, असे वर्तन या कंपनीचे राहिले आहे. त्यामुळे या कंपनीची नियुक्तीच रद्द करण्याची शिफारस उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी आयुक्तालयाला केली होती पण पुढे काही घडले नाही. इतकेच नव्हे तर या कंपन्या राज्य शासनालाही दाद देत नसल्याने महाराष्ट्र शासनाला काही कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे लागले आहेत. आदेश देऊन देखील परिस्थिती मध्ये बदल काही घडला नाही. 
महाराष्ट्र राज्याच्या विशेष समस्या बाबत स्वतंत्र धोरणाची आवश्यकता
महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४५ तालुके नेहमीच दुष्काळी छायेत असतात या दुष्काळग्रस्त तालुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यासाठी नेहमीच पीक विमा योजनेचे कवच आवश्यक आहे. या बाबत महाराष्ट्र सरकार पुरेसे जागरूक नाही. अनेकदा प्रचलित तरतुदी देखील अमलात आणल्या गेल्या नाहीत उदाहरणार्थ सदर योजनेत विमा कंपनीने खरीप नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी ३१ जानेवारी नंतर तीन आठवड्याच्या आत संपूर्ण भरपाई अदा करणे आवश्यक आहे अशी तरतूद शासन निर्णयात आहे. मात्र गेल्या वर्षापासून महाराष्ट्र शासनातील मंत्री विमा कंपन्यांना शासननिर्णय मोडण्याची पूर्ण मोकळीक देत आहेत. पीक विमा भरताना शेतकऱ्यांना एक दिवसाची देखील मुदतवाढ न देणारे शासन पीक विमा भरपाई वाटपातील विमा कंपन्यांनी केलेली महिनोंमहिनेची दिरंगाई याला मात्र पूर्ण मोकळीक देत आहे. या संबंधीचे प्रमुख नियंत्रण केंद्र शासनाच्या हाती असल्याने विमा कंपन्या राज्य शासनाच्या आदेशांना देखील अनेकदा केराची टोपली दाखवतात. बहुतेक विमा कंपन्या ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत यंदाच्या वर्षी खरीप २०२२ मध्ये मान्सून व हवामानामुळे खरीप हंगाम धोक्यात येणार याची हवामान कंपन्यांना भनक लागताच बहुतेक सर्व खाजगी कंपन्या महाराष्ट्रातून फरार झाल्या या हंगामातील ३ जिल्हे वगळता सर्व जिल्हे भारतीय कृषी बिमा निगम (AIC) या सरकारी कंपनीच्या हवाली करावे लागले आहेत. भारत को लुटो और भागो !! त्यांनी शेतकऱ्यांच्या लुटीतून गोळा केलेला नफा महाराष्ट्रात देखील राहणार नाहीत आणि 'कशाला पाहिजेत या कंपन्या?' असा प्रश्न उपस्थित होतो.
केंद्र शासनाच्या या पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांचा लाभ जास्त होणार हे लक्षात आल्यानंतर बिहार आणि प. बंगाल राज्य सरकारे या योजनेतून बाहेर पडत आहेत गुजरात याच वाटेवर आहे. सनातन दुष्काळाशी झगडणाऱ्या महाराष्ट्र राज्याला पीक विमा कंपनीची मक्तेदारी मोडून पीक विमा स्वातंत्र्य अंमलबजावणी यंत्रणा राबविणे सहज शक्य आहे. तशा प्रकारच्या अनेक तरतुदी उपलब्ध आहेत. प्रचलित योजनेत शेतकऱ्यांच्या तक्रार निवारण प्रक्रियेसाठी अत्यंत तुटपुंज्या तरतुदी आहेत. राज्य शासनाने स्वतंत्र धोरण आखल्यास शेतकऱ्यांना अनुकूल अशा प्रकारच्या तक्रार निवारण व दाद मागण्यासाठी आवश्यक तरतुदी करणे शक्य आहे. न्यायालयीन समकक्ष तक्रार निवारण यंत्रणा राज्य स्तरावर स्वतंत्र कायद्याने स्थापित करणे देखील शक्य आहे. याच बरोबर राज्य शासनाच्या शेतकरी व ग्रामीण जनतेसाठी असलेल्या अन्य विमायोजना यांचा समन्वय घालता येवू शकेल. याच बरोबर उपेक्षित घटकांसाठी विशेषतः आदिवासी, मागासवर्गीय शेतकऱ्यांना मोफत पीक विमा योजना लागू करणे याच बरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना असाच लाभ देणे आदी विशेष बाबी साध्य करणे शक्य होवू शकते. मात्र नेहमी प्रादेशिक अस्मितांचे राजकारण करणाऱ्या पक्ष संघटना याबाबत मात्र मुग गिळून गप्प बसल्या आहेत असे खेदाने म्हणावे लागते.
शेतकरी स्वातंत्र्य आणि पीक विमा 
शेतकरी स्वातंत्र्य आणि पीक विमा ही योजना शेतकरी फायदायची नसून शेतकरी लुटीची योजना आहे. पीक विमा काढतांना खाजगी कंपनीची मक्तेदारी असते. इतर वीम ज्यावेळी सामन्य नागरिक काढतो त्यावेळी त्याला विमा निवडीचे स्वातंत्र्य असते. तसे मात्र पीक विमाच्या बाबतीत दिसून येत नाही. विशीष्ट एक कंपनी हि ठराविक क्षेत्रफळ अंतर्गत शेतकरी यांच्या पिकाचा विमा काढते. नुकसानभरपाई देतांना मात्र हैराफैरी करून शेतकऱ्याच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातो. आज असंख्य शेतकऱ्यांचे पीक विमाचे पैसे लुटले गेले. नुकसान होऊन देखील आजून भरपाई नाही. पीक विमा नेमका कोणाच्या फायद्याचा आहे. पीक विमा काढतांना शेतकरी यांना स्वातंत्र्य का नाही ? विमा काढला म्हणून नुकसानभरपाई द्या यासाठी आंदोलन करून तडजोड करणारे शेतकरी कैवारी म्हणून घेणारे हे शेतकऱ्यांच्या अवतीभवती आहेत. ते शेतकरी स्वातंत्र्य यावर कधी एक शब्द काढणार नाही. शेतकरी पीक विमा काढला पाहिजे पण विमा कंपनीची मक्तेदारी मोडून काढली पाहिजे. पीक विमा कंपनीची देखील स्पर्धा असली पाहिजे. जि कंपनी शेतकऱ्याच्या लाभाचा विचार करेल त्यांच्या कडून शेतकरी पीक विमा घेतील. त्यासाठी सरकारने का हस्तक्षेप करावा. प्रत्येक ठिकाणी सरकार शेतकऱ्याच्या जीवनात हस्तक्षेप करत असतो. या सरकारी हस्तक्षेपामुळे शेती करणे संकटाच  काम होऊन बसले आहे. त्यामुळे जो पर्यत शेतकरी स्वातंत्र्याच्या जो पर्यत विचार होत नाही. तो पर्यत शेतकरी संकट दूर होत नसते. शेतकरी आत्महत्या सत्र देखील थांबत नाही. सरकार अनुदान आणि जाहीर पँकेज जाहीर करेल पण ते प्रत्यक्ष शेतकरी बांधवांच्या हातात कधी येत हे आता पर्यत सरकरी योजनेच्या यशस्वी गाथा कुठे बघण्यास मिळाली नाही. त्यामुळे सरकार कल्याण करेल आणि शेतकरी संकट थांबेल असे जर कोणा तज्ञ अभ्यासकाला वाटत असेल तर त्याला नोबल पुरस्कार दिला पाहिजे. शेतकरी संकट दूर करण्यासाठी शेतकरी स्वातंत्र्याच्या विचार करावा लागेल. शेतकरी स्वातंत्र्य म्हणजे काय तर शेतकरी हा उद्योजक आहे त्याला त्यांच्या उद्योग करण्यासाठी सरकार आणि प्रशासन नावाची यंत्रणा यांनी लुडबुड करणे थांबवले पाहिजे. हे करण्यासाठी शेतकरी विरोधी नरभक्षी कायदे रद्द केले पाहिजे. 
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे       चलभाषा – ९०९६२१०६६९ 

Wednesday, February 15, 2023

शेतकऱ्यांच्या प्रियकर कोण ?

 शेतकऱ्यांच्या प्रियकर कोण ?

शेतकरी

रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात.कारण भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतीवर उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते. शेतीचे चाके थांबल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होण्या शिवाय पर्याय नसतो. कारण अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ या सारखे जिवनाश्यक बाबीचा निर्माता हा शेतकरी आहे म्हणून शेतकऱ्याला 'जगाचा पोशिंदा' म्हटल्या जाते. समाजव्यवस्था अबाधित रहावी म्हणून उन, पाऊस, थंडी, वादळी वारा अशां आपदांचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारा पोशिंदा म्हणजेच शेतकरी होय. या कृषीप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांना अर्थात जगाच्या पोशिंद्याला कधी कोणी प्रेम करणार आहे का ? आपण भारतीय समाज खूप भावनिक असतो. प्रत्येकाला आपल्या जीवनात प्रेमाचा स्पर्श असतो. हा स्पर्श शेतकरी बांधवांच्या जीवनात कोणी करणार आहे का ?

शेतकरी जीवन

शेतकरी’ हा शब्द जरी कानावर पडला तरी आपल्या अंगाला काटे आल्यासारखे वाटते कारण आपण दररोज टी.व्ही. चॅनेल्सवर , वर्तमानपत्रात आणि सोशल मीडिया वर बघत असतो की, किमान दररोज एक तरी शेतकरी आत्महत्या करतो. आपण ग्रामीण भागातील आहोत म्हणून आपले आणि शेतकऱ्याचे नाते खूप जवळचे आहे आणि माझा जन्म देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झालेला आहे.

माझ्या मते, “शेतकरी” या शब्दाची फोड केली तर त्याचा अर्थ असा होईल शेत + करी म्हणजेच जो शेतात रात्रंदिवस काबाड कष्ट करतो म्हणजे सतत काम करत असतो. आणि आपल्या साठी दोन वेळेचं अन्न पिकवतो तो शेतकरी.. माझा शेतकरी राजा खूप काबाड-कष्ट करत असला तरी त्याला सुख मिळत नाही. त्याच्या वाटेला नेहमी दुःखाचे डोंगर उभे राहतात. तरी देखील तो इतरांबद्दल वाईट विचार करत नाही. पण आपण जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीचा विचार केला तर ते आपल्याला विरुद्ध पाहावयास मिळेल. पैसा ज्याच्याकडे असतो तो पैशांचा गैरवापर करतो परंतु शेतकरी एवढा काबाडकष्ट करतो तरी देखील तो पै-पै जमवून ठेवतो. थोडक्यात शेतकऱ्याचे चित्र डोळ्यासमोर आणा, आपल्याला त्याचा काळा खुट्ट चेहरा, त्याचे मळलेले कपडे, त्याचे डोक्याचे वाढलेले केसं, त्याचा फाटलेला बनियान, गळ्यात मळलेला रुमाल असं व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर लगेच उभं राहील.आज २१ व्या शतकामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वाढले आहे. परंतु अशिक्षित असल्यामुळे त्याच्याविषयी शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना नसते. जर एखाद्या वेळेस चांगल पीक आलं तर, मग त्याला मार्केटला भाव नसतो. कर्ज काढून शेती करणारा शेतकरी जेव्हा पीक बाजारात नेतो तेव्हा मात्र भाव नसल्यामुळं त्याला अनेक अडचणींना तोंड दयावं लागतं. असं सर्व जीवन जगत असतांना आपल्याला वाटत शेतकरी सुखी व्यक्ती आहे. आज समाजात शेतकऱ्यावर प्रेम करणारं कोणी राहिलं नाही. शेतकरी फक्त भावनिक विषय झाला आहे. कोणी यावे आणि ढोल वाजवावा असं झाल आहे. शेतकरी म्हणून प्रेम करणार. त्यांच्या समस्या जाणून घेणार आज घडीला कोणी दिसत नाही.

शेतकरी आणि समाज

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जीवघेणी दुरवस्था प्रत्येकालाच माहीत आहे. लागोपाठ तोटय़ात राहणारी शेती ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत आहे. सरकारचे व समाजाचे लक्ष या हृदयद्रावक घटनांकडे जाते. आत्महत्यांची दखल घेतली जाणे आवश्यक आहेच. परंतु कमी उत्पन्नामुळे जी उपासमार, कुपोषण व मुलांची शिक्षणातून गळती तसेच इतर दुष्परिणाम शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना भोगावे लागतात, त्याकडे मात्र सरकारचे पुरेसे लक्ष जात नाही. हा दुष्परिणाम महाराष्ट्रातील शेतकरी निमूटपणे आणि असहायपणे सहन करत जगतो. संपूर्ण महाराष्ट्रात, आणि विशेषत: फार मोठय़ा कोरडवाहू व कमी सिंचन असलेल्या भागात शेती उत्पन्नामधील वारंवार होणारे चढउतार, योग्य कृषीधोरणाचा अभाव तसेच ते असलेल्या उपाययोजना राबविण्याची सरकारची असमर्थता हे सारेच शेतकऱ्याच्या गरिबीला कारणीभूत ठरतात. सांख्यिकी माहितीतून शेतकऱ्याच्या गरिबीचे जे स्वरूप दिसते त्यामधूनदेखील आपणास हे पाहायला मिळते.

सन २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जवळपास ५५ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. या ग्रामीण लोकसंख्येच्या उदरनिर्वाहाची चार साधने आहेत- शेती, अकृषी उद्योग/व्यवसाय, मजुरी-रोजंदारी आणि नियमित वेतनाधारी नोकऱ्या. सन २०१२ मधील पाहणीनुसार ४४ टक्के कुटुंबांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र शेती करणाऱ्यांचे प्रमाण जातीनुसार भिन्न आहे. राज्यातील कृषीक्षेत्राच्या दुरवस्थेमुळे २०१२ मध्ये कमीतकमी २० टक्के शेतकरी कुटुंबे ही गरीब आहेत. ही कुटुंबे शेतकरी असली तरी दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात भरडली जात आहेत. विशेष म्हणजे, हे प्रमाण राज्याच्या (सरासरी १७ टक्के कुटुंबे दारिद्रय़रेषेखाली, या) प्रमाणापेक्षा जास्त आहे. यावरून शेतीच्या वाईट स्थितीची जाणीव होते. गरीब शेतकरी हे मुख्यत: अल्पभूधारक (पाच एकरांपेक्षा कमी जमीन) आहेत. महाराष्ट्रात एकूण शेतकऱ्यांपैकी ९५ टक्के शेतकरी गरीब आहेत. उरलेले फक्त पाच टक्के भूधारकच गरिबीमधून सुटले आहेत. या आकडेवारीतून हे दिसते की एकंदर दहा एकरांपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न त्यांच्या उदरनिर्वाहाच्या मूलभूत गरजा भागविण्या इतपतही पुरेसे नाही. याचा अर्थ हा की साधारणत: जमीनधारणा १० एकर किंवा सहा एकर सिंचित यापेक्षा जास्त असेल तर गरिबीतून जेमतेम मुक्तता होऊ शकते. ९५ टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता धोरण असूनही, गरिबी दूर करण्यासाठी उत्पन्नात वाढ करणे हे जबरदस्त आव्हान महाराष्ट्र शासनापुढे आजही कायम आहे. अशी एकूण शेतकरी आणि समाजाची परिस्थिती आहे. समस्या अनेक आहे पण ते सोडवण्यासाठी तेवढी दूरदृष्टी समाजतील कोणाकडे नाही. त्यामुळे शेतकरी नेहमी उपेक्षित आहे. त्यांच्यावर कोणी प्रेम करावे असं कोणी नाही त्याला मात्र गुलाम कराव आणि त्यांच्याकडून लुटावे हे शासकीय धोरण शेतकरी विरोधी नरभक्षी कायदे राबवून अनन्य केला जातो.

          समाज म्हणून आम्ही फक्त म्हणत राहयचं किती दयनीय परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या दुखावर आम्ही पँकेज देऊन फुंकर घालतो. नव्याचे नऊ दिवस आम्ही रडायचं आणि पुढे मात्र आहे ती परिस्थिती आहे.

शेतकरी आणि प्रेम

          शेतकरी आणि प्रेम म्हटल्यावर शेतकऱ्यांच प्रेम हे माणसं पेक्षा त्यांचा गोठ्यातील प्राणी व पक्षी वर अधिक असत. प्रेम म्हटल्यावर ते फक्त स्त्री आणि पुरुष असं नसतं तर प्रेम हे आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीवर असत. त्यामुळे शेतकरी बांधवाचा जीवनात अठरा विश्व दारिद्य जाणूनबुजून निर्माण करण्यात येते. त्यामुळे शेतकरी बांधवाच्या जीवनात सुख आणि प्रेम कधी निर्माण होणार हा प्रश्न “प्रेम दिवस” साजरा करतांना पडतो. शेतकरी बांधवांना शासनाने द्याचं असेल तर शेती उद्योगाचं स्वातंत्र्य दिले पाहिजे. शेतकरी श्रीमंत व्हावा असं वाटत असेल तर गुलामीच्या बेडीतून सोडून त्याला त्याचं स्वातंत्र्य दिले पाहिजे. शेतकरी आणि प्रेम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांच्यावर प्रेम करणारं कोण सध्या दिसत का? असा विचार करावा लागतो. शेतकरी कडे फक्त भावनिक होऊन प्रेम करणारे नको तर अर्थशास्त्रीय शेती फायद्यात कशी येईल हे प्रेमाने समजून सांगणारे पाहिजे. शेतकरी प्रेमाचा भुकेला नाही पण त्यांच्या भावनिकतेच्या फायद्या घेऊन पँकेज देऊन फुंकर घालणारे पिल्लावळ दूर करणारे पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकरी जीवनात प्रेमानं जगू शकेल. त्यामुळे म्हणावे लागते शेतकऱ्यांचा प्रियकर कोण ?

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९