मनात आलेले ते लिहित राहावे. आपले विचार स्वता पुरते मर्यादित न ठेवता इतरांन पर्यत पोहचाण्यासाठी नुसते विचार करून उपयोग नाही तर ते लिहिले देखील पाहिजे. समाजकार्य क्षेत्रात काम करतांना बऱ्याच गोष्टी लक्षात येतात आणि ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आपण नक्की वाचावे आणि आपले मत मांडावी.
Tuesday, December 27, 2022
शेतकऱ्यांच्या जिवावर सरकार उदार!
Thursday, November 10, 2022
स्त्रियांचे समाजातील स्थान
Wednesday, October 19, 2022
कृषीप्रदान देशात भूकबळी : देश १०७ क्रमांकवर
ग्लोबल
हंगर इंडेक्स २०२२ मध्ये भारताची सहा स्थानांनी घसरण झाली आहे. एकूण १२१ देशांपैकी
भारत १०७ व्या क्रमांकावर आला आहे. विशेष म्हणजे पाक,
श्रीलंका व नेपाळ ही शेजारी राष्ट्रे आपल्या पुढे आहेत.
Global
Hunger Index 2022 : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची घसरण लगातार
सुरुच असताना आता जागतिक पातळीवर भारतासाठी आणखी एक थोडी चिंता वाढवणारी बातमी आली
आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ मध्ये भारताची सहा स्थानांनी घसरण झाली आहे. एकूण
१२१ देशांपैकी भारत १०७ व्या क्रमांकावर आला आहे. जागतिक यादीत दक्षिण आशियाई
देशांपैकी भारत केवळ अफगाणिस्तानपेक्षा पुढे आहे. आर्थिक संकट आणि उपासमारीचा
सामना करत असलेले पाकिस्तान आणि आर्थिक आणीबाणी जाहीर झालेला श्रीलंका देशही
भारताच्या तुलनेत चांगल्या परिस्थितीत आहेत.
जागतिक
भूक निर्देशांक यादीमध्ये भारताची १०१ व्या क्रमांकावरून १०७ व्या क्रमांकावर घसरण
झाली आहे. आर्थिक दिवाळखोरीत आलेला पाकिस्तान, श्रीलंका व
नेपाळ यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट
झालं आहे.
२०२१
मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारत या यादीत १०१ व्या स्थानावर होता. हे
स्थानदेखील भारतातील भूकेसंदर्भातली गंभीर परिस्थिती विशद करण्यासाठी पुरेसं होतं.
मात्र, यावर्षीच्या आकडेवारीनुसार
त्यामध्ये आणखीन सहा अंकांची घसरण झाली आहे. १२१ देशांमध्ये आता भारत १०७ व्या
स्थानावर आहे. भारताच्या आधी नेपाळ (८१), पाकिस्तान (९९),
श्रीलंका (६४) आणि बांगलादेश (८४) या शेजारी देशांची क्रमवारी आहे.
जागतिक
भूक निर्देशांक यादी तयार करण्यासाठी प्रामुख्याने चार महत्त्वाचे निकष आधारभूत
मानले जातात. यामध्ये कुपोषण, पाच वर्षांच्या
खालील मुलांना त्यांच्या उंचीच्या तुलनेत किती कमी आहार मिळतो, पाच वर्षांच्या खालील किती मुलांची त्यांच्या वयाच्या तुलनेत उंची कमी आहे
आणि दरहजारी आकड्यामागे पाच वर्षांखालील किती मुलं दगावतात या निकषांच्या आधारे
जागतिक भूक निर्देशांकाची मांडणी केली जाते. दरम्यान, या
यादीमध्ये सर्वात तळाला म्हणजेच १२१व्या स्थानी येमेन हा देश आहे. तर सर्वात वर
असणाऱ्या देशांमध्ये चीन आणि कुवेत या आशियायी देशांचा समावेश आहे. युरोप खंडातील
देशांचा यादीत वरच्या स्थानी क्रमांक लागला आहे.
ब्रिटिश काळापासून असलेली अन्नधान्याच्या वितरणाची सरकारी व्यवस्था, ही जागतिकीकरणोत्तर
संगणक युगातही गरजेची आहेच. त्याआधी १९९० च्या
दशकापर्यंत या व्यवस्थेवर टीका होत राहिली, पण हीच व्यवस्था
लोकांना साभूत ठरली. कृषी प्रधान देशात भूक
निर्देशांक मध्ये भारत १०७ क्रमांक वर हि शोकांतिका म्हणावी लागते.
नृपाय बुभुक्षिताया: प्रजाया: मृत्यु
महत्पापं वर्तते (चाणक्य नीती दर्पण)
‘राजाचा सगळ्यात मोठा, जघन्य अपराध कुठला, तर त्याच्या प्रजेचा भूकबळी/
अन्नावाचून मृत्यू!’’ आज
भारता मधल्या अन्नसुरक्षा आणि त्यावरच्या प्रशासकीय प्रयोगांची चर्चा आपण करणार
आहोत. लहानपणी आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी रेशन दुकानांच्या रांगांमध्ये उभे
राहण्याचे अहोभाग्य प्राप्त केलेले असेल. या रेशन दुकानांची सुरुवात सगळ्यात प्रथम
मुंबईमध्ये १९३९ सालात झाली. दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांच्या झालेल्या आर्थिक
आणि प्रशासकीय वाताहतीचा परिणाम होता,
की अशी एखादी व्यवस्था तयार करणे त्यांना क्रमप्राप्त होते.
त्याचबरोबर या देशामध्ये निरंतर येणाऱ्या दुष्काळाचा सामना करण्यासाठीची ताकद
प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आणण्याची नितांत गरज तत्कालीन प्रशासनाला वाटली. इंग्रज
व्यवस्थेचा डोलारा दुसऱ्या महायुद्धानंतर कोसळत चालला होता. पण त्यांना भारताची
त्यांच्या साम्राज्यामध्ये राहण्याची गरजही होती. त्यामुळे इथली व्यवस्था पुन्हा
सुदृढ व्हावी आणि आपलं भारतीयांवरचे नियंत्रण अबाधित राहावे यासाठी त्यांनी या
व्यवस्थेची पुनर्रचना केली. १९४३च्या सुमारास या रेशन दुकानांची वाढ १३ शहरांमध्ये
केली गेली. भारतातल्या काही दुष्काळग्रस्त गावांमध्ये आणि ७७१ शहरांमध्ये ही
व्यवस्था पोहचायला १९४६ साल उजाडले. दुसऱ्या महायुद्धानंतर बऱ्याचशा देशांमध्ये
रेशन दुकानांची व्यवस्था बंद करण्यात आली, पण भारतामध्ये
मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या व्यवस्थेला सुदृढ करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर
आलेल्या अनेक दुष्काळांवर मात करण्याची ताकद या पीडीएस (पब्लिक डिस्ट्रिब्युशन
सिस्टीम) प्रणालीने स्वतंत्र भारताला करून दिली. सार्वजनिक वितरण व्यवस्था
(पीडीएस) ही पहिल्या नियोजन आयोगाची १९५१ची महत्त्वाची जबाबदारी ठरली. स्वतंत्र
भारताने स्वप्न बाळगलेल्या ‘सर्वसमान न्यायासहित विकासाची
नीती’ सिद्धांतामध्ये वितरण व्यवस्थेला अग्रगण्य स्थान होते. १९५० आणि १९६०च्या दशकामध्ये प्रशासनाची
अन्नधान्य व्यवस्थापन ही ‘टॉप अजेंडा’ची गोष्ट होती. सार्वजनिक वितरण व्यवस्था
सुरू झाली पण ही शहरांच्या केंद्रित व्यवस्था होती. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये
गावांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा हा पाचवीला पुजलेला होता. त्यावर उपाययोजना करणे
महत्त्वाचे होते. पहिल्या योजनेच्या शेवटी भारतामध्ये अन्नधान्याची साठवण ६३
दशलक्ष टनांच्या वर पोहचली होती. पण १९५८च्या आसपास अन्नधान्य उत्पादनामध्ये
पुन्हा तूट आल्यामुळे पीडीएसच्या सक्षमीकरणाची गरज भासू लागली. या वेळी नुसते
अन्नधान्य नाही तर साखर आणि रॉकेल, कोळसा यांसारख्या
महत्त्वाच्या घटकांची, ज्यांची साठवणूक आणि काळाबाजारी सुरू
झाली होती, अशांना रेशन वितरण व्यवस्थेमध्ये सामील करण्यात आले.
रेशन दुकानांची संख्या १९५७ पासून ते १९६१ पर्यंत पाच लाखांवर पोहचली आणि याचा
फायदा दुष्काळामध्ये अन्नधान्याच्या उपलब्धतेवर झाला.
या अन्नधान्याच्या साठवणूक आणि वाहतुकीसाठी तथा
याच्या सुयोग्य मॅनेजमेंटसाठी भारतीय अन्न महामंडळाची स्थापना १९६५ मध्ये झाली. त्याचबरोबर
अॅग्रिकल्चर प्राईसेस कमिशनचीही स्थापना १९६५ मध्ये करण्यात आली. या सगळ्यांना
मदत करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायदाही अस्तित्वात होता. जो काळाबाजारी किंवा
साठेबाज यांना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण सिद्ध होत होता. या वितरण प्रणालीमध्ये
तीन महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर काम होत होते.
१) समाजातील तळागाळातील लोकांना अन्नधान्य
आणि महत्त्वाची खाद्य सुरक्षा पोहचणे.
२) मुक्त बाजारातील धान्यांच्या भावांवर
नियंत्रण ठेवणे. (या वितरणप्रणालीमुळे सरप्लस उत्पादनाचा मोठा हिस्सा सरकार स्वत:च
विकत घेत होते. प्रत्यक्षात मात्र हे धान्य सरकारी गोदाम मध्ये सडलेले दिसते.
३) वितरणप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा आणि घटनात्मक
मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे.
या व्यवस्थांचे महत्त्व प्रगतिशील
भारतामध्ये होते. १९८७ मध्ये आणि त्याआधी १९७२ मध्ये आलेल्या प्रचंड दुष्काळामध्ये
झालेली मनुष्यहानी आणि भूकबळींची संख्याही,
या व्यवस्थेच्या आधीच्या दुष्काळामध्ये होणाऱ्या भूकबळींच्या
संख्येच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी आहे. पीडीएस प्रणालीमुळे या दुष्काळांमध्ये देखील
भारत स्वत:ची प्रतिष्ठा आणि कार्यक्षमता कायम ठेवू शकला. न्युट्रिशन असेसमेंट अँड
अॅनालिसिस (एनआयएन, मार्च-१९९२) च्या अहवालानुसार १९८७च्या
विक्राळ दुष्काळामध्येसुद्धा भुकेची भेदकता आणि त्याचे दुष्परिणाम सामान्यजनांवर
कमी प्रमाणात झाले. हे
सगळे चांगले-चांगले चित्र झाले. पण या
व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे सामान्य जनता आणि तिला अगदी सगळे
पदरामध्ये पडले आणि प्रशासनाने सर्वोत्तम काम केले म्हणून आपली पाठ थोपटणे हे
योग्य नाही. सार्वजनिक वितरण प्रणालीतला भ्रष्टाचार जग जाहीर आहे. अन्न
महामंडळाच्या खरेदी-विक्री प्रणाली मध्ये काही दोष फार घातक आहेत. जागतिक बँकेने
प्रसृत केलेला अहवाल सांगतो की, अन्न महामंडळामध्ये साठवण आणि वाहतुकीमध्ये होणारी नासाडी फार आहे. अन्न
महामंडळाबरोबरच राज्यांनी स्थापन केलेल्या कृषी भंडारण आणि इतर
व्यवस्थांमध्येदेखील हाच मुद्दा समोर येतो. आपण दर वर्षी वाचतो, ऐकतो की अमुक ठिकाणी इतका गहू सडला, तमुक ठिकाणी
भंडारणाची व्यवस्था नसल्यामुळे इतक्या अन्नधान्याची पावसामुळे नासाडी झाली.
भारतामध्ये गव्हाची खरेदी पंजाब, हरियाणा, म.प्र., उ.प्र., राजस्थानमध्ये
होते. त्याच्या भंडारणाची तितकीशी व्यवस्था केलेली नाही. तीच स्थिती तांदूळ
उत्पादक राज्यांची आहे. पीडीएस व्यवस्था लागू करताना आपण प्रगतिशील राष्ट्र होतो,
आता आपण कुठल्याही दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी सक्षम असणाऱ्या
अन्नधान्याच्या साठय़ावर बसलेलो आहोत. पण त्याच्या साठवणुकीमध्ये आणि हाताळणीमध्ये
हालगर्जीपणा करणे चुकीचे आहे. आजच्या घडीला अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात यायच्या आधी
आपण अंत्योदय अन्न योजना चालवत होतो,
जो टीपीडीएस (टार्गेटेड पीडीएस) चा भाग होता. यामध्ये अत्यंत गरीब
अशा परिवारांना अत्यंत स्वस्त दरामध्ये दोन रु. प्रति किलो गहूसारखी योजना सरकार
राबवते. हा घटक या योजनेमध्येही एनएफएसएपुढे घेण्यात आलेला आहे. याचबरोबर उरलेल्या
परिवारांचे बीपीएल (दारिद्रय़रेषेखाली) आणि एपीएल (अबाव्ह पॉव्हर्टी लाइन-
दारिद्रय़रेषेवरील) परिवार अशी विभागणी करण्यात आलेली आहे. गरिबीरेषेखालील
परिवारांना स्वस्ता मध्ये धान्य उपलब्ध करून देण्यात येते, तर
एपीएलसाठी बाजारभावानुसार धान्याची/ इतर घटकांची वितरण व्यवस्था आहे. खाद्य सुरक्षा कायद्यानुसार आता सरकारला
बंधनकारक आहे, की
सामान्य जनतेला न्युट्रिशन आणि अन्नधान्याचा अधिकार देणे आणि त्याचबरोबर त्याचे
वाटप करणे. साधारणत: १.३२ लाख कोटी रुपयांचे वार्षिक बजेट असणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी
हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण यामध्ये चांगल्या योजना आणल्या जातात पण त्याची
अंमलबजावणी हा आपला कमकुवत दुवा आहे. या योजनांसाठी लागणारी साठवणूक, या व्यवस्थेमध्ये ई गव्हर्नन्सचा कसा वापर होणार आहे, या सारख्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. भारतामध्ये सगळ्यात पारदर्शक आणि कार्यक्षम असे
सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे उदाहरण आहे छत्तीसगढ राज्य. छत्तीसगढने ई-गव्हर्नन्स
आणि माहिती-तंत्रज्ञानाधारित सेवा वापरून सगळ्यात महत्त्वाच्या पण दुर्लक्षित अशा
वितरण व्यवस्थेला कसे सक्षम बनवले, याची चर्चा आपण करणार आहोत. आजच्या घडीला देशभरामध्ये ५० लाखांवर रेशन
दुकाने आहेत आणि १२० कोटींवर जनता आहे. अन्न, वस्त्र आणि
निवारा या तीन मूलभूत हक्कांपैकी अन्नाची गरज कशी भागवावी आणि पारदर्शी पद्धतीने,
भ्रष्टाचार निर्मूलन करून वितरण व्यवस्था सामान्य जनांपर्यंत कशी
पोहचवावी हा प्रश्न आज देखील अनेक पुढे आहे.
गरिबी निर्मलन ७५ वर्ष होऊन
गेले तरी आज आमच्या देश अन्न नसल्याने लोकांचे जीव जातात. हि परिस्थिती लोकांच्या
कल्याण करण्याच्या उद्देशाने आजवर झालेल्या व्यवस्थेतील लाभदायक घटक यांचे मोठ्या
प्रमाणावर कल्याण झाले. गरिबांना धान्य देण्याबाबत विरोध मुळीच नाही. जर द्याचे
असेल तर त्यासाठी “डिजिटल रेशन कार्ड” त्यात त्यांना जिथून वाटेल तेथून
धान्य खरेदी करतील. यामुळे शेतकरी बांधवा कडून सरकार माल खरेदी करण्यासाठी
हस्तक्षेप करणार नाही. गरिबांना महिन्याला धान्य देण्यात येणारे पैसे हे डिजिटल
रेशन कार्ड मध्ये सरकारने टाकावे. यामध्ये योग्य लाभार्थी योजनेचा घटक बनेल. तसेच
योजनेचा गैरफायदा देखील कोणी घेणार नाही. ज्यांना आज अन्न – धान्य नसल्याने जीव
गमवावा लागतो आहे. ती परिस्थिती निर्माण होणार नाही.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९९६२१०६६९
Wednesday, July 27, 2022
समाजमन दूषित का होतय ...
समाजमन दूषित का होतय ...
महाराष्ट्रात मराठी संतांनी
समाजमनाची जी काही शतके मशागत केली, त्यामुळे शिवाजी महाराजांसारख्या युगकर्त्यां अलौकिक
राज्यकर्त्यांला त्याच्या विचारांचा समजून स्वीकार करणारा समाज अनायासे मिळाला.
म्हणजे शिवाजी महाराजांचा अवतार होईपर्यंत संतांनी आचार-विचार, स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व आदी
गुणांचे पाठ तत्कालीन समाजाकडून गिरवून घेतले होते. व्यक्तिगत आणि सामाजिक
संकटांच्या प्रसंगांतून निभावून नेण्यासाठी कसे वागावे, हे सांगणारे संत हे ‘विचारवंत’ या संज्ञेस पात्र होते.
इंग्रजांच्या उदयानंतर समाजात सुरू झालेल्या विचारमंथनात ज्ञानोपासकांपासून
समाजहितचिंतकांपर्यंत आणि वैचारिक क्रांती घडवून आणणाऱ्या विभूतींपासून क्रियाशील
विचारवंतांपर्यंत कित्येक समाजधुरिणांनी अवघा महाराष्ट्र ढवळून काढला होता. यांत
काळाच्या पुढचा विचार करणारे होते, काळाबरोबर धावणारे होते, तसेच पुरोगामित्वाच्या फाजील उत्साहाच्या भरात नव्या
सामाजिक समस्या निर्माण करण्याचे अतिसाहस दाखविणाऱ्यांना लगाम लावणारेही होते.
साहजिकच समाज प्रबोधनाच्या मार्गावर वाटचाल करू लागला होता. व्यक्तिगत तसेच
सार्वजनिक चारित्र्य आणि सामाजिक सामीलकी यांचे नवे आणि नवी उंची गाठणारे आयाम
ठरवू लागला होता. पण कुठेतरी माशी शिंकली आणि प्रगतिपथावर असलेला आपला समाज ‘यू टर्न’ घेऊन उलटी पावले टाकू लागला.
सामाजिक सुधारणांच्या बाबतीत ज्या महाराष्ट्राचे नेतृत्व अख्ख्या देशाने मानले
होते, तोच महाराष्ट्र सामाजिकदृष्टय़ा
प्रगती खुंटलेल्या अन्य राज्यांसारखा झाला. वैचारिकतेची आणि विवेकाची साथ
सोडल्याने महाराष्ट्रात बरेच अनर्थ घडले. याची सर्वाधिक जबाबदारी स्वातंत्र्योत्तर
काळातील विचारवंतांवर येते, यात शंका
नाही.
अल्पकालिक राजकीय लाभासाठी पुढच्या कित्येक पिढय़ांच्या
भवितव्याचे नुकसान करणारे मोठे राजकीय नेते, स्वार्थासाठी आणि संपत्तीसंचयासाठी राजकीय तशीच
व्यक्तिगत निष्ठा बदलण्यास मागेपुढे न पाहणारे लहान नेते आणि ‘विचारवंत’ हे बिरुद दिमाखाने मिरवणारी, पण कोणत्याही प्रकारचे सामाजिक
दायित्व न मानणारी साहित्य, कला आणि डॉक्टरी, वकिली पेशांतील मंडळी
महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहेत की मागे, असा प्रश्न आज कोणाही सुबुद्धाला पडेल. समाज जसजसा
सुशिक्षित होईल, तसतसा तो अधिक विचारी, अधिक विवेकी, विनयशील आणि सुसंस्कारित होईल, असा पूर्वीच्या समाजधुरिणांचा
जो कयास होता तो महाराष्ट्राने खोटा पाडला आहे. महाराष्ट्रात जो पैसा येऊ लागला आहे, तो उन्मत्त आणि उर्मट
प्रवृत्तीलाच खतपाणी घालू लागला आहे. आपला समाज उघडपणे असभ्य भाषा आणि हिंसा यांचे
समर्थन करू लागला आहे. नागरिकशास्त्राचे साधे साधे पाठ विसरू लागला आहे. कायदा
बंधनकारक वाटू लागल्याने तो मोडण्याकडे त्याची प्रवृत्ती होऊ लागली आहे. याचा अर्थ मराठी
संतांनी मराठी समाजाच्या मनाची जी मशागत केली होती, ती पार धुपली गेली आहे. मराठी समाजसुधारकांनी
महाराष्ट्रात सुधारणांची जी रोपटी लावली होती, ती आर्थिक मस्तीच्या प्रखर उन्हात जळून खाक झाली आहेत.
एकेक करून जुन्या-जाणत्या समाजसुधारकांना समाजाने हरवले आहे. त्या प्रत्येकाचे नाव
हरघडी घेत त्यांच्या विचारांना मात्र समाजाने पराभूत केले आहे. समाजसुधारक
विचारवंतांच्या बोलण्यातील लाभांश तेवढा उचलावयाचा आणि शहाणपणाचे बोल तेवढे
टाळावयाचे, या सामाजिक सवयीतून झुंडशाही
प्रवृत्ती वाढू लागली आहे. जनसामान्यांच्या मनात राग, लोभ, मत्सर, हिंसा आदी रिपू विषाप्रमाणे
कालवण्याचेच काम अनेकांनी जाणते-अजाणतेपणाने पूर्णत्वाला नेले आहे किंवा आरंभिले
आहे, आणि अनुयायांना त्वरित लाभाच्या
अपेक्षेने आंधळे केले आहे. एखादा ‘जाणता राजा’ म्हणविला जाणारा मोठा नेता आपल्या अनुयायांच्या
भ्रष्टाचाराचे समर्थन करतो, त्या अनुयायांच्या
भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करतो तसेच इतरांनीही दुर्लक्ष करावे अशी अपेक्षा करतो, तेव्हा पक्षीय राजकारणाने
त्याला किती असंवेदनक्षम केले आहे याचेच प्रत्यंतर येते. विवेकाचे भान सुटल्याचेच
हे लक्षण. वास्तविक यासंबंधात समाजातील विचारवंतांनी आवाज उठवून जनसामान्यांचे
प्रबोधन करणे गरजेचे होते, आणि आजही आहे. पण विचारवंतांचे
पेव फुटलेल्या आजच्या महाराष्ट्रात विचारवंतांचा दराराच उरलेला नाही. विचारवंत हे
राज्यकर्त्यांच्या तर खिजगणतीतही नाहीत. विचारवंतांनी आपण होऊन आपली ही गत करून
ठेवली आहे. ते राज्यकर्त्यांच्या भजनी तरी लागले आहेत, अन्यथा भीरुतेचे बळी तरी ठरले
आहेत.
राज्यकर्ते हे सत्ता टिकवण्यासाठी मतलबी व्यवहार करणार, हे उघड आहे. शासन प्रत्येक
क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्याची नामी शक्कल लढवत भरमसाट पुरस्कार देऊन
विचारक्षम व्यक्तींना अंकित करण्याचा प्रयत्न करत असते. असे प्रोत्साहन देण्याचे
निमित्त असते; पण पुरस्कारासाठी अर्ज वा
विनंतीपत्र अत्यावश्यक ठरविल्यामुळे त्यांच्या विचाराच्या नांग्या ठेचण्याचेच
राज्यकर्त्यांच्या मनात असते, हे उघड दिसते. पण त्यामुळे सरकारदरबारचे याचक यापलीकडे साहित्यिक, कलावंत, क्रीडापटू यांना किंमत उरत
नाही. डॉक्टर-वकील यांनी आपला समाजाचे नेतृत्व करण्याचा बाणा तर केव्हाच सोडून
दिला आहे. मग तटस्थ समाजहितचिंतकांचा विरोधी आवाज दाबायला कितीसा वेळ लागणार? स्वार्थी राजकारणी, मतलबी नवश्रीमंत आणि हतबल जनता
स्वतंत्र विचार करू शकत नाही. हे सारे फक्त विकारांच्या आहारी जाऊ शकतात. त्यांना
वास्तविक तटस्थ, निर्मोही आणि निर्भीड
विचारवंतांनी मार्ग दाखवायचा असतो. विचारवंतही तटस्थ राहिले नाहीत, तेही मोहात गुरफटले तर समाजाला
कोण तारणार? आज अवघ्या महाराष्ट्राला
वैचारिकतेचे वावडे निर्माण झाले आहे आणि नीतिमत्ता, चारित्र्य, सदसद्विवेक यांचा छुपा किंवा क्वचित कोठे उघड तिरस्कार
वाटू लागला आहे, याचे मूळ विचारक्षम आणि
विचारवंत यांच्याकडे पाहण्याच्या समाजाच्या आणि राज्यकर्त्यांच्या बदललेल्या
दृष्टिकोनात आहे. समाजातील विचारवंतांचा उपमर्द करण्याची आवश्यकता नसते, हे प्रगल्भ राज्यकर्तेच जाणू
शकतात. असे होणे हा संतांचा जसा पराभव आहे, तसाच तो प्रबोधन-पर्वातील विचारवंतांचा पराभव आहे. परत
माघारीची पावले चालू लागलेला महाराष्ट्र पुन्हा १८१८ कडे वाटचाल करत आहे की काय, असे वाटण्याजोगी भयावह
परिस्थिती आहे. पण तसे मानायला राज्यकर्त्यांपासून तथाकथित विचारक्षम
व्यक्तींपर्यंत कोणीही तयार नाहीत. ढोंगाचा आधार घेतला की सारे कसे छान छान
दिसायला लागते.
गेल्या साठेक वर्षांत आपल्या समाजात ‘समते’च्या- म्हणजे उपेक्षितांना
सामाजिक न्याय मिळवून द्यायच्या एकमेव विचाराव्यतिरिक्त इतर सामाजिक प्रगतीचा वा
अभिसरणाचा कोणताही नवा विचार पुढे गेलेला नाही.. मग तो संस्कृतीविचार असो वा
धर्मविचार! दलित साहित्यविचाराचा अपवाद वगळता नवा साहित्यविचार वा आधुनिक कलाविचार
विकसित झालेला नाही, हे कटू सत्यही स्वीकारावे
लागते. सामाजिक न्यायाचा विचार प्राधान्यक्रमाने होणे हे अत्यावश्यकच होते आणि
आजही आहे. उपेक्षितांवर अन्याय होत असताना कोणत्याही प्रकारच्या अन्य प्रगतीचा
विचारही अयोग्य ठरला असता. पण ‘सामाजिक न्याय’ ही बदलती संकल्पना आहे. आजचा न्याय हा उद्याचा अन्याय ठरू शकतो.
जसा कालचा न्याय हा आज अन्याय ठरला आहे. सामाजिक बदलाच्या बाबतीत एकमेकांवरचा
विश्वास आणि शतकानुशतकाचा अन्याय एका निर्णयाने दूर केला जाण्याची घाई ही समाजाला
अंतिमत: घातक ठरू शकते. सबुरीने घेणे, हेच समाजाच्या मानसिकतेत कायमस्वरूपी बदल घडवून आणते, हे समाजाला पटवून देण्यात आपले
विचारवंत कमी पडले, हे नाकारता येईल काय?
अन्य सामाजिक क्षेत्रांच्या बाबतीतसुद्धा प्रागतिक
विचारांची कास धरणे कमी महत्त्वाचे नव्हते. केवळ बाहूंत किंवा केवळ पायांत
सामर्थ्य येऊन चालेल का? केवळ मेंदू तल्लख राहून फायदा
होईल का? केवळ छाती-पोट नीट असण्याने
शरीर तंदुरुस्त राहील का? शरीराच्या सर्व अवयवांत समसमान
शक्ती येणे महत्त्वाचे असते. समाजरूपी शरीराचेही तसेच आहे. निवडणुकांच्या
गुंतागुंतीत अडकलेल्या राजकारण्यांच्या पचनी हा विचार पडणे शक्य नाही. बरे, त्यांना ते चुकत आहेत, हे सुनावण्याचे धारिष्ट्य
दाखवणारे विचारवंत आजच्या आपल्या समाजात नाहीत. आणि त्यांनी सांगितले तरी ते
ऐकण्याच्या मन:स्थितीत राज्यकर्ते नाहीत. म्हणूनच तर त्याच त्या गटांगळ्या खात, डुबक्या घेत समाजाचे मार्गक्रमण
चालले आहे. तेही चुकीच्या मार्गावर!
प्रत्येक क्षेत्राचे आपले
म्हणून एक नीतिशास्त्र असते, तत्त्वज्ञान असते. ते प्रगतिपथावर न्यावयाचे काम त्या- त्या
क्षेत्रातील विचारवंत करत असतात. प्रत्येक नवविचार हा व्यवहार्य किंवा अमलात
आणण्यासारखा असतोच असे नाही. पण म्हणून विचारप्रक्रिया थांबून कसे चालेल? ‘सुधारक’कार आगरकरांनी ‘विचारसंघर्षांला का भिता?’ असा सवाल केला होता. आज ‘वाद नको’ अशी बहुतेकांची भूमिका आहे आणि
मांडवली करून प्रश्न सोडविण्याकडे कल आहे. आज आपल्याकडे विचारसंघर्ष होत नाहीत.
होतात ते ‘चक्का-जाम’, ‘रास्ता रोको’ किंवा ‘खळ्ळ खटय़ाक’! ‘ही विकारवशता झाली; विवेकाची कृती नव्हे,’ हे निक्षून सांगणारे विचारवंत
कुठे लपून बसले आहेत? हे सुदृढ समाजाचे लक्षण नाही.
आज विचारवंत म्हणवले जाणारे भरमसाट वाढले आहेत.
त्यातही सांस्कृतिक अप्रगल्भतेच्या ज्या पायरीवर आपण उभे आहोत, तेथे विशेषणांची खैरात करण्याची
सवय समाजाला लागली आहे. ‘ज्येष्ठ विचारवंत’, ‘सामाजिक विचारवंत’ अशी विशेषणे सर्रास वापरली जात
आहेत. अमुक अमुक विचारवंताने कोणता नवा विचार महाराष्ट्राला दिला, असे विचारता ९० टक्के
विचारवंतांचे तरी अढळपद डळमळून पडेल. विचारवंतांच्या शब्दांचे वजन कमी होत होत
त्यांची सामाजिक उपयुक्तता संपणे, हा खरे तर समाजाच्या दृष्टीने चिंतेचा विषय असला पाहिजे.
विचारवंतांची लक्षणे कोणती, त्यांची काही वैयक्तिक आणि
सामाजिक जबाबदारी आहे की नाही, वगैरे मोजपट्टय़ा लावल्या तर आज आपल्यात विचारवंत उरले नसल्याचा वा
मूळ प्रवाहातून ते बाहेर फेकले गेल्याचाच निष्कर्ष काढावा लागेल.
शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी संतांनी महाराष्ट्राची
मनोभूमी वैचारिक मशागतीने उत्तमरीत्या नांगरली होती. त्याचा लाभ शिवरायांना झाला.
इंग्रजांच्या उदयानंतर समाजात सुरू झालेल्या विचारमंथनात कित्येक समाजधुरिणांनी
अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. साहजिकच समाज प्रबोधनाच्या मार्गावर वाटचाल करू
लागला होता. व्यक्तिगत तसेच सार्वजनिक चारित्र्य आणि सामाजिक सामीलकी यांचे नवी
उंची गाठणारे आयाम ठरवू लागला होता. पण कुठेतरी माशी शिंकली आणि प्रगतिपथावर
असलेला आपला समाज ‘यू टर्न’ घेऊन उलटी पावले टाकू लागला.
सामाजिक सुधारणांच्या बाबतीत ज्या महाराष्ट्राचे नेतृत्व अख्ख्या देशाने मानले
होते, तोच महाराष्ट्र सामाजिकदृष्टय़ा
प्रगती खुंटलेल्या अन्य राज्यांसारखा झाला. वैचारिकतेची आणि विवेकाची साथ
सोडल्याने महाराष्ट्रात बरेच अनर्थ घडले. याची सर्वाधिक जबाबदारी स्वातंत्र्योत्तर
काळातील विचारवंतांवर येते, यात शंका नाही.
प्रत्येक समाजाची भावनिक उंची आणि वैचारिक उंची असे
समांतर जाणारे दोन प्रवाह असतात. या दोन समांतर प्रवाहांतील अंतर जितके कमी, तितके तो समाज वैचारिकदृष्टय़ा
पक्व, प्रगल्भ, प्रबुद्ध असल्याचे मानता येते.
समाजाने विवेकवादाचा आणि बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार करणे, स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुता, सर्वधर्मसमभाव, परमतसहिष्णुता यांसारख्या
प्रागतिक विचारांना आपलेसे करणे आणि विज्ञानाची कास धरणे. ही समाजाचा वैचारिक स्तर वरचा
असण्याची लक्षणे होत. एका विशिष्ट अर्थाने स्थितिजन्य समाजातील शांततेचा भंग
करणारा विचारवंत हा मुळात समाजहितरक्षक असतो. शांत तळ्याच्या काठावर बसून तो
पाण्यात दगड भिरकावतो. पाण्यावर तरंग उठतात, तसे स्थितिजन्य समाजात विचारांचे तरंग उठतात. नव्या
वैचारिक प्रगतीची ती नांदी असते. हा शांतताभंग समाजाचे विचार ढवळून टाकणारा असतो.
विचारवंताकडून काही अपेक्षा असतात. विचारवंताने सत्याची बाजू लावून धरली पाहिजे.
त्याने नेहमी उपेक्षित वर्गाची कड घेणे अपेक्षित असते. त्याने महत्त्वाच्या
प्रसंगी सामाजिक घटनांवर परखड आणि स्पष्ट शब्दांत भाष्य करणे हे त्याचे कर्तव्य
असते. प्रत्येक वेळी प्रवाहपतित होऊन समाजाच्या मागे जाण्याचे टाळणे अपेक्षित
असते. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्यांकडूनच समाजात बदल होण्याची अपेक्षा करता
येते. तटस्थता हा त्याचा मोठा गुण असतो, तो त्याने सोडता कामा नये. महत्त्वाचे म्हणजे आपल्या
मताची किंमत देण्याची त्याची सदैव तयारी हवी.
ज्या समाजातील विचारवंत आपली
सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी सत्याची कास धरत नाहीत, आपण सत्यवचनी आणि नीतिमान
असल्याचे केवळ भासवतात, पण सर्व प्रकारच्या
भोंदूपणामुळे जे द्विस्तरीय जीवन जगतात; तटस्थता राखण्याचा कसोशीने प्रयत्न करत नाहीत; उपेक्षितांबद्दल नुसताच कळवळा
व्यक्त करतात, पण त्यांचा पक्ष घेऊ न संघर्ष
करण्यास घाबरतात; वेळप्रसंगी सत्ताधाऱ्यांना चार
बोल सुनवायला कचरतात, तो समाज वैचारिकरीत्या खुजाच
राहणार. शासन-पुरस्कृत विचारवंतांची यादी प्रतिवर्षी कितीही मोठी होत राहिली, तरी शासनाच्या व
सत्ताधाऱ्यांच्या मदतीवर ही वाढ अवलंबून असल्यामुळे सामाजिक जबाबदारी पार
पाडण्याची क्षमता त्यांच्याकडे नसणार. विचारवंतांकडे आश्रित म्हणून पाहण्याची
राज्यकर्त्यांची दृष्टी जोवर बदलणार नाही किंवा त्यांच्याकडे उपहासाच्या व
तुच्छतेच्या नजरेने पाहण्याची प्रवृत्ती बदलणार नाही, तोपर्यंत शासनकर्त्यांवर
नीतिमानतेचा अंकुश ठेवण्यात तथाकथित विचारवंत असमर्थच ठरणार आणि दर्जा, प्रमाण, सामाजिक सामीलकी आणि
प्रगतीसारख्या समस्या अनुत्तरितच राहणार. जोपर्यंत समाजालाही केवळ लक्ष्मीचीच
आराधना आणि मनोकामना करण्यातच स्वारस्य असणार, विचारांना आणि विनय, विवेक, परमतसहिष्णुता आदी सामाजिक गुणांचे बंधन मर्दानगीच्या
भ्रामक कल्पनांना कवटाळत पाळले जाणार नाही, तोपर्यंत समाज विचारवंतांना मान देणार नाही. आणि
जोपर्यंत विचारवंतही ‘सत्तेपुढे शहाणपण चालत नाही’ अशा वाक्यांच्या आड आपली भीरुता
लपवत राहणार, तोपर्यंत कोणताही समाज
वैचारिकतेला पारखाच राहणार. वैचारिकता ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, हे न मानणाऱ्या समाजाची
पीछेहाटच होणार. अशा समाजातील प्रगती ही फसवीच राहणार. महाराष्ट्राचे चित्र बदलायचे
असेल तर विचारवंतांकडे पाहण्याचा राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन बदलायला हवा.
समाजालाही विचारवंत कोण, हे ओळखण्याची सवय लागली पाहिजे.
आणि महत्त्वाचे म्हणजे विचारवंतांना स्वत्व ओळखून आपली सामाजिक जबाबदारी पार
पाडण्याची ऊर्मी आली पाहिजे.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९