Wednesday, July 27, 2022

समाजमन दूषित का होतय ...

 समाजमन दूषित का होतय ...

 

महाराष्ट्रात मराठी संतांनी समाजमनाची जी काही शतके मशागत केली, त्यामुळे शिवाजी महाराजांसारख्या युगकर्त्यां अलौकिक राज्यकर्त्यांला त्याच्या विचारांचा समजून स्वीकार करणारा समाज अनायासे मिळाला. म्हणजे शिवाजी महाराजांचा अवतार होईपर्यंत संतांनी आचार-विचार, स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व आदी गुणांचे पाठ तत्कालीन समाजाकडून गिरवून घेतले होते. व्यक्तिगत आणि सामाजिक संकटांच्या प्रसंगांतून निभावून नेण्यासाठी कसे वागावे, हे सांगणारे संत हे विचारवंतया संज्ञेस पात्र होते. इंग्रजांच्या उदयानंतर समाजात सुरू झालेल्या विचारमंथनात ज्ञानोपासकांपासून समाजहितचिंतकांपर्यंत आणि वैचारिक क्रांती घडवून आणणाऱ्या विभूतींपासून क्रियाशील विचारवंतांपर्यंत कित्येक समाजधुरिणांनी अवघा महाराष्ट्र ढवळून काढला होता. यांत काळाच्या पुढचा विचार करणारे होते, काळाबरोबर धावणारे होते, तसेच पुरोगामित्वाच्या फाजील उत्साहाच्या भरात नव्या सामाजिक समस्या निर्माण करण्याचे अतिसाहस दाखविणाऱ्यांना लगाम लावणारेही होते. साहजिकच समाज प्रबोधनाच्या मार्गावर वाटचाल करू लागला होता. व्यक्तिगत तसेच सार्वजनिक चारित्र्य आणि सामाजिक सामीलकी यांचे नवे आणि नवी उंची गाठणारे आयाम ठरवू लागला होता.  पण कुठेतरी माशी शिंकली आणि प्रगतिपथावर असलेला आपला समाज यू टर्नघेऊन उलटी पावले टाकू लागला. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत ज्या महाराष्ट्राचे नेतृत्व अख्ख्या देशाने मानले होते, तोच महाराष्ट्र सामाजिकदृष्टय़ा प्रगती खुंटलेल्या अन्य राज्यांसारखा झाला. वैचारिकतेची आणि विवेकाची साथ सोडल्याने महाराष्ट्रात बरेच अनर्थ घडले. याची सर्वाधिक जबाबदारी स्वातंत्र्योत्तर काळातील विचारवंतांवर येते,  यात शंका नाही.

अल्पकालिक राजकीय लाभासाठी पुढच्या कित्येक पिढय़ांच्या भवितव्याचे नुकसान करणारे मोठे राजकीय नेते, स्वार्थासाठी आणि संपत्तीसंचयासाठी राजकीय तशीच व्यक्तिगत निष्ठा बदलण्यास मागेपुढे न पाहणारे लहान नेते आणि विचारवंतहे बिरुद दिमाखाने मिरवणारी, पण कोणत्याही प्रकारचे सामाजिक दायित्व न मानणारी साहित्य, कला आणि डॉक्टरी, वकिली पेशांतील मंडळी महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहेत की मागे, असा प्रश्न आज कोणाही सुबुद्धाला पडेल. समाज जसजसा सुशिक्षित होईल, तसतसा तो अधिक विचारी, अधिक विवेकी, विनयशील आणि सुसंस्कारित होईल, असा पूर्वीच्या समाजधुरिणांचा जो कयास होता तो महाराष्ट्राने खोटा पाडला आहे. महाराष्ट्रात जो पैसा येऊ  लागला आहे, तो उन्मत्त आणि उर्मट प्रवृत्तीलाच खतपाणी घालू लागला आहे. आपला समाज उघडपणे असभ्य भाषा आणि हिंसा यांचे समर्थन करू लागला आहे. नागरिकशास्त्राचे साधे साधे पाठ विसरू लागला आहे. कायदा बंधनकारक वाटू लागल्याने तो मोडण्याकडे त्याची प्रवृत्ती होऊ  लागली आहे. याचा अर्थ मराठी संतांनी मराठी समाजाच्या मनाची जी मशागत केली होती, ती पार धुपली गेली आहे. मराठी समाजसुधारकांनी महाराष्ट्रात सुधारणांची जी रोपटी लावली होती, ती आर्थिक मस्तीच्या प्रखर उन्हात जळून खाक झाली आहेत. एकेक करून जुन्या-जाणत्या समाजसुधारकांना समाजाने हरवले आहे. त्या प्रत्येकाचे नाव हरघडी घेत त्यांच्या विचारांना मात्र समाजाने पराभूत केले आहे. समाजसुधारक विचारवंतांच्या बोलण्यातील लाभांश तेवढा उचलावयाचा आणि शहाणपणाचे बोल तेवढे टाळावयाचे, या सामाजिक सवयीतून झुंडशाही प्रवृत्ती वाढू लागली आहे. जनसामान्यांच्या मनात राग, लोभ, मत्सर, हिंसा आदी रिपू विषाप्रमाणे कालवण्याचेच काम अनेकांनी जाणते-अजाणतेपणाने पूर्णत्वाला नेले आहे किंवा आरंभिले आहे, आणि अनुयायांना त्वरित लाभाच्या अपेक्षेने आंधळे केले आहे. एखादा जाणता राजाम्हणविला जाणारा मोठा नेता आपल्या अनुयायांच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करतो, त्या अनुयायांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करतो तसेच इतरांनीही दुर्लक्ष करावे अशी अपेक्षा करतो, तेव्हा पक्षीय राजकारणाने त्याला किती असंवेदनक्षम केले आहे याचेच प्रत्यंतर येते. विवेकाचे भान सुटल्याचेच हे लक्षण. वास्तविक यासंबंधात समाजातील विचारवंतांनी आवाज उठवून जनसामान्यांचे प्रबोधन करणे गरजेचे होते, आणि आजही आहे. पण विचारवंतांचे पेव फुटलेल्या आजच्या महाराष्ट्रात विचारवंतांचा दराराच उरलेला नाही. विचारवंत हे राज्यकर्त्यांच्या तर खिजगणतीतही नाहीत. विचारवंतांनी आपण होऊन आपली ही गत करून ठेवली आहे. ते राज्यकर्त्यांच्या भजनी तरी लागले आहेत, अन्यथा भीरुतेचे बळी तरी ठरले आहेत.

राज्यकर्ते हे सत्ता टिकवण्यासाठी मतलबी व्यवहार करणार, हे उघड आहे. शासन प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्याची नामी शक्कल लढवत भरमसाट पुरस्कार देऊन विचारक्षम व्यक्तींना अंकित करण्याचा प्रयत्न करत असते. असे प्रोत्साहन देण्याचे निमित्त असते; पण पुरस्कारासाठी अर्ज वा विनंतीपत्र अत्यावश्यक ठरविल्यामुळे त्यांच्या विचाराच्या नांग्या ठेचण्याचेच राज्यकर्त्यांच्या मनात असते, हे उघड दिसते. पण त्यामुळे सरकारदरबारचे याचक यापलीकडे साहित्यिक, कलावंत, क्रीडापटू यांना किंमत उरत नाही. डॉक्टर-वकील यांनी आपला समाजाचे नेतृत्व करण्याचा बाणा तर केव्हाच सोडून दिला आहे. मग तटस्थ समाजहितचिंतकांचा विरोधी आवाज दाबायला कितीसा वेळ लागणार? स्वार्थी राजकारणी, मतलबी नवश्रीमंत आणि हतबल जनता स्वतंत्र विचार करू शकत नाही. हे सारे फक्त विकारांच्या आहारी जाऊ शकतात. त्यांना वास्तविक तटस्थ, निर्मोही आणि निर्भीड विचारवंतांनी मार्ग दाखवायचा असतो. विचारवंतही तटस्थ राहिले नाहीत, तेही मोहात गुरफटले तर समाजाला कोण तारणार? आज अवघ्या महाराष्ट्राला वैचारिकतेचे वावडे निर्माण झाले आहे आणि नीतिमत्ता, चारित्र्य, सदसद्विवेक यांचा छुपा किंवा क्वचित कोठे उघड तिरस्कार वाटू लागला आहे, याचे मूळ विचारक्षम आणि विचारवंत यांच्याकडे पाहण्याच्या समाजाच्या आणि राज्यकर्त्यांच्या बदललेल्या दृष्टिकोनात आहे. समाजातील विचारवंतांचा उपमर्द करण्याची आवश्यकता नसते, हे प्रगल्भ राज्यकर्तेच जाणू शकतात. असे होणे हा संतांचा जसा पराभव आहे, तसाच तो प्रबोधन-पर्वातील विचारवंतांचा पराभव आहे. परत माघारीची पावले चालू लागलेला महाराष्ट्र पुन्हा १८१८ कडे वाटचाल करत आहे की काय, असे वाटण्याजोगी भयावह परिस्थिती आहे. पण तसे मानायला राज्यकर्त्यांपासून तथाकथित विचारक्षम व्यक्तींपर्यंत कोणीही तयार नाहीत. ढोंगाचा आधार घेतला की सारे कसे छान छान दिसायला लागते.

गेल्या साठेक वर्षांत आपल्या समाजात समतेच्या- म्हणजे उपेक्षितांना सामाजिक न्याय मिळवून द्यायच्या एकमेव विचाराव्यतिरिक्त इतर सामाजिक प्रगतीचा वा अभिसरणाचा कोणताही नवा विचार पुढे गेलेला नाही.. मग तो संस्कृतीविचार असो वा धर्मविचार! दलित साहित्यविचाराचा अपवाद वगळता नवा साहित्यविचार वा आधुनिक कलाविचार विकसित झालेला नाही, हे कटू सत्यही स्वीकारावे लागते. सामाजिक न्यायाचा विचार प्राधान्यक्रमाने होणे हे अत्यावश्यकच होते आणि आजही आहे. उपेक्षितांवर अन्याय होत असताना कोणत्याही प्रकारच्या अन्य प्रगतीचा विचारही अयोग्य ठरला असता. पण सामाजिक न्यायही बदलती संकल्पना आहे. आजचा न्याय हा उद्याचा अन्याय ठरू शकतो. जसा कालचा न्याय हा आज अन्याय ठरला आहे. सामाजिक बदलाच्या बाबतीत एकमेकांवरचा विश्वास आणि शतकानुशतकाचा अन्याय एका निर्णयाने दूर केला जाण्याची घाई ही समाजाला अंतिमत: घातक ठरू शकते. सबुरीने घेणे, हेच समाजाच्या मानसिकतेत कायमस्वरूपी बदल घडवून आणते, हे समाजाला पटवून देण्यात आपले विचारवंत कमी पडले, हे नाकारता येईल काय?

अन्य सामाजिक क्षेत्रांच्या बाबतीतसुद्धा प्रागतिक विचारांची कास धरणे कमी महत्त्वाचे नव्हते. केवळ बाहूंत किंवा केवळ पायांत सामर्थ्य येऊन चालेल का? केवळ मेंदू तल्लख राहून फायदा होईल का? केवळ छाती-पोट नीट असण्याने शरीर तंदुरुस्त राहील का? शरीराच्या सर्व अवयवांत समसमान शक्ती येणे महत्त्वाचे असते. समाजरूपी शरीराचेही तसेच आहे. निवडणुकांच्या गुंतागुंतीत अडकलेल्या राजकारण्यांच्या पचनी हा विचार पडणे शक्य नाही. बरे, त्यांना ते चुकत आहेत, हे सुनावण्याचे धारिष्ट्य दाखवणारे विचारवंत आजच्या आपल्या समाजात नाहीत. आणि त्यांनी सांगितले तरी ते ऐकण्याच्या मन:स्थितीत राज्यकर्ते नाहीत. म्हणूनच तर त्याच त्या गटांगळ्या खात, डुबक्या घेत समाजाचे मार्गक्रमण चालले आहे. तेही चुकीच्या मार्गावर!

प्रत्येक क्षेत्राचे आपले म्हणून एक नीतिशास्त्र असते, तत्त्वज्ञान असते. ते प्रगतिपथावर न्यावयाचे काम त्या- त्या क्षेत्रातील विचारवंत करत असतात. प्रत्येक नवविचार हा व्यवहार्य किंवा अमलात आणण्यासारखा असतोच असे नाही. पण म्हणून विचारप्रक्रिया थांबून कसे चालेल? ‘सुधारककार आगरकरांनी विचारसंघर्षांला का भिता?’ असा सवाल केला होता. आज वाद नकोअशी बहुतेकांची भूमिका आहे आणि मांडवली करून प्रश्न सोडविण्याकडे कल आहे. आज आपल्याकडे विचारसंघर्ष होत नाहीत. होतात ते चक्का-जाम’, ‘रास्ता रोकोकिंवा खळ्ळ खटय़ाक’! ‘ही विकारवशता झाली; विवेकाची कृती नव्हे,’ हे निक्षून सांगणारे विचारवंत कुठे लपून बसले आहेत? हे सुदृढ समाजाचे लक्षण नाही.

आज विचारवंत म्हणवले जाणारे भरमसाट वाढले आहेत. त्यातही सांस्कृतिक अप्रगल्भतेच्या ज्या पायरीवर आपण उभे आहोत, तेथे विशेषणांची खैरात करण्याची सवय समाजाला लागली आहे. ज्येष्ठ विचारवंत’, ‘सामाजिक विचारवंतअशी विशेषणे सर्रास वापरली जात आहेत. अमुक अमुक विचारवंताने कोणता नवा विचार महाराष्ट्राला दिला, असे विचारता ९० टक्के विचारवंतांचे तरी अढळपद डळमळून पडेल. विचारवंतांच्या शब्दांचे वजन कमी होत होत त्यांची सामाजिक उपयुक्तता संपणे, हा खरे तर समाजाच्या दृष्टीने चिंतेचा विषय असला पाहिजे. विचारवंतांची लक्षणे कोणती, त्यांची काही वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी आहे की नाही, वगैरे मोजपट्टय़ा लावल्या तर आज आपल्यात विचारवंत उरले नसल्याचा वा मूळ प्रवाहातून ते बाहेर फेकले गेल्याचाच निष्कर्ष काढावा लागेल.

शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी संतांनी महाराष्ट्राची मनोभूमी वैचारिक मशागतीने उत्तमरीत्या नांगरली होती. त्याचा लाभ शिवरायांना झाला. इंग्रजांच्या उदयानंतर समाजात सुरू झालेल्या विचारमंथनात कित्येक समाजधुरिणांनी अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. साहजिकच समाज प्रबोधनाच्या मार्गावर वाटचाल करू लागला होता. व्यक्तिगत तसेच सार्वजनिक चारित्र्य आणि सामाजिक सामीलकी यांचे नवी उंची गाठणारे आयाम ठरवू लागला होता. पण कुठेतरी माशी शिंकली आणि प्रगतिपथावर असलेला आपला समाज यू टर्नघेऊन उलटी पावले टाकू लागला. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत ज्या महाराष्ट्राचे नेतृत्व अख्ख्या देशाने मानले होते, तोच महाराष्ट्र सामाजिकदृष्टय़ा प्रगती खुंटलेल्या अन्य राज्यांसारखा झाला. वैचारिकतेची आणि विवेकाची साथ सोडल्याने महाराष्ट्रात बरेच अनर्थ घडले. याची सर्वाधिक जबाबदारी स्वातंत्र्योत्तर काळातील विचारवंतांवर येते, यात शंका नाही.

प्रत्येक समाजाची भावनिक उंची आणि वैचारिक उंची असे समांतर जाणारे दोन प्रवाह असतात. या दोन समांतर प्रवाहांतील अंतर जितके कमी, तितके तो समाज वैचारिकदृष्टय़ा पक्व, प्रगल्भ, प्रबुद्ध असल्याचे मानता येते. समाजाने विवेकवादाचा आणि बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार करणे, स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुता, सर्वधर्मसमभाव, परमतसहिष्णुता यांसारख्या प्रागतिक विचारांना आपलेसे करणे आणि विज्ञानाची कास धरणे. ही समाजाचा वैचारिक स्तर वरचा असण्याची लक्षणे होत. एका विशिष्ट अर्थाने स्थितिजन्य समाजातील शांततेचा भंग करणारा विचारवंत हा मुळात समाजहितरक्षक असतो. शांत तळ्याच्या काठावर बसून तो पाण्यात दगड भिरकावतो. पाण्यावर तरंग उठतात, तसे स्थितिजन्य समाजात विचारांचे तरंग उठतात. नव्या वैचारिक प्रगतीची ती नांदी असते. हा शांतताभंग समाजाचे विचार ढवळून टाकणारा असतो. विचारवंताकडून काही अपेक्षा असतात. विचारवंताने सत्याची बाजू लावून धरली पाहिजे. त्याने नेहमी उपेक्षित वर्गाची कड घेणे अपेक्षित असते. त्याने महत्त्वाच्या प्रसंगी सामाजिक घटनांवर परखड आणि स्पष्ट शब्दांत भाष्य करणे हे त्याचे कर्तव्य असते. प्रत्येक वेळी प्रवाहपतित होऊन समाजाच्या मागे जाण्याचे टाळणे अपेक्षित असते. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्यांकडूनच समाजात बदल होण्याची अपेक्षा करता येते. तटस्थता हा त्याचा मोठा गुण असतो, तो त्याने सोडता कामा नये. महत्त्वाचे म्हणजे आपल्या मताची किंमत देण्याची त्याची सदैव तयारी हवी.

ज्या समाजातील विचारवंत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी सत्याची कास धरत नाहीत, आपण सत्यवचनी आणि नीतिमान असल्याचे केवळ भासवतात, पण सर्व प्रकारच्या भोंदूपणामुळे जे द्विस्तरीय जीवन जगतात; तटस्थता राखण्याचा कसोशीने प्रयत्न करत नाहीत; उपेक्षितांबद्दल नुसताच कळवळा व्यक्त करतात, पण त्यांचा पक्ष घेऊ न संघर्ष करण्यास घाबरतात; वेळप्रसंगी सत्ताधाऱ्यांना चार बोल सुनवायला कचरतात, तो समाज वैचारिकरीत्या खुजाच राहणार. शासन-पुरस्कृत विचारवंतांची यादी प्रतिवर्षी कितीही मोठी होत राहिली, तरी शासनाच्या व सत्ताधाऱ्यांच्या मदतीवर ही वाढ अवलंबून असल्यामुळे सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची क्षमता त्यांच्याकडे नसणार. विचारवंतांकडे आश्रित म्हणून पाहण्याची राज्यकर्त्यांची दृष्टी जोवर बदलणार नाही किंवा त्यांच्याकडे उपहासाच्या व तुच्छतेच्या नजरेने पाहण्याची प्रवृत्ती बदलणार नाही, तोपर्यंत शासनकर्त्यांवर नीतिमानतेचा अंकुश ठेवण्यात तथाकथित विचारवंत असमर्थच ठरणार आणि दर्जा, प्रमाण, सामाजिक सामीलकी आणि प्रगतीसारख्या समस्या अनुत्तरितच राहणार. जोपर्यंत समाजालाही केवळ लक्ष्मीचीच आराधना आणि मनोकामना करण्यातच स्वारस्य असणार, विचारांना आणि विनय, विवेक, परमतसहिष्णुता आदी सामाजिक गुणांचे बंधन मर्दानगीच्या भ्रामक कल्पनांना कवटाळत पाळले जाणार नाही, तोपर्यंत समाज विचारवंतांना मान देणार नाही. आणि जोपर्यंत विचारवंतही सत्तेपुढे शहाणपण चालत नाहीअशा वाक्यांच्या आड आपली भीरुता लपवत राहणार, तोपर्यंत कोणताही समाज वैचारिकतेला पारखाच राहणार. वैचारिकता ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, हे न मानणाऱ्या समाजाची पीछेहाटच होणार. अशा समाजातील प्रगती ही फसवीच राहणार. महाराष्ट्राचे चित्र बदलायचे असेल तर विचारवंतांकडे पाहण्याचा राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन बदलायला हवा. समाजालाही विचारवंत कोण, हे ओळखण्याची सवय लागली पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे विचारवंतांना स्वत्व ओळखून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची ऊर्मी आली पाहिजे.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९

 

जलक्षेत्रातील कार्व्हर - विलासराव साळुंखे

 जलक्षेत्रातील कार्व्हर - विलासराव साळुंखे

 

विलासराव साळुंखे हे भूमिहीन मजुरला देखील पाण्याचे समान वाटप व्हावे. या मागणीसाठी ३० वर्षे लढा देणारे तसेच 'पाणी पंचायत या संकल्पनेने सामूहिक व्यवस्थापनाद्वारे पाण्याची साठवण व वितरण करून शेतकःयांचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणणारे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३७ रोजी सांगली जिल्ह्यातील धूळगाव येथे झाला. त्यांनी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यांचा १९७३ सालीचा पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील पाणलोट क्षेत्रविकास व त्याआधारे शेतीसिंचन हा प्रयोग विलक्षण गाजला व तो नायगाव पॅटर्न या नावाने ओळखला जातो. आजच्या तरुण पिढीला विलासराव साळुंखेची ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासामधील पाणी, जमीन व पर्यावरण या संदर्भातील आर्थिक सिद्धांत, तत्त्वप्रणाली व त्यांनी केलेले प्रयोग यांची तोंडओळख नाही. ते दोनशे वर्षे पुढे विचार करणारे द्रष्टे कर्मयोगी होते. एक होता कार्व्हरया प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांनी विलासरावांवर भगीरथाचे वारसहे पुस्तक लिहिले आहे, यात बरेच काही आले. विलासराव असे म्हणत, की या शेती शास्त्रज्ञ डॉ. कार्व्हर प्रमाणेच जिद्द, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय जीवनमूल्यांचा अभिमान असणाऱ्या हजारो तरुणांची ग्रामीण भूमी आतुरतेने वाट पाहत आहे.

 

विलासरावांना परदेशातील तंत्रज्ञानाच्या शोधात जपान, अमेरिका, युरोपीय देश, इंग्लंड, कॅनडा अशा अनेक देशांमध्ये भ्रमण करण्याचा योग आला. तिथे चाललेले अतिरेकी आधुनिकीकरण व चंगळखोर भोगवादी संस्कृती त्यांच्या आध्यात्मिक मनाला अस्वस्थ करीत असे. पाणी या विषयासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांचे निष्कर्ष त्यांच्या स्वानुभवावर आधारित व प्रयोगाने सिद्ध झालेले असायचे. त्यांच्या वक्तव्यातील प्रांजळपणा व आंतरिक तळमळ समोरच्यांना भावून टाकायची. महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचे नियोजन-पाण्याचे न्यायवाटप, धोरण, दिशा, कार्यवाहीया त्यांच्या पुस्तकात दिलेली माहिती, आकडेवारी, सांख्यिकी तक्ते पाहून लक्षात येते की त्यांची मांडणी किती शास्त्रशुद्ध व सुसूत्रबद्ध होती. इस्राईलला भेट देऊन आल्यानंतर विलासराव म्हणाले, की फक्त ठिबक सिंचनाची व उपदेशाची जलनीती न सांगता तिथल्या समान वाटप शिस्तीचे नियोजन, पाण्याचे कायदे, स्वतंत्र पाणी आयोग याचे अनुकरण करावे लागेल. कार्पोरेट क्षेत्राची पार्श्‍वभूमी असल्यामुळे विलासरावांना कार्यकर्ते, शेतकरी यांच्या प्रशिक्षणाचे महत्त्व माहिती होते. पाणी पंचायतीच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो कार्यकर्ते प्रशिक्षण घेऊन तयार झालेत. यामध्ये लोक संघटन, जमीन व पाण्याचे गावपातळीवरील नियोजन, सामूहिक पाणीवाटप, सेंद्रिय शेती, पर्यावरण वगैरे विषयांचा अंतर्भाव होता. त्या ठिकाणी शिबिरार्थीच्या निवासाची, जेवणाची ही व्यवस्था केली गेली. विलासरावांनी पाणी पंचायतहे चळवळीचे मुखपत्र द्विमासिक सुरू केले. त्यात जलप्रकल्प, चळवळीतील अनुभव, ग्रामीण विकास, दुष्काळ उपाययोजना वगैरे विषय असायचे. विलासरावांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला व त्यांच्या कार्याला गवसणी घालून शब्दबद्ध करणे अत्यंत अवघड काम आहे. कोणीही प्रतिभावंत लेखक त्यांना पूर्ण न्याय देऊ शकणार नाही. दुष्काळाच्या झळा आपण वारंवार सहन करीत आहोत. त्याचा सामना करण्यासाठी विलासरावांचे विचार, तसेच निसर्गाचे संवर्धन करणारी अनुकूल सर्वसमावेशक पर्यायी विकास नीती नजीकच्या काळात अवलंबावीच लागेल.

 

मूलभूत विचार पाणी वाटपाचा

 

महाराष्ट्रातील पाणीप्रश्न या विषयाच्या वाचनास सुरुवात केली होती. पाणी प्रश्न समजून घेत असतांना पाणी विषयावर आज वर झालेल्या घटनांचा अभ्यास केला. त्याचं मध्ये मला सर्वसमावेशक महाराष्ट्रातील पाण्याच्या वाटपाबद्दलचा फार मूलभूत विचार विलासरावांनी मांडला; काही काळ समाजातील समाजवादी, साम्यवादी विचार म्हणून उसाच्या धनदांडग्या शेतकरी, पुढारी वर्गाने त्यांची हेटाळणी केली. परंतु विलासरावांचा द्रष्टेपणा आजच्या पाणीटंचाईच्या काळात जाणवल्यानंतर आज मात्र या पुढाऱ्यांची भंबेरी उडालेली दिसते. मुख्यत्वे शास्त्रशुद्ध मांडणी आणि उपलब्ध माहितीचे विज्ञाननिष्ठ विश्लेषण यांमुळे महाराष्ट्रातील काय, किंबहुना देशाचा पाणीप्रश्न हा मानवनिर्मित आहे आणि निसर्गनिर्मित नाही; हा सामान्यांना वरकरणी चुकीचा वाटणारा आणि दिवसेंदिवस पावसाच्या वेभरवशीपणाला शिव्याशाप देणाऱ्या शेतकरी, पुढारी वर्गाच्या मतांमुळे चूक वाटणारा खरा सिद्धांत त्यांनी विचारपूर्वक मांडला. देऊन ग्रामीण भागात एकूण लागणाऱ्या पाण्याच्या फार तर फार २% पाणी पिण्यासाठी पुरेसे आहे आणि सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था केली तर पिण्याचे पाणी थोड्या सामाजिक शिस्तीने अगदी नक्की 'बाय प्रॉडक्टम्हणून उपलब्ध होईल. ही वस्तुस्थिती विलासरावांमुळेच महाराष्ट्राला अवगत झाली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पण दुर्दैव म्हणजे हे कळूनही अंमलबजावणी अद्यापही होत नाही.

बहात्तरच्या दुष्काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रात लागू असलेल्या व पुढे इतर राज्यांत ज्याचे उदाहरण दिले जाते, अशा रोजगार हमी योजनेबाबत विलासरावांनी फार मूलभूत सूचना केल्या. रस्त्यासारखी दुष्काळी कामे काढून पैसे वाया घालवण्यापेक्षा पाझर तलाव, तळी यांची कामे करून 'पुढील पावसाचे पाणी साठवण्यासाठी सज्ज राहा' हा महाराष्ट्राला दिलेला बहुमोल सल्ला आजही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे व त्या काळातील या धोरणामधील आमूलाग्र बदलास कारणीभूत झालेले व तटस्थपणे महाराष्ट्रातील दुष्काळांचा अभ्यास केलेले इलेक्ट्रिकल इंजिनियर, अ‍ॅक्युरेट गेजिंग या स्वतःच्या यशस्वी मेकॅनिकल क्षेत्रातील उद्योजक प्रणेते विलासराव होत. या सर्व तत्त्वज्ञानाचे बालामृत आत्मसात करीत असतानाच पाण्याचे गावपातळीवर नियोजन आणि वाटप यांचा एकत्रित विचार होणे अत्यंत गरजेचे आहे, हे मत किती मूलतः विचार केलेले आहे, हे जाणवले. कधीकधी तर पुढे जाऊन मांडलेले भूमिहीनांचेही पाण्याचे अधिकार इत्यादी विषय फारच तात्त्विक वाटल्याने सवडीने विलासरावांशी त्यावर चर्चा केली, तर त्यांनी दक्षिण अफ्रिकेतील पाणी कायदा काय सांगतो, जलनीती म्हणून आपण आज किती मागास विचार करतो आहोत; तसेच एक ना एक दिवस पाणी हा घटनेतील मूलभूत हक्कांमध्ये जाणारा विषय आहे, हे त्यांचे प्रतिपादन ऐकून त्या बालवयात या कल्पना रम्य, गूढ वाटणे याव्यतिरिक्त अन्य काही होणे अशक्य होते, पण ग्लोबल वॉटर पार्टनरशिपच्या बैठकीत वसुधा पांगारेद्वारा हाच विचार सध्या जगभर मांडला जात आहे; आणि हा विचार कैक वर्षांपूर्वी मांडणारे आपले गुरुजी किती दूरचा विचार करीत होते, हे सांगितल्यानंतर खरोखरीच हा माणूस काळाच्या फारच पुढचा विचार करीत असल्याने सर्वसामान्यांना पचला नाही, अशा निष्कर्षाप्रत येऊन पोहोचणे अपरिहार्य आहे. सामाजिक काम करायची तर त्यासाठी लोकांशी नाळ जुडणे महत्वाचे आहे. त्यासाठी गावागावांतून आरोग्य व युवक संघटन या विषयांकरिता हिंडताना प्रकर्षाने जाणवले की पाण्याची समस्या हीच सर्व ग्रामीण दारिद्याच्या मुळाशी आहे आणि विलासरावच या कोरडवाहू तसेच मर्यादित सिंचनक्षमतेच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना मार्ग दाखवू शकतात, याची खात्री झाली. यामधूनच प्रत्येक गावात सर्वप्रथम पाण्याच्या समस्येचे निराकरण व मगच पुढील कार्यक्रम, हे समीकरण बनले. याच कालावधीत शेतकऱ्यांचे पुढारी शरद जोशी तसेच अन्य शेती अर्थविषयक तज्ज्ञ व दांडेकरांसारखे प्रकांड पांडित्य असलेले अर्थतज्ज्ञ यांच्याशी विविध प्रसंगी चर्चा करण्याची संधी उपलब्ध झाली. शरद जोशींच्या स्वभावाप्रमाणे अर्थातच त्यांनी माणशी अर्धा एकर पाणी वगैरे समाजवादी कल्पनांनी शेतकऱ्याला काहीही मिळणार नाही. याउलट त्याला गरिबी वाटून कशी घ्यावी, याचे तत्त्वज्ञान आपण शिकवल्यासारखे होईल इत्यादी हेटाळणीवजा युक्तिवाद केले; तर दांडेकरांनी थोडे विचकत पण असाच काहीसा सूर लावला. एकूणातच अर्थशास्त्र कशाशी खातात; आणि त्यातून ग्रामीण अर्थरचना वगैरे प्रश्नावर ह्या मंडळींसमोर आपली काय टाप, या भावनेतून गप्प राहणेच योग्य आहे असे ठरवले. पण विलासरावांनी यावरही विचार नक्कीच केला असणार तरी यावर त्यांच्याशीच चर्चा होणे आवश्यक आहे, असे कुठेतरी वाटतच राहिले.

 

कोरडवाहू शेतकऱ्यास संजीवनी

 

एका गावातील प्रयोगाने काही लोकांनी महाराष्ट्रातील- नव्हे देशातील- सहा लाख खेड्यांना उत्तर शोधल्याचे दावे केले. पण विलासराव मात्र मांडलेले सूत्र ठराविक एका सॅम्पल साईजच्या खेड्यांवरती अंमलबजावणी झाल्याखेरीज सार्वत्रिकीकरण करत नसत. हे त्यांच्या १०० हून अधिक विविध उपसा जलसिंचन योजनांच्या अभ्यासपूर्वक केलेल्या प्रयोगांतून लक्षात आले. काही तत्त्वे ही फार तर सर्व प्रयोगांमध्ये उपयोगी ठरतात, म्हणून तोच प्रयोग सार्वत्रिक कार्याचा मोह कधीही त्यांना झाला नाही आणि म्हणूनच त्यांची पाणी वाटपाची कल्पना कोणत्याही एका क्षेत्रापुरती मर्यादित न राहता खरोखरीच महाराष्ट्रातल्या कोरडवाहू शेतकऱ्याला संजीवनी ठरली. पाण्याची गावपातळीवर अशा प्रकारची चर्चा करणारा हा द्रष्टा पाणी पंचायत' या संकल्पनेचा प्रणेता म्हणून देशात नव्हे तर अवध्या विश्वात ओळखला जाऊ लागला. आणि पाण्याच्या रेशनिंगच्या सिद्धांताने पु.ल.देशपांडे यांसारख्या लेखकालाही त्यांनी डिवचल्यावाचून सोडले नाही. याचाच परिपाक म्हणून पुलंनी महाराष्ट्र टाइम्समध्ये माणशी अर्धा एकर पाणी: एक विलक्षण कल्पना' हा लेख लिहिला. स्वयंसेवी क्षेत्रातील कामावरती जेवढा दृढ विश्वास विलासरावांचा होता, त्याचबरोबर राजकीय इच्छाशक्तीशिवाय धोरणात्मक बदल घडणे केवळ अशक्य आहे, या भावनेपोटी विलासरावांनी १९८४  साली स्वतः आमदारकीची निवडणूक लढवली, पण ते पराभूत झाले. विलासरावांना निवडून जाऊन सत्तेचे राजकारण न करता विषयांवर आधारित दबावगट निर्माण करायचे होते, हे त्यांना कळलेच नाही. किंबहुना पाणीपंचायतच्या संकल्पनेलाच थोड़ासा सेटबॅक मिळाला, अशाही निर्णयाप्रत येणे गैर ठरणार नाही. परवा परवा म्हणजे सहा महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये अरुण शौरी हे प्रशासकीय सुधारणा या विषयाचे मंत्री असताना त्यांनी 'Ideas that have worked' या व्याख्यानमालेत शेवटचे पुष्प विलासरावांना गुंफण्यास सांगून पाणी पंचायतीच्या संकल्पनेचा एकप्रकारे गौरवच केला.

 

नावीन्य कार्यशैली

 

विलासराव साळुंखे यांनी ग्रामीण विकास संस्था परिषदेच्या खिरोदा येथील जळगाव जिल्ह्यातील मधुकरराव चौधरीं समवेतच्या बैठकीपासून बाळासाहेब विखे यांनी आयोजित केलेल्या प्रवरानगरच्या पाणी परिषदेपर्यंत प्रत्येक वेळी नवीन माहिती समाजापुढे  सादर करत आणि दर काही महिन्यांनी विलासराव नवीन प्रयोगाचे सूतोवाच करायचे. आपल्याच कामाचे तुणतुणे वाजवत बसणे हे तर दूरच; पण लोकांनी कोणी कोणी त्यांची स्तुती केली आहे  हे सांगणेही त्यांनी कधी आपणहून केले नाही. प्लॅनिंग कमिशनपासून ते प्रेसिडेंटपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, तर सरपंचापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत राज्यामध्ये त्यांना मिळालेली शाबासकी, ही खरे तर फार मोठी आणि मोलाची आहे. पाणी पंचायत हीच संकल्पना खऱ्या अर्थाने पाणी वापरा बाबत प्रत्येक ग्रामीण भागात हा विचार पोहचला. जलक्षेत्रात काम करत असतांना सर्व ठिकाणी एकाच पद्धतीचे काम होऊ शकणार नाही हे त्यांच्या कामातून दिसून येत होते. त्यामुळेच काय जेष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी विलासरावांवर भगीरथाचे वारस ही उपाधी दिली त्यावर पुस्तक प्रकाशित झाले. भगीरथाने गंगा जमिनीवर आणली आणि सर्व परिसर सुजलाम सुफलाम झाला. कदाचित हाच वारसा विलासराव यांनी परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावलेलं आपण सर्वांनी बघितले. त्यामुळे त्यांनी हे काही काम आयुष्यात केले त्यामध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण करण्याचे प्रयत्न केले. त्यांची हीच कार्यशैली खऱ्या अर्थाने आजच्या नवीन कार्यकर्ताना बळ काम करण्यास मिळावे. सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना खऱ्या अर्थाने कायद्यात्म्क व धोरणात्मक बदल करायचा असेल तर प्रवाहा बाहेर राहून ते करणे शक्य नसते यांची जाणीव त्यांना असावी यासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न कर्ला असावा पण राजकीय क्षेत्रात सामजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना जनता कुठे स्थान देते हा प्रश्न खऱ्या अर्थाने विचार करावा वाटतो.

 

आज पाणी प्रश्न बिकट होत असतांना जलक्षेत्रात तथाकथित जलतज्ञाचं जाहीर प्रकटीकरण होतांना दिसते. पाणी पश्न बाजूला राहून उत्सव साजरे होऊ लागले. मुलभूत संकल्पना रसतळाला लावून उत्साहीकरणातून पाणी प्रश्न सुटणार असे आता वाटू लागले. समजतील जलतज्ञ आणि जलअभ्यासक यामध्ये खूप फरक आहे. आज मात्र जलअभ्यासक हे जलतज्ञ म्हणून काम करु लागले. खर तर विलासराव साळुंखे यांनी दिलेला प्राथमिक विचारावर पुन्हा नव्याने मांडणी करून समाजात लोकांपर्यत पोहचणे गरजेचे आहे.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

राष्ट्रीय व राज्य समन्वयक – सहज जलबोध अभियान

चलभाषा – ९०९६२१०६६९